कापरीचे २।। एकरात १।। लाख रुपये

श्री. मच्छिंद्र बाळासाहेब रावडे,
मु.पो. गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे,
मो. नं. ९३०४४०३०४१


आम्ही ८ - १० वर्षापासून कापरीचे पीक घेत आहे. त्यावेळी कृषी सेवा केंद्रात जी औषधे मिळतील ती वापरत होतो. तेव्हा मालाची क्वॉलिटी सर्वसाधारणच मिळत असे.

मागील २ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरू लागलो. तर क्वॉलिटीत भरपूर सुधारणा झाली. चकाकी भरपूर येत असल्याने बाजारात चढउतार झाला तरी बाजारातील भावापेक्ष ४ रू. किलो भाव जादाच मिळतो. त्यामुळे २ वर्षापासून नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच वापरत आहे.

चालूवर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये असे प्रत्येक महिन्याला अर्धा - अर्धा एकर कपारीची लागवड केली. एका पिकाला साधारण ४ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या करतो. सुरुवातीला जर्मिनेटरच्या द्रावणात रोपे बुडवून लावतो. रोपे लवकर जीव धरतात. मार होत नाही. नंतर १५ - २० दिवसांच्या अंतराने फवारण्या करतो. तर फुटवा भरपूर होतो. हळवी वाण जुनमध्ये लावल्यावर श्रावण, भाद्रपद या महिन्यात १।। ते २ महिने चालतो. तोडा ४ थ्या दिवशी करतो. अर्ध्या एकरात ४० किलोची ४ पोटी माल निघतो. असे १२ ते १५ तोडे होतात.

गरवी वाण २।। महिन्यांनी चालू होऊन २ महिन्याहून अधिक चालतो. त्याचे तोडे तेवढेच होतात. मात्र फुलांचा आकार, वजन जादा भरते. त्यामुळे उत्पादन वाढते. मोठ्या मालाला भाव थोडा जादा मिळतो.

हळवीच्या तुलनेत गरवीची गुंडी मोठी असल्याने गरवीचे दिडपट उत्पादन वाढते.

श्रावणात भाव ३० ते ४० रू. च्या आसपास तर गणपतीत ५० ते ७० रू. भाव मिळतो. नंतर पितृपंधरावड्यात ८ ते १०, २० रू. भाव अमावस्यापर्यंत असतो. नंतर नवरात्रात ४० रू. पर्यंत भाव होतो. त्यानंतर २० ते ४० रू. सरासरी बाजारभाव राहतो. या काळात फक्त गरवी वाणाचीच फुले चालू असतात. हळवी वाण पितृपंधरावड्यात संपतो.

कापरीच्या पानांवर करपा, बुरशी हे रोग येतात. तसेच, हिरव्या आळीचा प्रादुर्भाव होतो. ती फुलांची गुंडी खाते. त्यामुळे फुलांचे नुकसान होते. परंतु वेळच्यावेळी फवारण्या केल्यावर किड - रोगाचा वेळीच बंदोबस्त होतो.

अर्ध्या एकराला लागवडीनंतर २० - २५ दिवसांनी एकदाच खत भरणी करतो. यामध्ये १०:२६:२६ किंवा १२:३२:१६ हे खत अर्ध्या एकराला १।। बॅग टाकतो. खताचा खर्च १८०० रू. आणि ५ - ६ फवारण्या किटकनाशके (दोन) व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या (चार) असा ३ हजार रू. येतो. तोडणीला घरचीच माणसे असतात.

आदल्यादिवशी ४ ते ६ वाजेपर्यंत २ तासात ३ माणसे ४० - ५० किलो फुले तोडतात. नंतर सकाळी माल मार्केटला आणतो. घरची सराईत माणसेच २ तासात एवढी फुले तोडतात. अन्यथा मजुरांकडून एवढी फुले तोडली जात नाहीत.

मजुरीस घरचीच माणसे आणि वाहतुकही स्वत: करत असल्याने तोडणी व वाहतुकीचा खर्च वाचतो. त्यामुळे एकूण अर्ध्या एकरास फक्त ५ - ६ हजार रू. खर्च येतो. मजुरी धरली तर १५ हजारापर्यंत खर्च होऊ शकतो.

उत्पन्न - बाजारभावाच्या चढ उतारानुसार सरासरी २० रू. भाव मिळतोच, तेव्हा अर्ध्या एकरात ३ महिन्यात ३० ते ४० हजार रू. होतात. पुर्ण सिझन २।। एकरात १।। लाख रू. पर्यंत उत्पन्न मिळते.