शेळीपालन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


साधारणपणे एका शेळीपासून मिळणारे दूध ४ जणांच्या कुटुंबाला पुरेसे होते. गाई - म्हर्शीच्या तुलनेत शेळीला खाद्य कमी लागते. तसेच टाकाऊ अन्न, भाजीपाला, झाडांची पाने तो खाऊ शकते. भरपूर चारा व सकस खाद्य दिल्यास शेळी १४ महिन्यांतून दोनदा पिले देते. नरपिले (बोकड) ६ महिन्यानंतर विक्रीसाठी तयार होतात. तर मादी पिल्ले ६ महिन्यात वयात येतात. शेळीच्या कातड्यांना उत्तम बाजारपेठा मिळते. पश्मीना अंगोरा, गद्दी जातीच्या शेळ्यांच्या केसांपासून लोकरीचे कपडे तसेच शाली तयार होतात. शेळी इतर प्राण्यांच्या मानाने फार काटक आहे. तिला रोगराई कमी होते. गरिबाची गाय म्हणून व स्वयंरोजगाराचे एक साधन म्हणून शेळी फार उपयुक्त प्राणी आहे. शेळीपालनासाठी ५० माद्या व २ नर यांपासून सुरुवात करावी.

शेळ्यांच्या उत्तम जाती : दूध व मांस देणाऱ्या शेळ्यांच्या जातींमध्ये उस्मानाबादी, बारबेदी, जमनापारी (उत्तरप्रदेश) मलबारी, मेहसाना व झालावाडी (गुजरात), बीटल (पंजाब), सिरोही, अजमेरी, कच्छी (राजस्थान) या जाती आहते. महाराष्ट्रातील उस्मानाबादी व संगमनेरी या शेळ्या मांस व दुधासाठी प्रसिद्ध आहेत. उस्मानाबादी जातीच्या जातीवंत शेळ्या मुखेड (मराठवाडा) येथे वेगवेगळ्या दिवशी भरणाऱ्या बाजारात उपलब्ध होतात. मुंबईच्या जवळ कोण (कल्याण) गावात दर मंगळवारी व शनिवारी भरणाऱ्या बाजारात मराठवाड्यातून येणाऱ्या जातीवंत उस्मानाबादी जातीच्या शेळ्या मांसासाठी प्रसिद्ध असून या जातीमध्ये जुळे, उतिळे होण्याचे प्रमाण जास्त आहे. या शेळ्या भराभर वाढतात व दीड वर्षाच्या कालावधीत ४० ते ५० किलो वजन भरू शकते. जातीवंत उस्मानाबादी शेळ्यांचा रंग काळा असून शिंगे मागच्या बाजूस वळलेली असतात. तर कान लांब असून त्यावर पांढरे ठिपके असतात.

मांस उत्पादनासाठी आसाम डोंगरी, काळी बंगाली तपकिरी बंगाली, मारवाडी (राजस्थाय) काश्मिरी, गंजभ (ओरिसा) या जाती चांगल्या आहेत. लोकर निर्माण करणाऱ्या जातीत अंगोरा गद्दी (हिमाचल प्रदेश), पश्मिना (काश्मिर) या जाती आहेत.

बंदिस्त शेळीपालन : शेळ्यांना फार खर्चिक गोठ्याची आवश्यकता नसते. असलेले साहित्य अथवा कमी खर्चाचे साहित्य वापरून छपराचे गोठे बांधल्यास ते ५ ते ६ वर्षे टिकतात. याकरिता सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या साहित्यावर भर दिला जाऊ शकतो. (उदा. बांबू, लोखंडी पाईप इ.) तसेच छपरासाठी गवत वा इतर कामासाठी उपयोगात न येणाऱ्या कौलारू छताचा उपयोग आर्थिकदृष्टया परवडणारा ठरू शकतो.

गोठे उंचावर बांधणे आवश्यक असते. गोठ्याची दिशा ठरवताना दक्षिण - उत्तर अथवा पूर्व - पश्चिम बाजूने ठेवल्यास सकाळी व सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो. तसेच उपलब्ध असलेल्या वैशिष्ठ्यपुर्ण सुर्यकिरणामुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते. प्रत्येक शेळीला १० ते १२ चौ. फुट जागा मिळाली पाहिजे. गोठ्यांच्या आजूबाजूला मोकळी जागा असावी व ह्या जागेत शक्यतो सुबाभूळसारखी झाडे लावावीत. ह्या झाडाचा उपयोग सावली, शुद्ध हवेव्यतिरिक्त पाल्याचा वापर शेळीचे खाद्य म्हणून करता येतो.

बंदिस्त शेळीपालनासाठी सर्वसाधारणपणे ५० शेळ्यांचा कळप हा फायदेशीर ठरतो. साधारणत: २५ ते ३० माद्यांकरिता एक नर ठेवल्यास पुरे होते. असे नर एक ते दीड वर्षाचे असावेत. मादीचे वय एक वर्षाचे असावे.

बंदिस्त पालनात गोठ्यात पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था सिमेंटच्या अर्धगोल पाईपाद्वारे करावी. हे पाईप चुन्याने रंगविल्यास पाण्यातून होणाऱ्या जंतुचा प्रादुर्भाव टाळता येतो. वयोमानाप्रमाणे शेळ्यांची/ बोकडांची व लहान करडांची व्यवस्था करावी. आजारी व सांसर्गिक रोग झालेल्या (उदा. फुफ्फुसाचा रोग, जंत इत्यादी) शेळ्या ताबडतोब वेगळ्या कराव्यात. नवीन जन्माला आलेल्या करडांना मृत्यू येण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना वेगळे ठेवणे आवश्यक आहे.

शंभर शेळ्यांच्या कळपाकरिता चार वेगवेगळे बंदिस्त पिंजरे बांधावेत. हे पिंजरे जमिनीपासून ३ - ४ फूट उंच असावेत. यात दीड ते दोन फूट भिंत बांधून त्यावर बांबूनी विणलेली जाळी लावावी. शेळीच्या पायाखालील बांबूचे अर्धे कापलेले तुकडे एकमेकापासून अर्धा इंच अंतरावर ठेवावेत. म्हणजे शेळ्यांचे मलमूत्र या फटीतून जमिनीवर पडेल. त्यामुळे ओलावा राहणार नाही व मलमूत्राच्या येणाऱ्या अतिशय उग्र वासापासून सुटका होऊ शकेल. शक्यतो अशा पिंजऱ्यात लोखंडी जाल्या वापरू नयेत. कारण शेळ्यांना माणसाप्रमाणे धनुर्वात होऊ शकतो. पंचवीस शेळ्यांकरिता ३० फूट लांब व १५ फूट रुंद जागा मुबलक होते. हिरवा चार व सुके गवत चारही कोपऱ्यावर २ ते ३ फूट उंचीवर टांगून ठेवावे. यामुळे शेळ्यांना नौसर्गिक खाण्याच्या पद्धतीचा वापर करण्याची संधी प्राप्त होऊन शेळ्या पोटभर खाऊ शकतात. शेळ्यांना २०० ते २५० ग्रॅम खुराक द्यावा लागतो. गव्हाणीसाठी ५ - ६ इंच खोली आवश्यक आहे. व अशा गव्हाणी दीड ते दोन फूट उंचीवर ठेवल्यास खुराकाची नासाडी न होता शेळ्या व्यवस्थितपणे खाद्य खाऊ शकतात.

शेळ्यांचे प्रजनन : शेळ्या साधारणत: ७ ते १० महिने वयाच्या असताना माजावर येतात. परंतु वय व वजन हे महत्त्वाचे असल्याने मादीचे वय १४ ते १६ महिने असताना व वजन २२ ते २४ किलो असतान पैदाशीसाठी त्यांचा वापर केल्यास फायदेशीर ठरतो. माद्या वर्षातील कोणत्याही महिन्यात माजावर येऊ शकतात. साधारणत: मार्च ते जून ह्या काळात माद्या जास्त प्रमाणात माजावर येतात व त्या कालावधीत फळल्यास गर्भ टिकण्याचे प्रमाण जास्त असते.

काही शेळ्या नुसताच माज दाखवत असतात. परंतु नर बरोबर असा मुका माज तो नीटपणे ओळखू शकतो व फळवणे सोपे जाते. म्हणून च शेळ्यांच्या कळपात नर असणे आवश्यक आहे.

शेळीच्या पैदाशीबाबत सर्वसामान्य माहिती:

१) वयात येण्याचा काळ ७ ते १० महिने

२) प्रथम गाभण राहतानाचे वय १४ ते १६ महिने

३) प्रथम गाभण राहातानाचे वजन २२ ते २४ किलो

४) गाभण काळ १४५ ते १५० दिवस

५) दोन वेतातील अंतर ७ ते ९ महिने

६) जुळ्यांचे प्रमाण ३० ते ३५ टक्के

७) तिल्यांचे प्रमाण १० ते १२ टक्के

८) पिल्ल्यांचे प्रमाण ४ ते ५ टक्के

९) शेळ्यांचे उत्पादक आयुष्य ७ ते ८ वर्षे

१०) करडांचे मृत्यूचे प्रमाण १० ते १२ टक्के

११) शेळ्यांचे मृत्यूचे प्रमाण १० ते १२ टक्के

१२) दरवर्षी विण्याचे प्रमाण ९० टक्के

१३) दोन वर्षातून विण्याचे प्रमाण ३ ते ७ टक्के

१४) नर व मादीचे प्रमाण २५ ते ३० माद्यांकरिता १ नर

१५) नर व मादी जन्माचे प्रमाण १:१

१६) नाडी ७० ते ७५ प्रति मिनिटास

१७) श्वासोच्छवास २० ते२५ प्रति मिनिटास

गाभण शेळीची निगा : शेळीला बरेच वेळा दोन ते तीन करडे होतात. तेव्हा गर्भाची वाढ व स्वत:चे पोषण यासाठी शेळीला अधिक सकस चारा व तयार खाद्य देणे फार जरूरीचे असते. शेळी विण्यास एक महिना असताना दूध काढणे बंद करावे व या काळात त्यांना २०० ते २५० ग्रॅम खाद्य द्यावे. त्यामुळे गर्भावी वाढ चांगली होते. साधारणत: शेळी वीत असताना फार कमी वेळा अडचणी येतात, परंतु अडचणी आल्यास पशुवैद्यकाकडून सोडवणूक करून घेऊन त्यांना धनुर्वात न होण्याकरिता इंजेक्शन द्यावीत. नवजात पिल्लास शेळी चाटून स्वच्छ करते व न केल्यास त्यांना पोत्याने पुसून स्वच्छ करावे.

नाकातोंडातील घाण हाताने काढावी. थोड्याच वेळात पिल्लू उभे राहण्याचा प्रयत्न करते. तसे उभे करून त्याला त्वरित कच्चे दूध (चीक) पिण्यास कासेजवळ सोडावे. दूध काढण्यापुर्वी शेळीच्या मांडीवरील व कासेवरील लांब केस कापावेत. कास पाण्याने धुवावी म्हणजे दुधाला वास येणार नाही.

शेळ्यांचा आहार : शेळ्या प्रामुख्याने मटन (मांस) व दूध मिळविण्याकरिता पाळल्या जातात. यासाठी रोज लागणाऱ्या अन्न घटकांची गरज ही वेगवेगळी असते. साधारणत: मटणासाठी पाळलेल्या शेळ्या त्यांच्या वजनाच्या ३ - ४ टक्के एवढा सुका भाग खाद्यातून खातात, तर दुधाच्या शेळ्यामध्ये हे प्रमाण ५ ते ७ टक्के असते. ज्या आहारातून शरीर पोषणाची व उत्पादनाची गरज (२४ तासांची) व्यवस्थित/ पुर्णपणे भागवती जाते, अशा आहाराला समतोल आहार असे म्हणतात.

शेळीच्या खाद्यात हिरवा चार ठेवल्यास खुराकाचे प्रमाण कमी करता येते. दिवसाकाठी ३ ते ४ किलो हिरवा चार व दीड ते दोन किलो वाळलेली वैरण दिल्यास त्यांची वाढ नीट होते. शेळीला तिच्या वजनाच्या प्रमाणात प्रत्येक दिवशी ६ ते ७ टक्के शुष्क पदार्थ लागतात.

शेळ्यांच्या कोठीपोटीचा आकार लहान असल्याने त्यांना दिवसातून ३ - ४ वेळा खाद्य देणे आवश्यक आहे. शेळ्यांना प्रथिनयुक्त द्विदल जातींचे हिरवे ओले किंवा सुके गवत उदा. ल्यूसर्न,बरसीम, चवळी इत्यादी आवडते. त्या जंगलात वाढलेले व वाळलेले गवत शक्यतो खात नाहीत. दूध देणाऱ्या शेळ्यांना त्यांच्या आंबोणात (खुराकात) मीठ असलेले खनिज मिश्रण २ टक्के या प्रमाणात वापरावे. प्रथिनयुक्त द्विदल गवत उपलब्ध नसल्यास आयोडीनयुक्त मीठ व डाय - केल्शीयम फॉस्फेट समभाव घेऊन यांचे मिश्रण द्यावे. शेळीच्या जीवनात पोषणाच्यादृष्टीने काही महत्त्वाच्या अवस्था (काळ) असतात. त्या काळात शेळ्यांची अन्नघटकांची गरज वाढते. म्हणजेच पर्यायाने आपण त्या काळात त्यांना पौष्टिक / समतोल आहार देणे फारच आवश्यक आहे. आहाराचे दोन भाग असतात. वैरण व आंबोण. आंबोण म्हणजे प्रथिने, ऊर्जा पुरवणारे खाद्य घटक म्हणजे वेगवेगळी धान्ये (उदा. मका, ज्वारी, बाजरी, ओट, नाचणी) व त्यांचे दुय्यम पदार्थ (उदा. कोंडा व पॉलिश गव्हाचा कोंडा वगैरे.) प्रथिने पुरवण्याकरिता वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडीचा (उदा. शेंगदाण, तीळ, सरकी सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरे, करडई) समावेश करावा. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी (तूर, चणा, उडीद चुणी इ. ) सुद्धा प्रथिनांच्या दृष्टीने उपयुक्त आहे. आंबोण मिश्रणात वापरलेल्या खाद्य घटकांची बेरीज १०० यावयास हवी. (२ टक्के खनिज मिश्रण व १० टक्के मीठ धरून) आहार तयार करण्यासाठी वर नमूद केलेले खाद्य घटक पुढील प्रमाणात वापरावेत.

लहान करडांसाठी (दोन महिन्यांपर्यंत) आहार :

धन्य/ दुय्यम पदार्थ :५० ते ६० %
प्रथिनयुक्त घटक :
२० ते ३० %
प्राणीजन्य प्रथिने : ७ ते १०%
मोठी वाढणारी करडे व इतर शेळ्यांसाठी आहार


धान्य व दुय्यम पदार्थ - २० ते ५०%
प्रथिनयुक्त खाद्य घटक - १० ते २० %
डाळचुणी वगैरे - ३० ते ३५%
गव्हाचा कोंडा - २५ ते ३५ %
वरील खाद्य घटक उपलब्ध नसल्यास करडांना, गाईच्या वासरांना वापरतात तो खुराक व इतर शेळ्यांना बाजारात उपलब्ध असलेला गाईंचा खुराक वापरत येतो.

लहान करडांचा आहार : करडे जन्मल्यावर त्यांना लवकरात लवकर मातेच चीक मिळणे आवश्यक आहे. तो तीन दिवस पाजावा. पुढे एक आठवड्यापर्यंत करडे मातेबरोबरच असू द्यावीत. त्यानंतर त्यांच्या वैरणीत एकदल व द्विदल प्रकारच्या हिरव्या ओल्या व सुक्या गवतांचा तसेच झाडा झुडूपांच्या पाल्याचा समावेश करावा. शेळ्यांना शेवरी, सुबाभूळ, पकार, गुलेर, पिंपळ, बेल, ओक, लिंबोणी, करोंदा, बिमल इत्यादी झाडांचा पाला आवडतो. हा झाडपाला तोडून आणून उंच जागेवर टांगून ठेवूनही देता येतो. तसेच गाजर, नवलकोल, मुळा इत्यादी भाजीपाल्यांचा वरचा पाला तसेच कोबी, फ्लॉवर यांची पानेसुद्धा शेळ्या वैरण म्हणून आवडीने खातात. ढब, मोथा, ब्ल्युपॅनिक, अंजन, सावनकन्क्का इत्यादी प्रकारचे गवतही शेळ्या आवडीने खातात. शिवाय जंगलात हिंडताना बाभूळ, गुलेर झरबेरी, पकाल, वड इत्यादी झाडांचा पाला, शेंगासुद्धा खातात.

दिवसातून तीन ते चार वेळा थोड्या काळासाठी करडाला दूध पिण्याकरिता मातेजवळ सोडावे किंवा बाटलीच्या सहाय्याने मातेचे किंवा गाईचे दूध पाजावे. हे दूध दिवसाला एकून ४०० मि.ली. पासून सुरुवात करून ते दिवसाला ६०० ते ७०० मि.ली. पर्यंत हळूहळू वाढवत जावे. करडे साधारणत: ७ ते ८ किलो (६ आठवडे) वजनाची होतील. नंतर हे दुधाचे प्रमाण कमी कमी करत जाऊन शेवटी साधारणत: करडे २ महिन्यांची झाल्यावर दूध देणे पूर्णपणेबंद करावे. सुरूवातील वरील दूध पहिल्या आठवड्यापर्यंत दिवासातून तीन वेळा व नंतर दिवसातून दोन वेळा द्यावे. याशिवाय ३ ते ४ आठवड्यानंतर करडांना प्रत्येकी प्रेत्येकी दररोज ५० ग्रॅम आंबोण मिश्रण व खातील तेवढी हिरवी वैरण देणे आवश्यक आहे. आंबोणाचे रोजचे प्रमाण हळूहळू वाढवत जाऊन रोज प्रत्येकी ३५० ग्रॅमपर्यंत आणावे. साधारणत: चार महिन्यानंतर वयात येईपर्यंत, मटणासाठी विकण्यापर्यंत त्यांना चांगल्या प्रकारची वैरण पुरेशी असते. ती उपलब्ध नसल्यास वैरणीशिवाय २५० ते ३०० ग्रॅम आंबोण मिश्रण करडांना मिळणे आवश्यक आहे.

गाभण शेळ्यांचा आहार : गाभण काळात चांगली वैरण मिळणे महत्त्वाचे आहे. या काळातील शेवटच्या ६ ते ८ आठवड्यात चांगल्या वैरणीबरोबरच ४०० ते ५०० ग्रॅम आंबोण देणे महत्त्वाचे आहे. याशिवाय वर सांगितल्याप्रमाणे कॅल्शियम, फॉस्फरस, मीठ असलेले मिश्रण चाटण्यास ठेवल्यास फायदा होतो. विण्यापूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर ५० टक्के अंबोण मिश्रण कमी करून त्याऐवजी गव्हाचा कोंडा तितकाच टाकावा.

दूध देणाऱ्या शेळीचा आहार : व्यायाल्यानंतर सुरुवातीला ३ - ४ दिवस गव्हाचा कोंडाच अंबोण म्हणून दिल्यास चालतो किंवा पूर्ण आंबोण मिश्रण दिले तुरीसुद्धा चालते. व्यायल्यानंतर मातेला भरपूर व चांगल्या प्रतीची वैरणी मिळणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास या काळात द्विदल जातीची वैरण देणे हिताचे आहे. वैरण चांगली नसल्यास, वैरणीशिवाय मातेला तिच्या शरीरपोषणाकरिता १५० ग्रॅम आंबोण मिश्रण व याशिवाय दुग्धोत्पादनाकरिता तयार झालेल्या प्रत्येक एक लिटर दुधाकरिता ४०० ग्रॅम आंबोण मिश्रण देणे आवश्यक आहे.

बोकडाचा आहार : पैदास काळ नसताना चांगली वैरण बोकडाला पुरेशी असते. परंतु पैदास काळात मात्र वैरणीशिवाय बोकडाला ४०० ते ८०० ग्रॅम (त्याच्या वजनानुसार) आंबोण मिश्रण देणे आवश्यक आहे.

सर्व प्रकारच्या शेळ्यांना चरण्याकरिता सोडत नसल्यास त्यांना दिलेल्या आंबोणाशिवाय, शक्य असल्यास २ - ३ किलो हिरवी ओली वैरण व खातील. तितकी सुकी वैरण द्यावी. ओली वैरण उपलब्ध नसल्यास चांगल्या प्रतीची सुकी वैरण आंबोणाशिवाय खातील तितकी द्यावी. दिवसाल द्यावयाचे आंबोण दोन वेळा विभागून द्यावे. आंबोण शेळ्या पूर्णपणे खातील याची खबरदारी घ्यावी. त्यानंतर दिरवी ओली वैरण व नंतर शेळ्या त्यांची उरलेली भूक सुक्या चाऱ्यातून पूर्ण करतील. शेळ्यांच्या आहारात हिरव्या, ओल्या वैरणीचे (ल्युसर्न, बरसीम, चवळी, झाडपाला वगैरे) विशेष महत्त्व आहे.

शेळीचे रोग व उपचार : मोठ्या जनावरांच्या तुलनेने शेळ्यांना होणारे रोग कमी प्रमाणात असतात. तरीदेखील जेव्हा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करावयाचा असतो. तेव्हा रोग होऊ नये म्हणून उपाययोजना करणाची गरज आहे. बऱ्याचशा आजाराचे मुख्य कारण म्हणजे जीवाणू, विषाणू व जंत यांचा प्रादुर्भाव होय. यात प्रामुख्याने घटसर्प, आत्रविशार काळपुळी, बुळकांड्या, फुफ्फुसाचा दाह, लाळ, खुरकत, रत्त्की हगवण, फऱ्या, यकृतकृमी बरोबरच उवा, लिखा व गोचीड या कीटकांचा उपद्रव होऊ शकतो.

असंतुलित / अनियमित व्यवस्थापन हे जनावरांना होणाऱ्या रोगांचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे योग्य व्यवस्थापन, जनावरांचे रोग टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने शेळीचे घर, स्वच्छता , खाद्य, प्रजनन, गर्भारपणातील काळजी, लहान करडांची काळजी, लसीकरण इ. बाबींचा समावेश होती.

इ. कोलाय जंतूच्या प्रादुर्भाव : आजारी करडांना ताबडतोब वेगळे ठेवावे. त्यांना मीठ व पाणी यांचे द्रावण चमच्याने पाजावे व गरम कापडात किंवा घोंगडीत गुंडाळून ठेवावे. इ. कोलाय हा जीवाणू असल्यामुळे प्रतीजैवकांचा वापर, क्षारयुक्त सलाईन, 'अ', 'ब','क', जीवनसत्वयुक्त इंजेक्शन्स यांचा वापर करणे आवश्यक आहे. प्रतिकाराशक्ती देणारा मातेचा चीक योग्य प्रमाणात पाजावा. यामध्ये करडांच्या मृत्यूचे प्रमाण १० ते ५० टक्के असते.

आंत्रविषार : करडांना हगवण सुरू झाल्यास मीठ पाण्याचे द्रावण पाजावे. त्यांना वेगवेगळे बांधून ठेवावे. म्हणजे इतरांना संसर्ग होणार नाही. सल्फा ड्रग (सल्फ डिमिडीन) हे ग्लुकोजच्या द्रावणातून शिरेद्वारे द्यावे. त्यामुळे आतड्यात तयार झालेल्या विषारी पदार्थाची तीव्रता कमी होईल. तीव्रता कमी करणारे पदार्थ उदा. चारकोलची पावडर, कॅल्शिअम इ. उपयोगी ठरतात.

गोठ्याची स्वच्छता राखा, जास्त आहार देऊ नका, ढेंगाळणाच्या करडांना ताबडतोब वेगळे काढून औषधोपचार करा. हा रोग होऊ नये म्हणून आंत्रविषार प्रतिबंधकलस चार महिने वयाच्या करडांना प्रति करडास २ मि. लि. या प्रमाणात त्वचेखाली द्यावी. एक वर्षाने प्रत्येक करडास पुन्हा तेच (बुस्टर) इंजेक्शन द्यावे. हि लस आय. व्ही. बी. पी. पुणे यांच्याकडे मिळते.
रोग   महिना   मात्रा (शेळी)   मात्रा (करडे) (६ महिन्यानंतर)  
फुफ्फुसाचा दाह   जानेवारी   २ मि.लि. कातडीखाली   २ मि.लि. कातडीखाली  
घटसर्प   मार्च - सप्टेंबर   ५ मि.लि. कातडीखाली   ५ मि.लि. कातडीखाली  
देवी   एप्रिल   कातडीवर (कानाचे टोक/शेपटीखाली   कातडीवर (कानाचे टोक/शेपटीखाली  
आंत्रविषार   मे - नोव्हेंबर   ५ मि.लि. कातडीखाली   ५ मि.लि. कातडीखाली  
बुळकांडी   मे - नोव्हेंबर   १ मि.लि. कातडीखाली   १ मि.लि. कातडीखाली  
फऱ्या   जुलै   ५ मि.लि. कातडीखाली   ५ मि.लि. कातडीखाली  
पायलाग / लाळ्याखुरकत   ऑगस्ट   ५ मि.लि. कातडीखाली   ५ मि.लि. कातडीखाली  


जंत : एकंदरीत शेळ्यामध्ये तीन प्रकारचे जंत आढळतात

१) पट्टी कृमी

२) पर्णकृमी

३) गोलकृमी

यासाठी जनावरांना पुढीलप्रमाणे औषध द्यावीत. जानेवारी ते एप्रिल दरम्यान गाभण शेळ्यांना स्ट्रायगॉलस प्रकारचे जंत होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना अलबेंडाझॉंल ५ मि. ग्रॅम प्रति किलो वजनास याप्रमाणे औषध द्यावे. एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान शेळ्यांना यकृतकृमी व पट्टीकृमी प्रकारच्या जंतांचा प्रादुर्भाव होतो. यावेळी शेळ्यांना पातळ

धनुर्वात : जनावरांस जखम असतील तर हायड्रोजन पेरॉक्साईडने स्वच्छ धुरून घ्याव्यात व प्रतिजैविक मलम लावावे. जनावरांना अंधाऱ्या व शांत जागेत ठेवावे. शेळीला जर केवळ तोंडाच्या स्नायूंचा ताठरपणा असेल तर तिला पहिल्या व कवटीच्या मधील फोरामिना मेग्नम छिद्रातून धनुर्वात प्रतिविष सिरस ५०,००० आय. यू. या प्रमाणात दिल्यास फरक पडण्याची शक्यता आहे किंवा १,००,००० ते २,००,००० आय. यू. या प्रमाणात वरील औषधे शिरेद्वारे द्यावे. स्नायूंचा ताठरपणा घालवण्यासाठी स्नायू शिथिल करणारी औषधे द्यावीत. तसेच फिटस टाळण्यासाठी औषधांचा वापर करून पहावा.

जखमांना वेळीच औषधोपचार हा सर्वात चांगला उपचार आहे. परंतु गर्भारपणात शेळीला पहिल्या व दुसऱ्या महिन्यात अशी दोन धनुर्वात टॉंक्साईडची इंजेक्शन्स द्यावीत व पुढे वर्षभराने बूस्टर इंजेक्शन द्यावे.

संडास होतो. वजन कमी होते. खाणेही कमी होते. त्वचा निस्तेज दिसते आणि त्यांना रक्तक्षय होतो. अशावेळी शेळ्यांची संडास तपासून त्यांना फेबेंडाझॉंल ५ मि. प्रतिकिलो वजनास याप्रमाणात औषध द्यावे. जुलै ते डिसेंबर दरम्यान. शेळ्यांच्या पोटामध्ये स्ट्रायगॉलस व यकृतकृमी प्रकारचे जंत आढळून येतात. त्यासाठी शेळ्यांनी अलबेंडाझॉंल ७.५ मि. ग्रॅम प्रति किलो वजनास या प्रमाणात औषध द्यावे.

जंत अन्नद्रव्ये, अन्नरस व रक्ताचे शोषण करतात. तसेच आतड्यातील अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या ग्रंथीना इजा पोहोचवितात. त्यामुळे अनिमिया (पंडूरोग) होतो. तसेच शरीरातील लोह व धातूचे प्रमाण कमी होऊन वजनात घट होते व शरीर खंगते.

शेळ्यांवरील पिसू, गोचड्या यांचाही योग्य वेळेस बंदोबस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा या शेळीच्या अंगावर केसांच्या खाली राहून तिचे रक्त पितात. यामुळे शेळी अस्वस्थ होते व त्यांना रक्तक्षय होण्याची शक्यता असते. त्यांच्या चावण्यामुळे खाज सुटते व शेळी भिंत, खांब इ. ठिकाणी अंग घासते. अथवा शरीरावर तोंडाने खाजवते किंवा चावा घेते. यामुळे तेथील केस गळणे, जखमा होणे इ. घडते. उवा, पिसू, गोचीड यांचा उपद्रव टाळण्यासाठी डेल्टोमेथिन २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून संपूर्ण अंगावर हे द्रावण लावावे. द्रावण तोंड, डोळे या ठिकाणी लाबू नये. हे द्रावण पोटात गेल्यास विषबाधा होऊ शकते. अथवा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.

शेळीपालन व्यवसायासंबंधीच्या शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.