भारतीय शेतकऱ्यांचे टॉंलस्टॉंय !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. जयंतराव शामराव पाटील यांचे मंगळवार दि. ७ एप्रिल २०१५ रोजी दु. ३.०० वाजता वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाल्याचे कळले आणी एक माझा जीवस्य, कंठस्य, आधारवड, ज्येष्ठ स्नेही निघून गेल्याचे मला दु:ख झाले, ते कायम माझ्यासाठी दिपस्तंभासारखे उभे राहत.

डॉ. जयंतरावांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील (आताच पालघर) बोर्डी येथे २८ मार्च १९२७ रोजी एका हाडाच्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे कृषी महाविद्यालयात झाले. १९४८ साली ते कृषी पदवीधर झाले. प्राध्यापक झेंडे सरांचे ते विद्यार्थी होते. त्यांनी पुणे विद्यापीठाची एम.एस्सी.(कृषी) पदवी घेतली व नंतर अमेरिकेतील फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळवून तेथील कॅनसस राज्यातील विद्यापीठाची एम.एस.पदवी संपादन केली.

त्यांचा आणी माझा परिचय १९७८ साली ज्यावेळेस ते पुना रोझ सोसायटीच्या कार्यक्रमाला येत असत तेव्हा झाला. मला पहिल्यापासून गुलाबाच्या फुलांबद्दल आवड होती. त्यामध्ये गावठी गुलाबाचे मला फार आकर्षण होते. मला जळगावच्या हायस्कूलमध्ये शिकताना तेथील गावठी गुलाबाचा सहवास वाढला. गोवर्धन सुंदरदास कृषी विद्यालय येथे ८ वी ते ११ वी पर्यंतचे शिक्षण घेत असताना पिंप्राळे फार्मवर देशी गावठी गुलाबावर डोळे भरण्याचे प्रशिक्षण मिळाले आणि पुण्याच्या शेतकी कॉलेजमध्ये १९५७ साली दाखल झाल्यानंतर मामांकडे राहत असताना तेथील घरगुती दोन कुंड्यातील गुलाबावर १५ - १६ व्या वर्षी, वाया गेलेल्या दाढीच्या ब्लेडने वेगवेगळे डोळे भरण्याचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले. गुलाबावर टी (T) आकाराचा कट करून त्यात डोळा भरला की, ८ ते १० दिवसात डोळा फुटायचा व कुंड्यात रंगीबेरंगी फुले येत होती. त्यातून गुलाबाविषयीची ओढ अधिकच वाढू लागली. त्यामुळे पुण्यातील रोझ प्रदर्शनास मी जात असे. तेथे डॉ. जयंतराव पाटील यांच्याशी माझी भेट होवून विविध विषयावर चर्चा होत असे. त्यांच्या विषयी मी बरेच ऐकले होते. ते हाडाचे शेतकरी होते. त्यांना अंत: करणापासून शेतीविषयीची गोडी होती. शेतकऱ्यांच्या शेतीविषयीच्या अनेक समस्या व त्यावरील प्रत्यक्ष उपाय सुचविण्यामध्ये व लोकांच्या शंका निरसन करण्यात, मार्गदर्शन करण्यात ते पारंगत होते. कुठलीही गोष्ट किंवा सिद्धांत मांडताना त्याची पार्श्वभूमी, इतिहास आणि त्याचा व्यवहारी उपयोग (Application) कसे करता येवून ते बहुजन शेतकरी वर्गाला कसे उपयुक्त आहे हे देश - परदेशातील शास्त्रज्ञांची, थोर समाजसेवकांची उदाहरणे किंवा त्यांनी केलेले प्रयोग कसे सिद्ध केले व उपयुक्त ठरले. याचे ते मुर्तीमंत उदाहरण आपल्यासमोर उभे करत असत. जुनी पिढी, तरुण पिढी, शास्त्रज्ञ, ग्रामीण विकासातील लोक यांना प्रेरणा देणारा ते अखंड झरा होते. खरे तर मदत टेरेसा यांनी जसे स्वत:चे जीवन गरीबीसाठी अर्पण केले होते तसेच आदिवासी भागातील गरीब जनतेचा व शेतकऱ्यांचा साक्षात विकास करणारे भारताचे ते 'टॉंलस्टॉंय' होते. कोकणातील ठाणे जिल्हा, बोर्डी, डहाणू, पालघर या भागात त्यांनी हापूस व केशर आंबा, कोकम, काजू, चिकू, बहाडोली जांभूळ, लिची या विविध फळपिकांमध्ये मोठे योगदान दिले. डहाणू तालुक्यातील बोर्डीमधील भात पीक संपल्यानंतर र्सर्व शेतकऱ्यांनी विविध फळपिके लावावीत. यासाठी त्यांनी प्रोत्साहीत केले. शहरातील माणसांना कोकणातील हापूस आंबा फक्त माहित होता आणि जेव्हा हापूस दुनियेला माहित नव्हता, तेव्हा त्या - त्या ठिकाणी गावठी आंबे देशावर मुबलक प्रमाणात होत असत. परंतु केशर आंब्याचा उदय प्रथमत: भारतात गुजरातमध्ये ५० वर्षापुर्वी झाला. नंतर त्याचा प्रसार महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात तसेच कर्नाटक, मध्येप्रदेश, गुजरात या राज्यात प्रचंड प्रमाणात झाला. तर या आंब्याबद्दल डॉ. जयंतराव पाटील फार आग्रही असत. त्यांना नेहमी वाटे की, मध्यवर्गीय आणि शहरी माणूस ज्या सुख - सुविधा व मजा उपभोगतो, तशा त्या दर्जाच्या जरी नाही मिळाल्या तरी त्याच्या ५०% तरी सुविधा गरीब शेतकऱ्यांना मिळाव्यात अशी त्यांची अंतरी तळमळ असे. याकरिता केशरआंबा, जांभूळ, करवंदे या रानमेव्याची शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर लागवड करून त्याचा आपल्या आहारात वापर करावा. त्यासाठी गरीब व आदिवासी लोकांना ते कायम प्रेरणा देत असत.

पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि महारष्ट्रात त्यावेळेस सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. तेव्हा एकावेळेस दिल्लीला जाताना विमानात नरसिंहरावांच्या सुधाकरराआदि नाईक यांना विचारले की, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील एका जाणकाराचे नाव तुमच्या लक्षात आले तर मला सांगा, कारण त्यांना भारताच्या नियोजन अयोगावर नेमायचे आहे. तेव्हा सुधाकरराव नाईक यांच्या डोळ्यासमोर एकमेव नाव डॉ. जयंतरावांचे आले. कारण वसंतराव नाईक हे त्यांच्या उरुळीकांचनच्या द्राक्ष शेतीवर डॉ. जयंतराव पाटील यांना मार्गदर्शनासाठी बोलवित असत. त्यावरून त्यांनी डॉ. जयंतरावांचे नाव सुचविले. मग दिल्लीला नरसिंहराव पोहचल्यावर त्यांनी त्यांच्या सचिवाला ह्या नावाची आकाशवाणीवर घोषणा करण्यास सांगितले. तेव्हा त्या सचिवानी डॉ. जयंतराव पाटलांना फोनवर संमती विचारली. तेव्हा जयंतराव म्हणाले, अगोदर तुम्हाला मी माझा बायोडाटा पाठवितो. तेव्हा सचिवानी त्यांना सांगितले, पंतप्रधानांनीच तुमचे नाव सुचविले आहे. त्याची आकाशवाणीवरून घोषणा काही वेळातच व्हायची आहे. तेव्हा तुमची फक्त संमती मागतो आहे. हा किस्सा त्यांनी मला दिल्ली येथे त्यांच्या घरच्या भेटीत सांगितला. मला जेव्हा पहिले आंतरराष्ट्रीय विकासरत्न अॅवार्ड मिळाले. तेव्हा डॉ. जयंतराव पाटील त्या कार्यक्रमास अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्या - ज्यावेळी माझे दिल्लीला जाणे होई तेव्हा त्यांची - माझी आवर्जुन भेट होत असे. त्यांना नवीन तंत्रज्ञान व गरीब शेतकऱ्यांविषयी संशोधन करणाऱ्यांविषयी फार आपुलकी होती. त्यांना आम्ही 'कृषी विज्ञान' मासिक नियमित पाठवित असू. तेव्हा त्यांनी माझे १६ जानेवारी २००२ ला पत्र पाठवून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्यांना 'कृषी विज्ञान' ऑक्टोबर २०१४ चा अंक मिळाल्यावर माझ्या संशोधनाची पावती त्यांनी १७ ऑक्टोबर २०१४ ला पत्र लिहून "हे मासिक किती उपयुक्त आहे आणि तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांची उत्पादकता वाढते, हे वाचून तंत्रज्ञान तुम्ही शेतकऱ्यांत प्रत्यक्ष रुजवता हे अत्यंत महत्त्वाचे आहे" असे मला पत्राद्वारे मुद्दाम कळविले. त्याच बरोबर पत्रामध्ये मुद्दाम उल्लेख केला की, "२५ वर्षापुर्वी तुम्ही दिलेल्या 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याच्या बियाचे झाड लावले ते अद्यापही डिसेंबर ते मे असे उत्पन्न देते." मी २५ वर्षापुर्वी जेव्हा शेवग्यावर संशोधन सुरू केले तेव्हा शेवगा हा तिसऱ्या जगातील गरीब राष्ट्रांतील शेतकऱ्यांचा कल्पवृक्ष आहे. त्यांनी पत्रात तसाच शेवगा हा भाजीपाल्याचा कल्पवृक्ष आहे असा उल्लेख करून हे पोषणाचे वर्ष असल्याने त्याचा महाराष्ट्रभर प्रसार करावा असे सुचविले. हे पत्र मिळताच मी लगेच त्यांना फोन केला, तर अर्धा तास आम्ही वेगवेगळ्या विषयवार चर्चा करीत होतो. ते नेहमी वडीलकीच्या नात्याने चांगला सल्ला देत व चांगल्या कामासाठी पाठीवर थाप देत. त्यांनी या पत्रात 'कृषी विज्ञान' च्या अंकात अमेरिकेची सोयाबीनची हेक्टरी उत्पादनकता ही भारतातील सरासरीपेक्षा जास्त आहे, हे वाचल्यानंतर त्यांनी मला भारतातील शेतकऱ्यांची उत्पादकता आपल्या तंत्रज्ञानाने सुधारावी, असे सुचविले. त्यावर मी गलेच डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने गेल्या १५ ते २० वर्षापासून सोयाबीनचे एकरी १८ ते २२ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या सांगली जिल्हातील शेतकऱ्यांचे संदर्भ पुढील अंकात प्रसिद्ध केले.

दिल्लीवरून डॉ. जयंतराव निवृत्त झाल्यानंतर ते मुंबईला राहत असत. तेव्हा आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने जो आम्ही २००२ ला पुण्यामध्ये कार्यक्रम घेतला होता त्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून दिवसभर हजर राहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यक्रमास आलेल्या प्रगतीशील शेतकऱ्यांना, तंत्रज्ञाना, शास्त्रज्ञांना, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना त्यांनी मार्गदर्शन केले, त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा, तंत्रज्ञांचा सत्कार केला. हा २ दिवसांचा कार्यक्रम त्यांना फार आवडला. एकदा एका कॉन्फरन्समध्ये भाभा अणुशक्ती केंद्रावर डॉ. शरद काळे, जैव तंत्रज्ञान शास्त्रज्ञ यांनी मला व डॉ. जयंतरावांना बोलविले होते. तेथे आम्ही दोघे प्रमुख अतिथी होतो. तेथे भाभा अणुशक्ती केंद्राने विकसित केलेला बायोगॅस प्लँट त्यांनी आम्हाला दाखविला व जेवणानंतर शास्त्रज्ञांच्या एका परिषदेचे अध्यक्षस्थान भुषविण्यासाठी मला काळेंनी विनंती केली. त्यात अनेक शास्त्रज्ञांनी आपले पेपर सादर केले. त्यांना मार्गदर्शन केले. एकदा डहाणूला माझे चिकूवर भाषण होते तेव्हा त्यांना फोन केला की मी डहाणूला आलो आहे. तेव्हा बोर्डीला त्यांना भेटायला गेलो व आदरातिथ्य झाले. तेथे १ ते १।। तास शास्त्रीय चर्चा व कौटुंबिक गप्पा झाल्या.

डॉ. जयंतराव पाटील यांच्या कार्यावर महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे व बोर्डीचे आचार्य भिसे यांच्या विचारांचा पगडा होता. कृषी क्षेत्रातील विकास, ग्रामीण विकास, फळबागांतील उत्थान, बहुवर्षीय फलोत्पादन भारताला कसे वरदान आहे हे त्यांनी भाषणातून सांगितले नाही तर ते नियोजन मंडळाचे सभासद असताना त्यांनी नवीन लागवड व संवर्धन याविषयी प्रचंड कार्य केले व जनजागृती मोठ्या प्रमाणात केली.

डॉ. बोरलॉग यांनी ज्या अमेरिकन बुटक्या गव्हाच्या जाती अथक परिश्रमातून शोधून काढल्या, यामुळे जगातील व भारत देशातील भूक मिटली व भारताची अन्नधान्याची उत्पादकता वाढून अत्यावश्यक अन्नधान्याची आयात थांबली. भारत अन्नधान्य निर्मितीत स्वावलंबी झाला. याचा डॉ. बोरलॉग यांचा ते आदराने उल्लेख करीत असत. डॉ. स्वामीनाथन यांच्या धोरणात्मक विचारांबद्दल त्यांच्या संशोधन कार्याबद्दल, सरकार व जागतिक पातळीवर विशेषकरून गरीब व ग्रामणी भागातील लोकांसाठी सुचविलेले उपाय किती दूरगामी परिणाम करणारे आहेत. ह्याचा डॉ. जयंतराव त्यांच्या लिखाणातून मुद्दाम उल्लेख करीत असत.

देशभरातील शेतीचा त्यांचा सखोल अभ्यास होता. शेतीअभ्यासाच्या अनुषंगाने ते जगभर फिरले. त्यांच्या कृषी व ग्रामीण पुनर्रचनेच्या कार्याबद्दल डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने १९८१ मध्ये त्यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही मानद पदवी प्रदान केली. महाराष्ट्र शासनाने २००३ यावर्षी 'कृषीरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार देवून गौरविले होते. ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची कृषी व फलोत्पादन क्षेत्रात ३५ वर्षाहून अधिक काळ सेवा केल्याबद्दल त्यांना १९७९ मध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या 'जमनालाल बजाज' पुरस्काराने सन्मानित केले. डॉ. पाटील यांनी कृषी औद्योगिक समाज रचनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठानने १९९८ मध्ये त्यांना 'यशवंतराव चव्हाण' पुरस्काराने गौरविले. कृषी क्षेत्रातील साहित्याबद्दल वसंतराव नाईक प्रतिष्ठानने 'वसंतराव नाईक' पारितोषिकाने सन्मानित केले.

त्यांनी दिलेले विचार, कृती ही केंद्र सरकारने व राज्यसरकारने जर तंतोतंत पाळून कृतीत उतरविली तर शेतीची आताची आतबट्ट्याची परिस्थिती आहे ती हळूहळू कमी होवून शेतकरी कर्जमुक्त होवून सुखाचे २ घास खाईल, हीच डॉ. जयंतरावांना खरी आदरांजली ठरेल. 'कृषी विज्ञान' परिवारातर्फे त्यांना मानाचा मुजरा !