सोयाबीन उत्पादनाचे तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो असलो तरी आपल्याला खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता आले नाही. वाढती लोकसंख्या आणि लोकांच्या राहणीमानामध्ये झालेल्या वाढीमुळे खाद्यतेलाचे उत्पादन अपुरे पडत आहे. खाद्यतेलाची आपली गरज भागविण्यासाठी दरवर्षी १००० कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करावे लागते. सोयाबीन हे भारतातील तेलबिया पिकांपैकी एक प्रमुख तेलबिया पीक असून भुईमूग आणि मोहरी नंतर याचा क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत नंबर लागतो. महाराष्ट्रामध्ये सोयाबीन प्रमुख तेलबियाचे पीक आहे. चांगल्यापैकी उत्पादन आणि भाव यामुळे सोयाबीनखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. या पिकाची लागवड मुख्यत्वेकरून सांगली, कोल्हापूर नागपूर व अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

महारष्ट्रात सोयाबीन पिकाखालील क्षेत्र दरवर्षी वाढत असून उत्पादन व उत्पादकतासुद्धा वाढत आहे. भारतातील सोयाबीनची उत्पादकता फक्त प्रति हेक्टरी १ टनापर्यंत आहे. तीच उत्पादकता महाराष्ट्रात १.४० टन प्रति हेक्टरी असून भारतात तिचा पहिला नंबर लागतो सांगली जिल्ह्यातील बऱ्याच प्रगतीशील शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून प्रति हेक्टरी ४५ ते ५० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे.

हवामान : सोयाबीन हे पीक उष्णतामानास फारच संवेदनशील आहे. या पिकाची वाढ २५ ते ३५ अंश तापमान व ५०० ते ८०० मि.मी. पाऊसमान निश्चित असलेल्या भागात होऊ शकते. सापेक्ष आर्दता ७० तक्क्यापेक्षा जास्त असल्यास बियांची उगवण व रोपांची वाढ चांगली होते. जास्तीत - जास्त फुले येउन उत्पादन वाढीसाठी २७ डी ते ३० डी. से. तापमान उत्तम असते. वरील प्रकारचे हवामान महारष्ट्रातील कोकण विभाग सोडून सर्व भागात खरीप हंगामात असल्यामुळे सोयाबीन ची लागवड खरीपातच करणे योग्य आहे.

जमीन : सोयाबीनच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, लालस, गाळाची किंवा पोयट्याची जमीन योग्य असते. जमिनीच सामू साधारणपणे ६.५ ते ८.५ पर्यंत असल्यास सोयाबीनची वाढ उत्तम होते. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी खोल जमीन, मोकळ्या हवेची, अधिक पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली. सेंद्रिय पदार्थ मुबलक असलेली व इतर अन्नघटकांचा साठा समतोल प्रमाणात असणे जरूरीचे असते. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्यास हे पीक उत्तम येते.

पूर्वमशागत : सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी भुसभुशीत जमीन अधिक चांगली असते. त्यासाठी उन्हाळ्यात जमीन खोल नांगरून पहिल्या पावसानंतर वापश्यावर कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. कुळवाची शेवटची पाळी देण्यापुर्वी शेतात हेक्टरी २० ते २५ बैलगाड्या चागले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. त्याचप्रमाणे शेतातील अगोदरची धसकटे व इतर कडीकचरा वेचून शेत स्वच्छ ठेवावे.

पाणी व्यवस्थापन : पिकाच्या वाढीच्या कालावधीत वार्षिक पर्जन्यमान ५०० ते ८०० मि.मी. निश्चित व योग्य रितीने विखुरलेले असलेले भागामध्ये सोयाबीनचे पीक उत्तम येऊ शकते. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी असते तेथे हे पीक वापश्यावर पेरून १५ ते २० दिवसांचे अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. सोयाबीनच्या पिकास फुले येण्याच्या वेळी व शेंगामध्ये दाणे भरतेवेळी पाण्याची फारच गरज असते. फवारा पद्धतीने पाणी दिले असता जमीन भुसभुशीत राहून पिकाच्या मुळ्या खोलवर जाण्यास व जमिनीत हवा खेळती राहून पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर चांगला परिणाम होतो.

सुधारित जाती : महारष्ट्रातील जमीन व हवामान यांना अनुकूल असणाऱ्या व कृषी खात्याने शिफारस केलेल्या जातींचा पेरणीसाठी वापर करावा. कृषी खात्याने शिफारस केलेल्या वाणांची ठळक वैशिष्टये तक्त्यात देण्यात आली आहेत.

अ.क्र.   जातीचे नाव   कालावधी (दिवस)   उत्पादन (क्विं. हे.)   विशेष गुणधर्म  
१.   एम.ए.सी.एस.- १३   ९० - १०५   २० - ३५   मध्यम उंचीची, पिवळ दाणा हायलम काळा , खरीपासाठी  
२.   एम.ए.सी.एस.- ५७   ८५ - ९०   २५ - ३०   लवकर येणारी, खरीप व उन्हाळी हंगामासाठी आंतरपीक म्हणून योग्य  
३.   एम. ए. सी. एस. - ५८   ९० - १००   २५ - ३५   उंच वाढणारी, तेलाचे प्रमाण जास्त, खरीप हंगामासाठी  
४.   एम. ए. सी. एस.   ९० - १००   २५ -३५   उंच वाढणारी, शेंगा न फुटणाऱ्या तीन दाण्याच्या शेंगाचे प्रमाण जास्त  
५.   एम. ए. सी. एस. - ४५०   ९० - ९५   २४ -४०   मध्यम उंचीची, पिवळा दाणा, बहुतेक रोग व किडींना प्रतिबंधक, शेंगा न फुटणाऱ्या खरीपासाठी योग्य  
६.   जे. एस. -३३५   ९० - ९५   २५ -३०   लवकर येणारी  
७.   पीके -४७२   ९५ - १०५   २० - ३०   पांढरी फुले, दाणा मोठा  
८.   जे. एस. - ८० - २१   ९५ -१०५   २५ -३०   उंच वाढणारी  
९.   पूजा   १०० - ११०   २० - २५   उंच वाढणारी, पांढरी फुले  
१०.   पीके -१०२९   ९० -१००   २५ -३०   कमी उंची, तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक  


पेरणीचा कालावधी : खरीप हंगामात १०० ते १२३ मि.मी. पाऊस झाल्यानंतर पेरणी १० जूनपासून १५ जुलैपर्यंत वापश्यावर करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात थोडीशी घट येते. शकयतो सोयाबीनची पेरणी ३० जुलैनंतर करू नये.

बियाण्याची तपासणी : पेरणीसाठी प्रमाणित बियाणे वापरावे. बियाण्याची उगवणशक्ती ७० तक्क्यापेक्षा कमी असल्यास बियाणे त्याप्रमाणे वाढवावे. बियाणे प्रमाणित नसल्यास पेरणीपुर्वी एक आठवडा बियाण्याची उगवणशक्ती तपासून पहावी. बियाण्याची उगवणशक्ती ६० टक्क्यापेक्षा कमी असल्यास बियाणे पेरणीसाठी वापरू नये. बियाणाच्या चांगल्या उगवणीसाठी ५० किलो बियासाठी जर्मिनेटर ५०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १ लि. पाणी या प्रमाणात बियाण्यास अलगत चोळावे.

हेक्टरी बियाणे : सोयाबीनचे उत्पादन कमी येण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतातील झाडांची संख्या कमी असणे हे होय. सोयाबीनच्या झाडांची खंख्या प्रति हेक्टरी ४ ते ६ लाखपर्यंत असावी. झाडांची ही संख्या योग्य राहण्यासाठी हेक्टरी ७५ ते ८० किलो ग्रॅम बियाणे वापरावे. सरीवर पेरणी करावयाची असेल तर हेक्टरी ५० किलोग्रॅम बियाणे वापरावे. आडसाली उसात जर आंतरपीक म्हणून लागवड करावयाची असेल तर हेक्टरी २५ किलोग्रॅम बियाणे वापरावे. पेरणी उशिरा करावयाची वेळ आल्यास किंवा टपोऱ्या दाण्यांची जात असल्यास पेरणीसाठी प्रति हेक्टरी १० किलोग्रॅम पर्यंत अधिक बियाणे वापरावे.

भरखते : चांगले कुजलेले किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३५ बैलगाड्या उपलब्धतेनुसार पेरणी अगोदर जमिनीत टाकून कुळवाच्या पाळ्यांनी जमिनीत चांगले मिसळावे. भरखतामुळे जमीन भुसभुशीत राहून पिकाच्या मुळ्या खोलवर जाऊन पिकाची वाढ जोमदार होण्यास मदत होते.

वरखते: सोयाबीन पिकासाठी हेक्टरी १५० ते २०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्यावेळी दुचाडी पाभरीने द्यावे. त्याचाप्रमाणे हेक्टरी २० किलोग्रॅम गंधक, २५ किलोग्रॅम झींक सल्फेट आणि १० किलोग्रॅम बोरॅक्सची मात्रा पेरणीपूर्वी द्यावी.

पेरणी : पेरणी पाभरीने दोन ओळीत ३० सेंमी किंवा ४५ सेंमी व दोन झाडांत ५ ते ७ सेमी अंतर राहील अशाप्रकारे करावी. बियाणे २.५ ते ३.० सेंमी खोलीपर्यंत पेरावे. यापेक्षा जास्त खोलीवर बी पडल्यास बियांची उगवण कमी होते. सरीवर पेरणी करतेवेळी ९० सेंमी अंतरावर सऱ्या पाडून सरीच्या दोन्ही बाजूस टोकण किंवा दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी.

आंतरमशागत : तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर पीक १५ ते २० दिवसांचे असताना एक कोळपणी व २५ -३० दिवसांनी पहिली व ४० -४५ दिवसांनी दुसरी खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.

सोयाबीनवरील कीड व रोग :

१) खोडमाशी : या किडीची अळी बिनपायाची, फिक्कट, पिवळी व ३ ते ४ मि. मी. लांब असते. अंड्यातून निघालेल्या अळ्या पाने पोखरून पानांच्या शिरा आणि मुख्य शिरेमधून मुख्य फांदीत अथवा खोडात शिरतात व आतील भाग खातात. पूर्ण वाढ झालेली अळी फांदीला अथवा खोडाला माशीला बाहेर जाण्यासाठी छिद्र तयार करते. यामुळे लहान रोपे सुकतात, तसेच पाने व फांद्याही सुकतात.

२) चक्री भुंगा : या किडीची अळी पिवळसर पांढरी, गुळगुळीत, बिनपायाची असून तिच्या डोक्याकडील भाग जाड असतो. पूर्ण वाढलेली अळी १९ ते २२ मि. मी. लांब असते. चक्री भुंगेरा फांदी, देठ व मधल्या पानाच्या देठावर दोन चक्राकाप तयार करतो व त्यांच्या मधल्या भागात तीन छिद्र पाडून त्यात अंडी घालतो. कापावरील भाग वाळतो. अळी खोडातील भाग बुडापर्यंत पोखरते. त्यामुळे झाडे मोडून पडतात. परिणामी उत्पादनात मोठी घट आढळून येते. खोड माशी व चक्री भूंगा किडीचे एकात्मिक व्यवस्थापन:

* सोयाबीन पेरणीपूर्वी उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.

* मृगाचा चांगला पाऊस झाल्याबरोबर लवकर पेरणी करून घ्यावी.

* पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत, वाढीच्या अवस्थेत शेत तणमुक्त ठेवावे.

* चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त देठे आणि फांद्या वाळतात. त्यांचा अळीसह नाश करावा.

* खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाडे मरतात. अशी झाडे गोल करून नष्ट करावीत.

* रासायनिक औषध मारण्यापूर्वी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी केल्यास फायेशीर ठरते.

* पिकांचे नियमित सर्वेक्षण करून किडीने आर्थिक नुकसान सूचक पातळी ओलांडल्यास खोडमाशीसाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २० मिली किंवा अॅसिफेट ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच चक्री भुंग्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली, फेनव्हेलरेट २० टक्के प्रवाही ५ मिली या पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सोयाबीनवरील प्रमुख रोग :

१) पानावरील ठिपके

२) पानावरील मोझॅक

३) तांबेरा

या रोगांच्या एकात्मिक नियंत्रणासाठी

* कीड व रोग प्रतिकारक जातीच्या बियाण्यांची निवड करावी. (उदा. जेएस -३३५, एमएसीएम - १२४ -३)

* रोगग्रस्त शेतातील बियाणे पेरणीसाठी वापरू नये.

* पेरणीपुर्वी बियाण्यास जर्मिनेटरसोबत प्रोटेक्टंटची (आयुर्वेदिक वनस्पतीजन्य) बीजप्रक्रिया करावी.

* पीक फेरपालट पद्धतीचा अवलंब करावा.

* शेतात सुरूवातीला २ - ३ रोगग्रस्त झाडे दिसून आल्यास ती ताबडतोब उपटून त्यांचा नाश करावा.

* पानावरील मोझॅक रोगाच्या नियंत्रणासाठी या रोगाचा प्रादुर्भाव घडवून आणणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणा साठी फॉस्फोमीडॉंन ०.०२% किंवा मोनोक्रोटोफॉस ०.०५ % या किटकनाशकाची फवारणी करावी.

* तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी डायपेनकोनॅझोल ०.१ टक्के किंवा प्रोपॅकोनॅझोल (टिल्ट) ०.१ टक्के यांची फवारणी करावी. नियंत्रण झाले नसल्यास १५ दिवसाचे अंतराने अशा दोन फवारण्या कराव्यात.

सोयाबीनवरील कीड, रोगास प्रतिबंधक उपाय म्हणून तसेच दर्जेदार अधिक प्रमाणात उत्पादन मिळण्यासाठी खालीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० ते २५० मिली + स्प्लेंडर २०० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ३०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन १ लि. + २०० लि. पाणी.

काढणी, मळणी व साठवण : सोयाबीनची काढणी योग्यवेळी करणे फार महत्त्वाचे असते. कापणी लवकर केली तर अपक्व दाण्यांचे प्रमाण वाढते. तसेच कापणी उशीरा केली तर शेंगा फुटण्याची शक्यता असते. त्यासाठी सोयाबीनची पाने पिवळी होऊन शेंगा पक्व झाल्यावर पिकाची कापणी करावी. नंतर पीक विळ्याने कापून शेतातच १ - २ दिवस चांगले वाळवावे. वाळलेले सोयाबीनचे पीक खळ्यावर पसरून ट्रॅक्टरच्या चाकाखाली किंवा मळणी यंत्राच्या सहाय्याने मळणी करावी. बियांची डाळ होऊ नये म्हणून मळणी यंत्राचे आरपीएम ३५० ते ४०० पर्यंतच राहतील याची काळजी घ्यावी. मळणी झाल्यानंतर बी चांगले उफणून घ्यावे व नंतर १ -२ दिवस बियाणे उन्हात वाळवून पोत्यात साठवण करावी.

उत्पादन : वरील पद्धतीने लागवड केल्यास साधारणपणे हेक्टरी ३५ ते ४५ क्विंटल उत्पादन येते. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील काही शेतकऱ्यांची डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने हेक्टरी ४५ ते ५० क्विंटल उत्पादन काढले आहे. सोयाबीन हे अल्पकालावधीचे पीक असल्याने ऊस, कापूस, तूर, फळबाग इत्यादीत आंतरपीक म्हणून घेता येते. तसेच हे द्विदलवर्गीय पीक असल्याने फेरपालटीचे पीक म्हणून ऊस, हरभरा, गहू यासारख्या पिकाआधी घेता येते. त्यामुळे जमिनीचा कस व पोत सुधारण्यास मदत होते.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एकरी १८ ते २२ क्विंटल उत्पादन घेणारे सांगली जिल्ह्यातील वाळवा

तालुक्यात प्रगतीशील शेतकरी

श्री. शंकर जनार्दन कदम (भवानी नगर) - १८ क्विं.

श्री. प्रल्हाद भानुदास पाटील (बोरगाव) - १८॥ क्विं.

श्री. सुनिल जयकर पाटील (कासुखेड) - २० क्विं.

श्री. प्रताप बाळकृष्ण पाटील (ऐतवडे) - १९ क्विं.

श्री. विश्वास विष्णु चव्हाण (गौडवाडी ) - २१ क्विं.

श्री. प्रल्हाद रामचंद्र पाटील (रेठरे) - १८ क्विं.

श्री. नंदकुमार सुभाष पाटील (इटकरे) - १८ क्विं.