लागवड वैशाखी मुगाची

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



सर्व कडधान्यामध्ये मूग श्रेष्ठ आहेत. मूग हिरवे, पिवळे, काळे तीन प्रकारचे मिळतात. हिरवा मूग सर्वश्रेष्ठ आहे. तुरट व मधुर रस असलेले मूग थंड गुणाचे असतात. मूग पचायला हलके आहेत. शरीराला आवश्यक असणारी ए.बी. ही व्हिटॅमिन्स, लोह कॅल्शियम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या टरफलात भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मुगाचे जीवरक्षक म्हणून सांगितले जाणारे गुण टरफलासकट मुगात आहे, हे लक्षात घ्यावे. मूग कफ, पित्त व रक्तसंबंधी विकारात फार उपयुक्त आहेत. मूग क्वचित पोटात वायू उत्पन्न करतात. मुगाबरोबर हिंग, मिरी वापरावी. मुगाचे पिठले, सबंध मूग कढण, उसळ, आमटी, पापड, लाडू, खीर अशा विविध प्रकारे मूग उपयुक्त असतात. औषधे म्हणून काढा करण्याचा प्रघात आहे.

ज्वरामध्ये मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानाचा काढा घ्यावा. जीर्णज्वरात ताकद भरून येण्याकरिता व चांगल्या झोपेकरिता मुगाच्या पानांचा काढा उपयुक्त आहे. डोळे आल्यास मुगाची पुरचुंडी डोळ्यावर बांधावी.

पिवळ्या मुगास कीड लवकर लागते. त्याच्यात भुंगे लवकर होतात. पिवळ्या मुगाचे भाजून तयार केलेले पीठ फार पौष्टिक आहे. थोडी पिठीसाखर व चांगल्या तुपावर परतलेले पिवळ्या मुगाचे पीठ उत्तम टॉंनिक आहे. कृश मुले, दुपारी उशिरा जेवणारी चाकरमानी मंडळी यांनी सकळी चहा ऐवजी चांगल्या तुपावर भाजलेल्या पिठाचे लाडू खावे. बाळंतीणीस भरपूर दूध घेण्याकरिता मुगाच्या पिठाचे लाडू तत्काळ गुण देतात.

शारीरिक कष्ट खूप करावयास लागणाऱ्यांनी रोज किमान एक वाटी मुगाची उसळ खावी. खूप लठ्ठ व्यक्तींनी मुगाची आमटी नियमित घ्यावी. कृश व्यक्तींनी मुगाची उसळ खावी. मुगामुळे मेद वाढत नाही. पण स्नायूंना बल मिळते. अर्धांगवात, संधिवात, आमवात, आम्लपित्त, अल्सर, डोकेदुखी, तोंड येणे, त्वचेचे विकार, कावीळ, जलोदर, सर्दी - पडसे, खोकला, दमा, स्वरभंग तक्रारीवर मूग अत्यंत उपयुक्त आवश्यक अन्न आहे. त्याकरिता मूग भाजून त्याचे नुसते पाणी किंवा कढण हे अर्धांगवात, मधुमेह, रक्तदाबवृद्धी या विकारात उपयुक्त आहे. घशाच्या, जिभेच्या, गळ्याच्या कॅन्सरच्या विकारात जेव्हा अन्न किंवा पाणी गिळणे त्रासाचे होते, त्यावेळेस हिरवे मूग उकळून त्याचे पाणी पुन: पुन्हा पाजावे, शरीर तग धरते. आयुष्याची दोरी बळकट असली तर नुसत्या मुगाच्या पाण्यावर माणसे कॅन्सरवर मात करू शकतात. मधुमेहात भरपूर मूग खावे. थकवा येत नाही.

डोळ्याचे कष्टसाध्य किंवा असाध्य विकारात मुगाचा विविध प्रकारे उपयोग होतो. रेटिना, काचबिंदू, मधुमेह किंवा रक्तदाब वाढल्यामुले क्षीण होणारी दृष्टी या अवस्थेत मूग भाजून त्याचे पाणी, गाईच्या दुधात शिजवून केलेली मुगाच्या पिठाची खीर किंवा पायसम, मुगाच्या पिठाचे पापड, मुगाची उसळ, मुगाच्या डाळीची खिचडी असे विविध प्रकारे मूग वापरावेत. चवीकरिता हिंग, जिरे, मिरी वापरावी. मुगाच्या आहारातील वाढत्या वापराने काहीच नुकसान होत नाही. डोळ्यांना नवीन तेज प्राप्त होते.

जुनाट जखमा, मधुमेही किंवा महारोगाच्या जखमा भरून येण्याकरिता कटाक्षाने मुगाचा भरपूर वापर करावा. जखमा लवकर भरून येतात. चहा, तंबाखू, जागरण, दारू, सिगारेट या कारणांनी ज्यांचे तोंड येते, त्यांनी मुगाचे वरण खावे. मुगाचे दाट हवे. नुसती पातळ आमटी उपयोगाची नाही. ज्यांना मळ कमी पडत असेल आहार कमी असल्यामुळे मलावरोध हा विकार आहे. अशांनी मुगाची उसळ आवश्यक खावी. सोबत लसूण वापरावा. मुगाच्या उसळीने मळ भरपूर तयार होतो. मळाचा खडा होत नाही.

जुलाब होत असल्यास मुगाच्या काढ्यात मध मिसळून घ्यावा. जुलाब थांबतात. थकवा येत नाही. मोठी शस्त्रकर्मे, दीर्घकालीन आजार, अनेक दिवसांचा ताप यामुळे ताकद गेली असल्यास अनेक अॅमिनो अॅसिड्स असलेल्या मुगाचे कढण नवीन जीवन देते.

मूग हे अत्यंत महत्ताचे कडधान्य पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन विचारात घेता देशात प्रथम क्रमांक लागतो. मूग कमी कालावधीतच तयार होते. खरीप व रब्बी हंगामात घेता येते. त्याचप्रमाणे स्वच्छ सुर्यप्रकाश व उष्ण हवामान यामुळे उन्हाळ्यात चांगला पोसतो व भरपूर उत्पादन मिळते. शिवाय या पिकावर उन्ह्लायात रोगाचे प्रमाण कमी असते. सिंचनाची सुविधा असल्यास उन्हाळ्यात मुगाचे चांगले उत्पन्न मिळते. म्हणून उन्हाळी मूग लागवड प्रचलित होत आहे.

* जमीन : मूग या पिकासाठी जमीन ही मध्यम ते भारी असावी. त्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होणारा असावा.

* लागवड : थंडीचा अंमल कमी झाल्यावर उन्हाळी मूग हा फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करून घ्यावी. जास्त उशीरा पेरणी केल्यास पीक जून - जुलैच्या भर पावसात काढणीस येते. त्यामुळे शेंगाचे नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र अलिकडे पाऊस हा उशीरा सुरू होत असल्याने मार्च अखेरपर्यंत जरी लागवड केली तरी ऐन पावसाळ्यापुर्वी पीक काढणीस येते.

* लागवडीचे अंतर : दोन ओळीत ३० सेमी आणि २ रोपात १० सेमी अंतर ठेवून पाभरीने मूग पेरावा. एकरी ५ ते ६ किलो बियाणे पुरे होते. पेरणी केल्यावर पाणी व्यवस्थित देण्यासाठी ४ - ५ मीटर रुंदीचे सारे ओढून घ्यावेत.

* बिजप्रक्रिया : मूग विशेषत: मूळकुजव्या रोगास बळी पडतो. अशा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व उगवण लवकर व १००% होण्याकरिता १ किलो बियाण्यास २० ते २५ मिली जर्मिनेटर + १ लि. पाणी या प्रमाणात १ ते २ तास भिजवून सावलीत वाळवून मग पेरावे.

* जाती : मूगाच्या वैभव, कोपरगाव, फुले एम. २, एस. ८, बी, एम. ४, के. ८५१ या जाती आहेत.

१) वैभव : ही जात ७० ते ७५ दिवसात काढणीस येते. याचे दाणे आकर्षक, हिरवे, टपोरे असतात. भूरी रोगास प्रतिकारक्षम असते. खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामास लागवडीस योग्य वाण आहे. याचे एकरी उत्पन्न ४.५ ते ५.५ क्विंटल येते.

२) कोपरगाव : ही जात ६० ते ६५ दिवसात काढणीस येते. याचे दाणे आकर्षक, टपोरे, हिरवे चमकदार असतात. ही जात भुरी रोगास बळी पडते. महाराष्ट्रा लागवडीसाठी चांगली आहे. एकरी उत्पन्न ३ ते ४ क्विंटल येते.

३) फुले एम. २ : ही जात ६० ते ६५ दिवसात काढणीस येते. याचे आकर्षक मध्यम, हिरवे दाणे असतात. खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी योग्य आहे. ४.५ ते ५ क्विंटल एकरी उत्पादन येते.

४) एस ८ : ही जात ६० ते ६५ दिवसात तयार होणारी असून खरीप व उन्हाळी या दोन्ही हंगामामध्ये घेता येते. उत्पादन एकरी ४.५ क्विंटल पर्यंत मिळते.

५) पी.के.व्ही.ए.के.एस. ४ : ही जात ६५ ते ७० दिवसात काढणीस येत असून दाणे मध्यम आकाराचे, एकाच वेळी पक्वता येणारी रोगप्रतिकारक जात आहे. एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळते. उन्हाळी हंगामास योग्य वाण आहे.

६) बी.एम. २००२ - १ : ही जात ६५ ते ७० दिवसात काढणीस येते. दाणे टपोरे, शेंगा लांब असून हा वाण भुरी रोगास प्रतिकारक्षम आहे. एकाच वेळी पक्व होत असून एकरी ५ - ६ क्विंटल उत्पादन मिळते. उन्हाळी हंगामासाठी चांगला प्रतिसाद देते.

७) बी.पी.एम.आर - १४५ : ही जात ६५ ते ७० दिवसात काढणीस येते. दाणे टपोरे हिरवे असून शेंगा लांबट असतात. हा वान भुरी रोगास प्रतिकारक्षम आहे. उन्हाळी हंगामास उत्तम असून एकरी ५ - ६ क्विंटल उत्पादन मिळते.

८) बी.एस. ४ : ही जात ६५ ते ७० दिवसात काढणीस येते. विशेष म्हणजे ही जात करपा रोगास प्रतिबंधक असून दाणे हिरवे, मध्यम आकाराचे असतात. महाराष्ट्र, गुजरात तसेच मध्यप्रदेश मध्ये लागवडीस योग्य जात आहे

के -८५१: निमपसरट वाढ होत असून दाणे मोठे असतात. लागवडीपासून ६० ते ६५ दिवसात काढणीस येते. महाराष्ट्रामध्ये लागवडीस योग्य. एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन मिळते.

* पाणी नियोजन : उन्हाळी मुगास पेरणीनंतर प्रथम ३ ते ४ दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पेरणीपुर्वी रान ओले करून वापश्यावर आल्यानंतर पेरणी करावी. पहिल्या हलक्याश्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. एकूण ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या पिकाच्या संपुर्ण कालावधीत द्याव्यात. विशेषत : पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा तयार होताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.

* कीड व रोग : मुगावर उन्हाळ्यात किडीचा प्रादुर्भाव कमी पडत असला तरी प्रामुख्याने तुडतुडे, मावा, पाने खाणारी व शेंगा पोखरणारी अळी व भुंगेरे दिसून येतात. त्याकरिता तसेच अधिक दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रिझम १०० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + हार्मोनी १०० मिली. + स्प्लेंडर १०० मिली +१०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० दिवसांनी) :
जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर १५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २५० मिली. + स्प्लेंडर २५० मिली+ १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + २०० लि.पाणी.

* आंतरमशागत : पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी हलकीशी कोळपणी करावी. त्यानंतर गरज भासल्यास १० ते १२ दिवसांनी परत एखादी खुरपणी करावी.

* खते: मुगाचे भरघोस उत्पादनासाठी लागवडीपुर्वी पुर्ण कुजलेले शेणखत किंवा कल्पतरू सेंद्रिय खत एकरी १ बॅग (५० किलो) द्यावे. नंतर १ महिन्याने पुन्हा ३० ते ५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत मुगाच्या झाडापासून काही अंतरावर द्यावे. या खतांमुळे हवेतील ओलावा खेचून मुळांभोवती गारवा निर्माण होतो. त्यामुळे पाण्याच्या पाळ्या कमी लागतात व जमीन भुस भुशीत होऊन पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात.

* काढणी : उन्हाळी मूग काढणीस ६० ते ६५ दिवसांनी तयार होते. जवळजवळ ७० ते ७५% शेंगा तयार होऊन वाळल्यावर पहिली तोडणी करावी. तयार झालेल्या शेंगा ३ ते ४ तोड्यामध्ये तोडून घ्याव्यात. तोडलेल्या शेंगा वाळवून व काठीने झोडपून मळणी करावी. नंतर उपणणी करून घ्यावी. तयार झालेले धान्य नीट वाळवून मगच साठवण करावी.