भारताचे कृषी महर्षी

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


पुर्व पिठीका - पारतंत्र्यापुर्वीची

ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यासाठी ३०० वर्षापुर्वी भारतातील विविध भागातील भौगोलीक, ऐतिहासिक, परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटीश सिनेटरला पाठविले होते. तेव्हा त्याने एक रिपोर्ट तयार केला व त्यात लिहिते की, हा देश फार सुसंपन्न आहे. येथील लोक कष्टाळू, मदत करण्यास तत्पर, सुस्वभावी, निष्पाप आहेत. हा देश सुवर्णयुगाच्या काळातील आहे. कारण इथे अशा परिस्थितीत राज्य करणे आपणास शक्य होणार नाही. कारण येथील माणूस वारकरी सांप्रदयातील असून काठीला सोने बांधून ती काठी खांद्यावर घेऊन सहजपणे तीर्थयात्रेला जातो. त्यामुळे अगोदर हा देश दुबळा कसा करता येईल हे आपणास पहावे लागेल असे अहवालात कळविले. तेव्हा या अहवालावरून ब्रिटीशांनी येथील भारतीय लोकांना तुम्ही मातीत आणि शेणात काय हात घालता. तुम्हाला आम्ही भारतातच अशा नोकऱ्या देऊ की, तुम्हाला मातीत, उन्हातान्हात काम करावे लागणार नाही. तुमचे कपडे घाण होणार नाहीत. तुम्हाला सहजगत्या बाबू (लेखनीक) बनवू. १५ रू. त हेडमास्तर, १२ रू. त शिक्षक व बाबू हा ८ ते १० रू./महिना अशा नोकऱ्या देऊ. मग येथील परिस्थितीचा गैरफायदा घेऊन उत्पन्नाचा श्रोत व कच्चा माल कापूस हा मँचेस्टरला नेऊन कापड बनवू. यासाठी ब्रिटीशांनी व्यापार करण्यास येत आहोत असा आभास निर्माण करून या देशावर पंख पसरवले.

ब्रिटीशांनी येथील शेती जास्त समृद्ध होऊ दिली नाही. कारण येथील शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर (३०० वर्षापूर्वी) केला असता तर भारत देश अधिक समृद्ध होऊन जगावर राज्य करेल हे ब्रिटीशांच्या लक्षात आले. त्याकाळी मँचेस्टरला कापड गिरण्या होत्या. येथील कच्चा कापूस तेथे नेऊन त्यापासून तलम कापड व कपडे बनविले जात असते. तेथे बनविलेली सुपर फाईन धोतर - जोडी भारतासारख्या उष्ण देशात फार प्रसिद्धीस आली. कापसाची आयात करून त्याचा पक्का माल पुन्हा भारतात आणून भारताची एक मोठी बाजारपेठ आयातीच त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांचा वापर करण्याचा मार्ग अधिक सुखकर झाला. तिच गोष्ट लोखंडाची झाली. बर्मिंगहॅम येथे लोखंडाचे कारखाने होते.

शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पेशवाईपर्यंत गुळ पाणी व दूध माहीत होते. त्याकाळी ते फुकट दिले जात असे. त्यावेळी लोकसंख्या १० कोटीच्या खाली होती. तेव्हा नांगरणी, कुळवणी व नुसत्या शेणखतावर शेती पिकत असे. पिकांना खुरपणी माहितच नव्हती. रासायनिक खते नव्हे तर पेंडीचा वापर हा १९४८ सालापर्यंत विष वाटत असे. पिके मोजकीच प्रपंचापुरतीच होती. जिवनावश्यक गोष्टी ह्या ब्रिटीश साम्राज्याकडून सुबक अत्यावश्यक किफायतशीर भावात मिळत असल्याने भारतीय या गोष्टीने ब्रिटीशांवर सुखावले होते. पण ब्रिटीश मात्र भारताला घुशीसारखे घर पोखरून स्वताची तुंबडी भरून भारताची अर्थव्यवस्था पोखरत होते. हे करत असताना दळणवळणाच्या सोईसाठी लोहमार्ग असावा असे ब्रिटीशांच्या लक्षात आले आणी नुकताच जेम्स वॅट यांनी वाफेवर चालणाऱ्या रेल्वे इंजीनाचा शोध लावला आणि १८५४ साली भारताचा गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांनी ठाणे ते भायखळा ही पहिली रेल्वे सुरू केली. अशा पद्धतीने दळणवळणाची साधने कच्चा माल मिळवून त्याचा पक्का माल करून तोच माल भारतात विकता येतो या स्वार्थापोटी विविध सोयी उभारल्या व मग व्यापाराचे रूपांतर भारतावर ब्रिटीश सम्राज्याचे राजकिय पंख गिधाडासारखे साऱ्या देशावर पसरले. त्यानंतर त्यांनी पुर्वेकडील सर्व देशांवर नजर ठेवता येईल यासाठी कलकत्ता ही राजधानी केली. आपण पारतंत्र्यात गेलो हे भारताच्या फार उशीरा लक्षात आले. तेथून १५० वर्षाचा काळ गेल्यावर भारताची सर्व आर्थिक व्यवस्था डबघाईला आल्यावर भारतास १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.

भारत हा दारिद्र्याने पिचलेला जसे गाईचे नुकतेच जन्मलेले वासरू किंवा कोंबडीने उबवलेले अंड्यातून आलेले पिल्लू जसे पायावर उभे राहण्यासाठी घडपड करते तसा करू लागला. अशा अवस्थेत पंडीत जवाहरलाला नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले. परदेशात शिक्षण घेतलेल्या पंडीत नेहरूना दुरदुष्टी होती. देशाचे औद्योगिकीकरण केले तरच झपाट्याने प्रगती करता येईल म्हणून औद्योगिकीकरणावर त्यांनी भर दिला. स्वातंत्र्यानंतरच्या ३ वर्षांनी देशाची लोकसंख्या ३५ कोटी ६८ लाख २९ हजार ३८५ इतकी होती. देशाची प्रगती आणि उन्नत्ती करण्यासाठी औद्योगिकीकरणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणून शेतीकडे जरी दुर्लक्ष झाले तरी आपण औद्योगिकीकरणातून देशाला प्रगतीकडे लवकर नेऊन त्याला विकसनशील बनवू हा पंडितजींचा होरा होता व ते १००% बरोबरच होते. कारण ज्याप्रमाणे एखादी पडीक जमिनी वहितीखाली आणताना शेतकऱ्याची तारांबळ होते तिच अवस्था देशाची होती असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

पहिल्या २ पंचवार्षिक योजना झाल्यानंतर लोकसंख्या ५० कोटीवर गेल्यावर आपण धान्य आयात किती वेळा करणार आणि यावर परकीय गंगाजळी किती खर्च करणार ? तेव्हा अन्नधान्यात आपण स्वयंपुर्ण झालो तर ही गंगाजळी औद्योगिकीकरणावर खर्च करून देशाची प्रगती केली तर ते संयुक्तिक होईल हे लक्षात आल्यावर अन्नधान्य स्वत: निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. मग भारत हा अन्नधान्यात स्वावलंबी व्हावा अशा प्रकारची एक कल्पना रुजू लागली व त्यानंतर पारंपारिक खताबरोबर रासायनिक खताचा उदय झाला.

भारताचे कृषी महर्षी

त्याकाळात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि दुरदृष्टीचे अर्थतज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांची भेट झाली व या दोघांच्या विचारातून सहकारातून साखर कारखाना काढण्याची कल्पना सुचली आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी पहिला उसापासून साखर कारखाना देवळाली प्रवरा येथे उभा राहिला. यामध्ये अण्णासाहेब शिंदेंचे योगदान मोलाचे ठरले.

अण्णासाहेबांचा जन्म हा नाशिक जिल्ह्यातील पाडळी या दुर्गम खोड्यात २१ जानेवारी १९२२ साली एका सर्वसाधारण कुटूंबात झाला. मॅट्रीकला ते संगमनेर येथील सर डी. एम. पेटिट विद्यालयात शिकले व तेथे ते पहिले आले. पुढील शिक्षणासाठी बडोदा येथे सयाजीराव महाराजांकडे गेले. महात्मा गांधीच्या पुढाकाराने १९४२ च्या स्वातंत्र्य संग्रामातील चलेजाव चळवळीत त्यांनी झोकून देण्यासाठी कॉलेज शिक्षण सोडले व ब्रिटिशांशी असहकार पत्करला. ब्रिटिशांच्या कार्यात व्यत्यय आणण्यासाठी त्यांनी एक पूल उगवून दिला. तेव्हा त्यांना अटक झाली. त्यावेळी त्यांनी तुरुंगात लेनिन कम्युनिस्ट नेते (गरीबांचे नेते व साम्यवादी) यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले व तेथून ते कट्टर कम्युनिस्ट झाले. या चळवळीत असतानाच ते एलएलबी झाले.

कम्युनिस्ट पक्षाने सध्याचे हे सरकार उलथून टाकण्याचा ठराव कोलकता येथे अधिवेशनात केल्यावर तेथून परततान अण्णासाहेबांना अटक झाली. दरम्यान पक्षाचे धोरण चुकीचे असल्याचे अण्णासाहेबांनी पत्रक काढून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. मग अण्णासाहेब संगमनेर वरून श्रीरामपूरला आले व त्यांनी वकिली सुरू केली. यात चांगला जम बसला. तेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या अत्यल्प खंडात खाजगी साखर कारखान्याकडे होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नव्हते. मग ह्या तक्रारी अण्णासाहेबांकडे येऊ लागल्या व मग अण्णासाहेबांनी शेतकऱ्यांना एकरी ५० रू. अधिक खंड सरकारकडून मिळवून दिला. अण्णासाहेबांच्या चतुर नेतृत्वाने धनंजय गाडगीळ यांच्या आग्रहखातर प्रवरा सहकारी साखर कारखाना उभारण्यास मोठे योगादन मिळाले. सहकारी साखर कारखाना ही कृषी औद्योगिकी करणाची सहकारातील नांदी ठरली व याने पंडित नेहरू प्रभावित झाले. यातून त्यांना आशेचा किरण दिसू लागला. कारक खाजगी साखर कारखाने हे खाजगी असल्याने त्यांच्या गतीमानतेवर व प्रगतीवर मर्यादा आल्या होत्या हे त्यांनी ओळखले होते. म्हणून विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांना हेरून त्यांना पहिले कृषीमंत्री केले.

नंतर १९५७ साली संयुक्त महाराष्ट्राच्या राजकारणामुळे यशवंतराव चव्हाण हे बेरजेचे राजकारण करून काँग्रेसचे बळ वाढावे म्हणून त्यांनी प्रयत्नपुर्वक अण्णासाहेबांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी आबासाहेब निंबाळकरांमार्फत प्रयत्न केला व अशा रितीने अण्णासाहेब काँग्रेसमध्ये आले. १९६१ साली पंडीत नेहरूंनी प्रवरा कारखान्यास भेट दिली तेव्हा त्यांना वाटले आपल्या मनामध्ये उद्योजक भारत घडावा हे जर यथार्थ व पुढाकाराने राबवायचे असेल तर प्रवरासारखे कारखान्यांचे देशात जाळे उभारावे लागेल. म्हणून उत्तरप्रदेशातील फुलपुर या आपल्या मतदार संघात साखर कारखाना काढावा याकरिता यशवंतराव मुख्यमंत्री असताना अण्णासाहेबांना फुलपूर येथे पाठवावे असा आग्रह नेहरूंनी धरला. मग पंडित नेहरूंनी अण्णासाहेबांबरोबर इंदिराजींना तेथील कृषिचा अभ्यास करण्यासाठी पाठविले. अण्णासाहेबांची कृषी क्षेत्रातील ओढ, झेप व इंग्रजी भाषेतील प्रभुत्व लक्षात घेऊन एवढा हुशार माणूस दिल्लीत असावा म्हणून १९६२ साली कोपरगाव मतदार संघातून अण्णासाहेब शिंदे यांना लोकसभेत उभे केले. तेथून ते विजयी झाले. प्रथम पार्लमेंट सेक्रेटरी झाले. नंतर केंद्रीय मंत्रीमंडळात कृषी उपमंत्री - कृषी राज्यमंत्री यापदावर अतिशय नाविण्यपुर्ण कारकिर्द राबवली. याकाळात आयात केलेला निकृष्ट गहू व एलोमिलो ज्वारी ही निकृष्ट, टाकाऊ दर्जाची होती, ती फक्त कष्टकरी खात असत. अशातच १९६२ साली युद्ध झाल्यावर आपली अर्थव्यवस्था अधिकच कोलमडली व कृषीमंत्री म्हणून अण्णासाहेबांबर मोठी जबाबदारी सांभाळावी लागली. पारंपारिक तसेच अन्नत बियाणे, पाण्याचे श्रोत यावर त्यांनी चिंतन करून सखोल संशोधन केले. जमिनीचे हवामानानुसार प्रकार (Agro climatic Zone) पाडले.

भारतामध्ये कृषी विद्यापीठे स्थापन करावीत याकरिता डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने १९५६ साली समिती नेमली होती. या समितीने अमेरिकेतील लँडग्रँड कॉलेजेसच्या धर्तीवर कृषी विद्यापिठे निर्माण करावीत अशी शिफारस केली. नैनिताल येथे भारतातील पहिले कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले. मग देशभर कृषी विद्यापिठे स्थापन करण्यामध्ये अण्णासाहेबांनी जातीने लक्ष घातले. महाराष्ट्रात अण्णासाहेब शिंदेच्या पुढाकाराने १९६८ साली राहुरीची निवड कृषी विद्यापीठ स्थापण्यासाठी करण्यात आली. त्यावेळेस वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. मग त्यानंतर अण्णासाहेब शिंदेंनी भारतभर कृषी विद्यापीठांचे जाळे निर्माण केले व विविध क्षेत्रातील शेतीतील वेगवेगळे प्रयोग केले. त्याकाळामध्ये सहकारी साखर कारखाने निर्माण करण्यामध्ये परमीट राज होते. तेव्हा अण्णासाहेब शिंदेंनी लक्ष देऊन जातीने परवानगी मिळवून दिली आणि अशा रितीने अण्णासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने निर्माण करण्यामध्ये परमीट राज होते. तेव्हा अण्णासाहेब शिंदेंनी लक्ष देऊन जातीने परवानगी मिळवून दिली आणि अशा रितीने अण्णासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचे जाळे पसरले. अण्णासाहेबांचा अभ्यास, दूरदृष्टी, वाचन, निरीक्षण, विविध कृषी विषयावरील पकड आणि चौकस बुद्धी यामुळे भारताला वाढत्या लोकसंख्येची भुक शमण्यासाठी कृषीक्रांती व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा ही संकल्पना रुजविणारे अण्णासाहेब शिंदे देशामध्ये पहिले राजकारणी होते. त्यांची आणि डॉ. स्वामीनाथन यांची विचारसरणी कायम जुळत होती. कारण दोघेही आधुनिक शेती व भारताच्या हरित क्रांतीचे जनक होते व पुरोगामी विचारांचे होते. शेतकऱ्यांचे हित खरेखुरे पाहणारे होते. तोंडपाटीलकी करणारे किंवा भूलथापा मारणारे नव्हते. तर शेतकऱ्यांचे ते खरे जीवनाधार होते. विविध कृषी उत्पादने, दुग्धोत्पादन, विविध प्रक्रिया उद्योग, मधुमक्षिकापालन, रेशीमपालन, मत्स्यपालन, कुकुटपालन नंतर सोयाबीन हे एक क्रांतीकारी पीक आहे व खालोखाल सुर्यफूल आहे अशी सजग कल्पना अण्णासाहेब शिंदेंना सुचली व त्याकाळामध्ये देशपातळीवर प्रथमत: मध्यप्रदेश व नंतर उत्तरप्रदेशमध्ये सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले. कारण सोयाबीन जेवढे तेलासाठी प्रसिद्ध आहे तेवढेच उत्कृष्ट प्रथिनांचा श्रोत असणारे हे दुहेरी अंगाचे फायद्याचे पीक आहे हे अण्णासाहेबांनी जाणले. म्हणून या पिकाखालील क्षेत्र लागवडीखाली वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

माझ्या अभ्यासातून सोयाबीन पीक भारताची भूक आणि कुपोषण मिटवण्यासाठी व देशाची खाद्य तेलाची गरज भागविणारे एक सोनेरी पीक आहे हे मी जाणले तेव्हा ठिबकवर याचे उत्पादन व दर्जा यावर पीएच. डी. करावी हे माझ्या १९६७ साली लक्षात आले होते, पण माझे एम. एस्सी. चे काम सेंद्रिय शेतीवर झाले असल्याने पीएच. डी. सेंद्रिय शेती याच विषयावर करावी लागली. तेथे ओघाने व जाणिवपुर्वकच बरे झाले.

अण्णासाहेबांच्या कार्याने सोयाबीनने उत्पादन वाढून मध्यप्रदेश, विदर्भ व महाराष्ट्र हा खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आणि १९६७ साली संकरीत गव्हाच्या निर्मितीमुळे जी क्रांती झाली त्यातून भारत हा गव्हाचा निर्यातदार देश झाला. देश कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत विविध प्रयोग करून महाराष्ट्रातील फळ उत्पादन व शेती क्षेत्रातील वेगवेगळे उद्योग साकारण्यात अण्णासाहेबांचा मोठा वाटा आहे. अण्णासाहेबांचा कृषी क्षेत्रातील अवाका, जाण, व्यासंग, अभ्यास, चिंतन, प्रयोगशीलता, माणुसकीची कणव, गरिबांविषयीची तळमळ यामुळे अण्णासाहेब हे फार लोकप्रिय नेते होते. ज्यावेळेस आम्ही कॉलेजच्या चौथ्या वर्षाचा वर्ग घेऊन उत्तर भारताचा दौरा करण्याकरीत देहराडून, लखनौ, वाराणसी अलाहाबाद, लुधियाना, पठाणकोट, अंबाला, प्रयाग, भाक्रानानगल डॅमला व्हिजीट दिली. नुकताच इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र केला होता. तेव्हा विद्यार्थ्यांसह इंदिरा गांधींची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. तेथे १ तासभर आमच्यासोबत त्या होत्या. तेव्हा विविध विषयांवर चर्चा झाली. नंतर यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आमची भेट झाली. तेव्हा त्यांनी विचारपूस करून हस्तांदोलन केले. त्यानंतर अण्णासाहेब शिंदेंचा मुलगा अशोकराव हा माझा विद्यार्थी होता. तेव्हा आम्हा सर्वांना अण्णासाहेबांनी दिल्लीतील निवासस्थानी बोलाविले. तेथे अण्णासाहेब व वहिनीसाहेबांची भेट झाली. अण्णासाहेबांशी आमची विविध विषयांवर चर्चा व अल्पोपहार झाला. त्यानंतर आम्ही आय. ए. आर. आय. च्या होस्टेलला पोहचलो. त्यावेळच्या अण्णासाहेबांच्या भेटीमधील चर्चा ही कायम सकारात्मक राहिली. त्यांच्या विचारांमुळे देश प्रगती करू शकला आणि त्यांचे विचार आम्हाला सतत प्रेरणा देत राहिले. अशा कृषी महर्षीला त्यांच्या १४ व्या जयंती निमीत्त मानाचा मुजरा व आदरांजली. त्यांच्या विचारांनी जर देशातले कृषी क्षेत्रातील शिक्षण कृषी क्षेत्रातील विद्वान नेते, कार्यकर्ते जर एक दिलाने वागते तर देशातील कृषी क्षेत्रातील प्रगती झपाट्याने होईल आणि हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल!