'सिद्धीविनायक' शेवग्याची कापसातील मिश्रपीक लागवडीचा संकल्प !

श्री. मच्छिंद्र आनंद पाटील (वय - ७४), मु. पो. गोंदूर, ता. जि. धुळे,
मोबा. ९९२२२९६२५२


आम्ही २ वर्षापुर्वी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुणे ऑफिसला भेट देऊन 'सिद्धीविनायक' शेवग्याचे १०० बियांचे १ पाकिट नेले होते. त्याची सरांनी सांगितल्यानुसार ८ x ८ फुटावर मध्यम प्रतीच्या जमिनीत लागवड केली. माझ्याकडे एकूण २५ एकर जमीन आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कापूस व काही क्षेत्रात तृणधान्य व कडधान्य लागवड असते. या शेवग्याच्या १०० झाडांपैकी ९० - ९५ झाडे चांगली आली. त्याचे ७ महिन्यात उत्पन्न चालू झाले. शेंग हिरवीगार, २ फूट लांबीची आहे. याला धुळे मार्केटला कमीत कमी १५ ते २० रू. पासून जास्तीत जास्त ५० - ६० रू./किलो भाव मिळत असतो. सरासरी ३५ ते ४० रू./किलो भाव कायम असतो. या १०० झाडांपासून वर्षाला ५० हजार रू. होतात. त्यामुळे कापसापेक्षा शाश्वत पीक वाटते. कारण मी मार्केट कमिटीवर २८ वर्ष डायरेक्टर असूनदेखील कापसाचे बाजार भावाबद्दलच्या अनिश्चिततेचे कोडे सुटले नाही. त्यामानाने शेवग्याला खात्रीशीर भाव वाटतो.

अलिकडे 'कृषी विज्ञान' मासिकातूनही सरांचे लेख वाचण्यात आले की, मराठवाडा, खान्देश व विदर्भातील शेतकरी डॉ. बावसकर सरांच्या मार्गदर्शनानुसार कापसामध्ये 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड, अशी मिश्रपीक पद्धती अवलंबू लागले आहेत. दोन्ही पिकांचे उत्पादन ६ महिन्यात चालू होते आणि कापसाला आधार (आर्थिक उत्पन्नाचा) म्हणून लावलेला शेवगाच एवढे उतपन्न देतो की, शेवगा हेच मुख्य पीक होते. म्हणून आमचे असे नियोजन आहे की, २ एकरमध्ये चालू वर्षी ठिबकवर ४' x २' वर कापूस आणि त्यातच ८' x ८' वर 'सिद्धीविनायक' शेवगा लावायचा आहे. त्यासाठी आज (४ मार्च २०१४) 'सिद्धीविनायक' शेवग्याची १० पाकिटे बियाणे व जर्मिनेटर १ लि. घेऊन जाता आहे.

आम्हाला मागील अनुभवावरून खात्री आहे की, ज्याअर्थी १०० शेवग्याच्या झाडांपासून वर्षाला ५० हजार रू. होतात तर या २ एकरातील शेवग्याचे उत्पन्नातून निश्चितच आम्ही २५ एकर कापसाचा सर्व खर्च काढू आणि कापसाचे उत्पन्न जागेवर शिल्लक राहील. कारण सध्या कापसाचे उत्पन्नातूनच नवीन कापूस बियाणे खरेदी, औषध फवारणी, मशागतीची कामे, वेचणी हे करावे लागते. त्यामुळे उत्पन्न आले की लगेच विक्री करून खर्चानी भागवाभागवी करावी लागते. यामुळे कधीकधी कमी (चालू) भावातही कापूस विकावा लागतो.

आमच्या अनुभवानुसार 'सिद्धीविनायक' शेवगा हे असे पीक आहे की ते गरीब, लहान अल्पभूधारक शेतकऱ्यास परवडणारे मोजक्या खर्चात खात्रीशीर उत्पन्न व भाव देणारे एकमेव पीक आहे. म्हणून हा कल्पवृक्ष आहे, नव्हे तर आरोग्याचा फार मोठा दागिनाच आहे. "यापासून ३०० प्रकारचे आजार बरे होतात. याच्यावर जर 'युनो' ने संशोधन केले तर दवाखान्याचा खर्च बराच वाचेल. तिसऱ्या राष्ट्रातील गरीब जनतेचे आरोग्य सुधारेल." असे सरांनी यावेळी सांगितले. शेवग्याचे उत्पन्न आणि कापसाचे उतपन्न एकाचवेळी चालू होऊन पुढे कापूस काढून शेवगा कायम ५ ते १० वर्षापर्यंत ठेवणार आहे.

मी सटाण्याला डॉ. संजय पाटील यांच्याकडे हार्टची ट्रिटमेंट घेत असतो. ते अतिशय गुणवंत डॉक्टर आहेत. सलाईनद्वारे औषधे देऊन ते ब्लॉकेजेस कमी करतात. या ट्रिटमेंटसाठी मला दर महिन्याला सटाण्याला जावे लागते. तेथे गेल्यानंतर मेन रोडलाच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ऑफिस असल्याने नेहमी तेथे जाऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेत असतो. आमच्या शेतीसाठी तेथूनच औषधे घेत असतो.

आमच्या भागात पाऊसमान कमी असतो. मात्र ब्रिटीशांच्या काळात बांधलेला एक तलाव आहे. त्यावरून जवळपास १५०० हेक्टर शेत - जमीन भिजते.