बहर शेवग्याचा, दराचा आणि आरोग्याचा

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


गेल्यावर्षी बदलत्या हावामानामुळे आणि अवकाळी पाऊस झाल्याने शेवग्याला भाद्रपद महिन्यात येणारी फुले टिकली नाही तसेच दिवाळीनंतर आलेल्या अवकाळी पावसाने परत फुलगळ झाली. संक्रांती नंतर जेव्हा थंडी कमी होण्याची चाहूल लागते आणि ऊन वाढू लागते तेव्हा शेवग्याचा बहर मोठ्या प्रमाणात येतो. संध्याकाळच्या वेळेस ६ वाजल्यानंतर उंच टेकडीवरून किंवा घरावरून शेवग्याच्या प्लॉटकडे पाहिले असता शेवग्याचा प्लॉट चांदण्यासारखा चमकताना दिसतो. संक्रांत झाली तरी हवी तशी थंडी कमी झाली नाही. त्यात सतत बदल होत आहेत. तापमान ७ ते १० डी.से. इतके किमान तापमानातील चढ - उतार होत ३५ डी.से. असावे लागते. शेवग्याची व्यवस्थित छाटणी केली व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित केल्यास फेब्रुवारी महिन्यात फुले लागून वाध्या लागून शेंगा पोसत आहेत. या काळामध्ये झाडाची अवस्था पाहून (खोड पोटरी ते मांडीच्या जाडीचे असल्यास) पोयटायुक्त जमीन असेल तर ५०० ग्रॅम ते १ किलो कल्पतरू खत द्यावे व हलकी जमीन असल्यास त्या शिवाय सम्राट (१८:४६) पावकिलो ते अर्धा किलो, पोटॅश पाव किलो द्यावे. गांडूळ खताचा रिझल्टही चांगला येतो. अपक्व किंवा कमी कुजलेले शेणखत झाडास दिले गेल्यास हुमणीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि शेवग्याचे खोड हे गोड व मऊ असल्याने हुमणी कीड खोडावर तुटून पडते त्यामुळे झाडांचे मरीचे प्रमाण वाढते. शक्यतो पोल्ट्रीचे किंवा मेंढीचे खत वापरू नये. कारण त्यातील अमोनिया वायूमुळे फुलगळ होण्याची शक्यता असते. अजुनही थंडीचा काळ असल्यामुळे शेवगा पिकास आठवड्यातून एकदाच पाणी मोकळे द्यावे किंवा ठिबक चालवायचे झाल्यास हलक्या जमिनीत आठवड्यातून २ वेळा (प्रत्येक वेळेस २० लि. पाणी) द्यावे. म्हणजे वाध्या व शेंगा पोसण्यास मदत होईल. मात्र जेव्हा १८ ते २० डी.से. तापमान असते तेव्हा आठवड्यातून एकदाच पाणी द्यावे. महाशिवरात्रीपर्यंत थंडी टिकून असते आणि नंतर होळी पेटल्यावर हवेतील उष्णता वाढते. तेव्हा मात्र शेवगा पिकास पाण्याची गरज अधिक भासते. म्हणजे दोन पाण्य्च्या पाळीतील अंतर ५ दिवसांचे ठेवावे. फुलगळ होऊ नये म्हणून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रिझम, न्युट्राटोनचा वापर करावा. तर मावा होऊ नये म्हणून प्रोटेक्टंट, हार्मोनीचा वापर करावा. अधिक माहितीसाठी शेवगा पुस्तक चौथी आवृत्ती बारकाईने वाचून त्यातील सूचनांचा काळजीपुर्वक अवलंब करावा.

म्हणजे गुढी पाडव्यापासून शेंगा सुरू होतात. या रोगांचा हंगाम २ ते २॥ महिने चालतो. या काळात शेंगांना भाव २५ ते ७५ रू. किलो शेतकऱ्यांना मिळतो. गावात हातविक्री केल्यास अधिक पैसे मिळून ग्राहकाला ताजा व चविष्ठ माल मिळाल्याने तो सतत याच 'सिद्धीविनायक' शेवग्याची मागणी करतो. जेव्हा यापुढेही (जुलै - ऑगस्टपर्यंत) शेंगा हव्या असतील व पावसाचे मान कमी असते तेथे ऑगस्टअखेर शेंगांचा बहर चालूच असतो, परंतु जेव्हा ज्या ठिकाणी (कोकण, भंडारा या भागात) पाऊसमान अधिक असते तेथे फुले व वाध्या गळून पडतात. शेंगांचे टोक अधिक पावसाने काळे पडून शेंगा वाकड्या होतात, कुजतात, सडतात. तेव्हा अशा हंगामातील बहर धरू नये, कारण यावर इलाज नाही. भाद्रपद महिन्यात उष्णता वाढल्याने शेवग्याला पुन्हा फुले येतात, त्यापुर्वी मध्यम छाटणी करून घ्यावी. दिवाळीनंतर मध्यम पाऊस असला तर शेंगांचा बहर परत लागतो. हा शेवगा नाताळापर्यंत ऐन थंडीतही बहरू शकतो, परंतु इथे पाण्याचे नियोजन फार महत्त्वाचे असते. कारण हा काळ अतिथंडीचा असतो. हवामानामध्ये, अंदाज न करता येणारे बदल घडत असल्यामुळे अवकाळी पावसाने शेवगा पिकाचे प्रचंड नुकसान होते आणि शेंगा लागत नाही. तेव्हा संक्रांतीनंतरचा बहर हमखास मिळतोच. तो बहर धरण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे. म्हणजे या काळामध्ये मंदी असली तरी हा काळ शेवग्याच्या दराचा बेगमीचा असतो आणि एकरी ६० हजार ते १ लाख रू. सहज होतात.

नवीन लागवड दिवाळीनंतर केलेल्या शेतकऱ्यांना मार्च महिन्यामध्ये उष्णता वाढल्याने धन्याची उगवण कमी होईल. तेथे जर्मिनेटरचा वापर करावा म्हणजे मर न होता ८० ते १०० टक्के उगवण होऊन कोथिंबीर निरोगी राहील. या काळात कोथिंबीरीला दर अधिक राहत असल्याने कोथिंबीरीचे प्लॉट टप्प्याटप्प्याने बी फोकून करावेत. म्हणजे शेवग्याच्या गारव्याने धन्याला पोषक वातावरण तयार होते. धन्याला पाणी दिले म्हणजे शेवग्याला पाणी द्यावे लागत नाही आणि शेवग्याला फवारणी केली म्हणजे धन्याला फवारणी करावी लागत नाही. (संदर्भ - श्री. वसंतराव निवृत्ती काळे, ससाणेनगर, हडपसर, पुणे, फोन (०२०) २६८२४२३८ यांची मुलाखत 'कृषी विज्ञान' मार्च २०१० पान नं. ३१) आणि अशा शेवग्यातील उन्हाळ्यातील कोथिंबीरीचे आंतरपिकाचे एकरी सहज ५० ते ६० हजार रुपये २ महिन्यात होतात.

शेवगा आरोग्याचा दागिना

जगभरातील आहारातील बदल व वाढत्या मांसाहाराचे प्रमाण यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) ही मधुमेहाच्या बरोबरीने निर्माण झालेली विकृती आहे. यामध्ये त्रिफळा चूर्ण किंवा औषधी इलाज करतात. परंतु आहारामध्ये पपई जर जेवणामध्ये दररोज घेतली तर बद्धकोष्ठता कमी होते, परंतु प्रत्येक वेळी पपई उपलब्ध असेलच असे नाही. आमच्याकडे बहारीनचा शेतकरी आला होता. त्याने आमच्याकडे पपईच्या बियाची चौकशी केली. कारण त्याला तिथे पपई लागवड करायची होती. तेव्हा आम्ही त्याला शेवग्याचा पर्याय सुचविला होता. प्रत्येक माणसाने आपल्या परसात १ शेवग्याचे झाड लावले तर आहारात शेंगाचा वापर होऊन आरोग्याच्या विविध समस्या कमी होतील. डोळ्याचे विकार, बद्धकोष्ठता कमी होतील.

ग्रामीण भागातील दूषीत पाण्याने होणारे विविध रोग पाणी शुद्धीकरणार शेवग्याचा वापर केल्यास टळतील. (संदर्भ:शेवगा पुस्तक चौथी आवृत्ती, पान नं. ४७, ४८) म्हणजे शेतकऱ्यांचे नैसर्गिक रीत्या आरोग्याचे संवर्धन होईल आणि आरोग्यावर होणारा औषधोपचारावरील खर्च टळेल. शेवग्याची लागवड कधीही करता येते. कमी कष्टात, कमी खर्चात बऱ्यापैकी उत्पन्न देऊन हमखास भाव देणारा 'सिद्धीविनायक' शेवगा हा खरोखरच शेतकऱ्यांचा मित्र आहे.