धवलक्रांतीच्या सुर्याचा अस्त !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये जेव्हा स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले त्या काळात भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होता. त्याकाळी एलोमिलो लाल ज्वारी पी.एल. ४८० च्या कारारानुसार ती अमेरिकेतून येत असे. त्याकाळी आजाच्या फक्त एक तृतीयांश लोकसंख्या असताना दूध हा पदार्थ पूर्णान्न असले तरी ती सुविधा श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय लोकांना होती. ६० ते ७० % गरीब जनता यांना दुधाचा रंग पांढरा असतो एवढेच माहीत होते. पण त्यांना चव माहीत नव्हती. त्याकाळी पाहुणचारातित्यार्थ गुळपाणी दिले जात असे.

१६ व्या शतकात ब्रिटिश आल्यानंतर निलगिरी, दार्जीलिंग आणि केरळ या ठिकाणी डोंगर उतारावर चहा उत्तम प्रकारे येवू शकतो हे त्यांनी अनुभवले आणि इथल्या कापसाबरोबर ते चहा कच्चा माल म्हणून निर्यात करू लागले. भारतामध्ये चहा लोकांनी प्यावा याकरिता चहाची बुकणी वाणी साखरेत वरून फुकट हातावर टाकू लागला, ही गोष्ट १९३५ सालची आणि मग ब्रिटिशांनी भारतीयांना चहाची चटक लावली.

स्वातंत्र्यानंतर २० ते ३० वर्षे गुळाचा काळा कुळकुळीत कोरा चहा लोक पिऊ लागले. कारण त्याकाळी जनावरे ही फक्त कामाचीच होती. मध्यमवर्गीय दुधाच्या गाई व म्हशी पाळणारे गावात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते. जसे मधल्या काळात घरामध्ये फ्रिज, टिव्ही प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात होते तसे त्याकाळी घरामध्ये दूध असणे हे एक प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात असे. त्या काळामध्ये न दूध डेअऱ्या होत्या न दुधाचे संकलन (कलेक्शन) होत असे.

भारतातील अनेक मुले स्वातंत्र्यपुर्व काळात आणि नंतरच्या १९५५ ते ६० या काळात कुपोषणाने दगावत असत. ही देशाची हलकीच्या परिस्थितीची दुर्गम वाट याचे डॉ. वर्गिस कुरियन यांनी वयाच्या २८ व्या वर्षी अमेरिकेतून शिक्षण पुर्ण करून आल्यानंतर संधीमध्ये रूपांतर केले. त्यांनी १२ मे १९४९ रोजी आणंद येथील सरकारी मलई संशोधन संस्थेत आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली आणि आणंद ही देशाची दुधाची राजधानी ठरली. पण त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 'अमूल' डेअरीचा श्रीगणेशा झाला. आज 'सहकार म्हणजे स्वहाकार' अशी शिवी झाली आहे. परंतु स्वातंत्र्य मिळण्याच्या काळामध्ये सर्व थोर पुरूष आणि तरुण पिढी मुले - मुली स्वातंत्र्याच्या प्रेमाने झापटले होते. त्यांना स्वहाकाराचे शेण शिवले नव्हते. म्हणून सहकाराची संकल्पना देशसेवेच्या भावनेतून रुजविली जात असे आणि या संज्ञेचा वापर डॉ. कुरियन यांनी योग्य पद्धतीने अतिशय खुबीने केला. तेव्हापासून अमूल डेअरीच्या दुधाचा चंद्र डॉ. कुरियन यांच्यामुळे चंद्रकलेसारखा वाढतच राहिला आणि अमूल दूध हा देशाचा ब्रँड झाला. पंडित नेहरूनंतर १९६५ मध्ये लालबहादूर शास्त्री हे देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी अमूलच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला व डॉ. कुरियन यांना राष्ट्रीय दूध विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी दिल्ली येथे आमंत्रित केले. ही मोठी संधी आजच्या काळामध्ये कुणीही हसत स्विकारली असती आणि ती कॅशसुद्धा केली असती, परंतु डॉ. कुरियन यांनी लालबहादुर शास्त्री यांना सांगितले की, माझा गुजरातमधला दुधाचा शेतकरी माझ्यापासून वंचित होईल. मी दिल्लीत राहिलो तर मला त्याला मदत करता येणार नाही आणि इथे दिल्लीमध्ये मला शेतकरी दिसणार नाही व मी वंचित होईल. हे सडेतोड उद्गार शास्त्रीजींनी ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की या माणसाला गरीबांविषयी व शेतकर्‍यांविषयी फार कणव आहे आणि त्यांनी डॉ. कुरियन यांच्यासाठी राष्ट्रीय दूध विकासाचे कार्यालय आणंद येथे हलविले. शास्त्रीजींच्या या धाडसी निर्णयाने वर्गिस सुखावले व त्यांनी आपले जीवन ६ ते ७ दशके या कार्यासाठी झोकून दिले. आणंद येथे त्यांनी नेतृत्वाची धुरा स्विकारल्यानंतर धवलक्रांती (ऑपरेशन फ्लड) नावाची धडक योजना सुरू केली आणि प्रथिनयुक्त चाऱ्याची उत्पादन वाढून ते गाई - म्हशींना देऊन अधिक प्रथिनयुक्त दुधाचे उत्पादन वाढवून भारत हा अवघ्या ४ ० वर्षात सहकारी तत्वाने जगात सर्वाधिक दूध उत्पादक करणारा देश ठरला. जे व्यापारी शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला भाव देण्यासाठी नाडत होते ते पाहून वर्गिस दुखावले आणि त्रिभुवनदास पटेल यांनी खेडा जिल्ह्यातील हितासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांची स्थापना केली. या संघांची स्पर्धा पोल्सन डेअरीशी होती आणि तेथे शेतकरी नाडला जात असे. खेडा जिल्हा दूध उत्पादक संघाचे कार्य वाढविण्यासाठी आणि दुधावरील प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी डॉ. कुरियन यांना इंजीनिअरची ऑफर दिली व ती त्यांनी शिरसावंध्य स्विकारली आणि यातून खेडा जिल्हा हा दूध संघ 'अमूल' डेअरी बनला.

दुधाची धवलक्रांती ही संकल्पना जागतिक बँकेला पटली व राष्ट्रीय दूध संघाला २०० कोटीचे कर्ज ३ टप्प्यात भारताला दिले. याचा फायदा असा झाला की, यापरियोजनेमुळे दरवर्षी भारताला दुधाच्या उत्पन्नातून ४० हजार कोटी मिळू लागले. दुधाच्या हजारो सहकारी संस्था डॉ. कुरियन यांनी स्थापन केल्या आणि जेवढी या देशामध्ये हरित क्रांती महत्त्वाची ठरली, तितकीच महत्त्वाची दुधाची श्वेत - धवल क्रांती डॉ. कुरियन यांच्यामुळे ठरली व तिचे ते जनकाच जनकच झाले.'डॉ. कुरियन = अमूल ब्रँड = आणंद डेअरी = देशाची धवल क्रांती' असे जणू देशाचे समीकरणच झाले. त्यामुळे 'अमूल ब्रँड' हा जगभर ओळखला जाऊ लागला. अमूल हे शेतकऱ्यांचे, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनि सहकारी तत्वावर चालविलेले जगातील पहिले मॉडेल झाले.

भारतासारख्या खंडप्राय देशाला गाईच्या दुधापेक्षा चहामध्ये म्हशीचे दूध हे जास्त स्निग्ध पदार्थ असल्याने ते प्रसिद्ध झाले व सर्वसामान्य माणसामध्ये या म्हशीच्या दुधाला मागणी वाढू लागली. जगभर विलायती गाईच्या दुधापासून भुकटी करू लागले. परंतु भारतीय दुग्ध व्यवसायासाठी उत्तरेकडील कुंडी, मुर्‍हा, जाफराबादी या अधिक दूध देणार्‍या म्हशी व्यापारी तत्त्वावर पाळू लागले. यामध्ये भैये लोक तरबेज झाले. मात्र मध्यमवर्गीय भारतीय शेतकरी सुरती व पंढरपूर या कमी खाणार्‍या व अधिक दूध देणार्‍या म्हशींची जोपासना करू लागले. तसेच काँक्रेज, खिल्लार, काठेवाडच्या गीर गाई काही भाविक शेतकरी औत कामासाठी आणि देशी दुधातील सत्व जोपासून संवर्धन करून त्याचा आपल्या आहारामध्ये वापर करू लागले. डॉ. कुरियन यांनी देशभर लाखो व्यापारी म्हशीचे अधिक दूध उत्पादन पाहून या अतिरिक्त दुधाचे पावडरमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन केले आणि तेथून अतिरिक्त दुधाची पावडर करण्यात ते यशस्वी ठरले.

१९५५ साली अशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी दूध संस्था म्हणून प्रतिदिन २० हजार लि. दूध जमा होऊ लागले. अशा रितीने जगात प्रथम म्हर्शीच्या दुधाची पावडर डॉ. कुरियन यांच्या प्रयत्नातून यशस्वी झाली. या कामाची देशातील तज्ज्ञांनी दखल घेऊन १९६३ मध्ये फिलिपाईन्सचा मॅगसेसे, ६५ मध्ये पद्मश्री, ६६ मध्ये पद्मभूषण, ९९ मध्ये पद्मविभूषण हे नागरिक पुरस्कार त्यांना मिळाले. खरे तर या महान कार्यासाठी भारत सरकारने त्यांना अगोदरच भारतरत्न द्यायला हवे होते. कारण ते या कामामुळे विश्वरत्न झाले होते. ते 'नोबेल' न होता 'ग्लोबल' झाले होते. कारण त्यांना ६५ साली मिशिगन विद्यापीठने डी. एस्सी., १९८६ साली वॉटरल शांती पुरस्कार, ८९ साली वर्ल्ड फ्रुड प्राईज पुरस्कार २००६ मध्ये तामिळनाडू कृषी विद्यापीठची डी. एस्सी., २००७ मध्ये गॉडफ्रे फिलिप्स साहस पुरस्कार, २०१० मध्ये कारुण्य विद्यापीठाची डी. एस्सी., २०११ मध्ये सीएनएन आयबीएनचा जीवन गौरव पुरस्कार, २०१२ मध्ये गंगाधारण स्मृती पुरस्कार असे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार या महान कर्मयोग्याला प्राप्त झाले होते. ते त्यांच्या तत्वाशी आणि कार्याशी पुर्ण समरस झालेले असत आणि अचूक निर्णय घेवून काटेकोर नियोजन करून ते कार्य यशस्वी पार पाडण्यमध्ये तरबेज होते.

खरेतर डॉं. कुरियन यांच्या कार्यापुढे 'नोबेल' सुद्धा कमीच आहे, हे या धवलक्रांतीच्या विकासाचा सुर्य मावळतीला गेल्यावर आता साऱ्या सुज्ञ जगाच्या लक्षात येईल. त्यांना अन्याय आणि गरीबांचा गैरफायदा घेणारे व्यापारी किंवा नेते यांची प्रचंड चीड होती. गरीबांचे कल्याण करण्याकरिता बायबलने दिलेली शिकवण त्यांनी आपल्या जीवनात जपली होती. ते खरोखरीचे गीता जगले होते. त्यांनी दुग्धव्यवसाय सहकार प्रणालीने जे शेतकर्‍यांचे सोने केले हाच धागा देशातील नेते. शास्त्रज्ञ, विकास अधिकारी यांनी त्याचे काटेकोर पालन केले तर हा देश परत रामराज्य बनेल आणि डॉ. कुरियन यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल. अशा या थोर, महान विकास सुर्याला आमचा भावपुर्ण सलाम !