शिस्तबद्ध 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड किफायतशीर !

श्री. ज्ञानोबा प्रल्हाद दहिफळे,
मु.पो. खोडवा सावरगाव, ता. परळीवैजनाथ, जि. बीड.
मोबा. ७०६६८२८३७६



३ वर्षापुर्वी 'सिद्धीविनायक' शेवग्याचे ६ पाकिटे बी नेले होते. १५ मे २०१२ मध्ये पिशवीत 'सिद्धीविनायक' शेवगा पुस्तकात दिल्याप्रमाणे बी लावले. बियाला जर्मिनेटरची प्रक्रिया केली होती. त्यामुळे ७ दिवसात १००% उगवण झाली. रोपांवर जर्मिनेटर व बाविस्टीन ची फवारणी केली होती. पाईपळा पुढे पत्र्याची जाळी (शॉवरप्रमाणे) बसवून रोपांना पाणी देत होतो. रोपांची २५ दिवसात पुनर्लागवड केली. निचऱ्याच्या काळ्या जमिनीत ७ x ७ फुटावर १ x १ x १ चे खड्डे करून त्यात लागवड केली. एकूण १३ ओळी आहेत. १। इंच पाईपने आळ्यात पाणी देतो. आमच्याकडे उन्हाळ्यात पाणी कमी पडते त्यामुळे पाटपाणी देत नाही. तसेच ठिबक केले तर २ वर्षाच्या आत उंदरांनी पाईप कुरतडून नुकसान झाल्याचा (आंब्याच्या बागेतील) अनुभव होता. म्हणून या शेवग्याला खोडापासून १ फुटाच्या पुढील भोवतालची माती खणून २ फूट उंचीची खोडाला मातीची भर लावून बाजूने आळे तयार करून त्यात १।। इंच पाईपने पाणी देतो. शेतात पाईप लाईनला ४० - ४० फुटावर तोटी काढल्या आहेत. त्याला २० फूटी पाईप जोडून दोन्ही बाजूच्या झाडांना पाणी दिले जाते.

या शेवग्याची सुरूवातीला २ महिन्याने दर १५ दिवसाला शेंडा खुडणी केली. २।। महिन्यातच फुल लागले होते, पण ते धरले नाही. त्यानंतर झाडे ४ महिन्याची झाली असताना निघणारी फुले धरली. त्या फुलांना ५।। महिन्यात वाध्या सुटल्याच्या दिसल्या. ६ व्या महिन्यापासून शेंगा तोडण्यास आल्या. ७ व्या महिन्यापासून माल वाढला. तोडे १५ दिवसाला करत होतो. सुरुवातीला तोड्याला २ क्विंटल शेंग निघाली. नंतर पुढे माल वाढत - वाढत ८ ते १० क्विंटलपर्यंत तोड्याला माल निघत होता. झाडे पुर्ण बहारात असताना माल वाढला की, ८ ते १० दिवसाला देखील तोडा करावा लागला. पौष महिन्यात शेंगा चालू झाल्यानंतर ५ महिने म्हणजे २० मे २०१३ पर्यंत माल चांगला निघाला. त्यानंतर जमिनीपासून २ फूट उंचीवरून आडवी करवतीने खरड छाटणी केली. त्या खोडाला शेणाचा गोळा करून लावला. याचे कारण छाटणीनंतर खोडाचा वरचा भाग सुर्यप्रकाशाने वाळून पोकळ होत जातो. पुढे पावसाळ्यात त्या खोडात पाणी गेले की, झाड आतून सडते, कुजते आणि पुढे मरते. शेणकाल्याचा गोळा लावला असता तो वरचा भाग वाळत नाही. तसेच त्यात पाणी जात नाही. त्यामुळे झाडे मरत नाहीत.

छाटणीनंतर उन्हाळ्यात पाणी नसले तरी शेवग्याला फुटवे निघतात. त्यानंतर फुटव्यांची शेंडा छाटणी १५ ते २० दिवसाला करतो. पुन्हा या झाडांना भाद्रपद महिन्यात फुल लागते. दिवाळीनंतर माल लागण्यास सुरुवात होऊन पौष महिन्यापासून माल वाढून तोडे चालू होतात. हा माल पुन्हा मे अखेर (वैशाख - ज्येष्ठपर्यंत) चालतो.

त्यानंतर पुन्हा तिसऱ्या बहारासाठी वरीलप्रमाणेच छाटणी केली. त्यालाही दिवाळीत माल लागून डिसेंबरपासून तोडे चालू झाले. तोडे चालू असले तरी झाडांवर सतत १०० ते १५० शेंगा असतात. शेंग हिरवीगार २ ते २।। फूट लांबीची, मध्यम जाडीची असते. किलोमध्ये १५ ते १६ शेंगा बसतात. पोते दोन्ही बाजूने कोपून आडव्या शेंगा भरतो. (बॅरलच्या आकारचा दंडगोलाकार भोत तयार होतो) शेंगाचे पोते ४० ते ४५ किलो भरते. सुरुवातीला ८५ रू. किलोने माल विकला गेला, त्यानंतर साधारण महिन्याला १० - १२ रू. किलो मागे भाव कमी - कमी होत गेला. शेवटी मी महिन्यात २५ - ३० रू. पर्यंत भावाने शेवगा विकला गेला.

लातूर आणि परळीवैजनाथ या बाजारामध्ये मला माल विकताना असा अनुभव आला की, कोईमतूर शेवग्याची शेंग बारीक असो की लांब, त्यावर काळे ठिपके पडून शेंगेवर चिकटपणा येतो. त्यामुळे ती अत्यंत कमी (१० - १२ रू./किलो) दराने विकली जाते. अलीकडे या कोईमतूर शेवग्याच्या शेंगांची बाजारात आवक वाढत असल्याने बाजारभा खाली आले आहे. तरीही आपल्या 'सिद्धीविनायक' शेवग्याला कमीत कमी २५ रू. किलोचा होलसेल भाव मिळत आहे. शेवग्याला मी शेळ्यांचे लेंडी खत वाटून प्रत्येक झाडास जून - जुलैमध्ये २ - २ किलो देतो. तसेच १५:१५:१५ किंवा पोटॅश हे खत पावसाळ्यात प्रत्येक झाडास ओंजळभर देतो.

गेल्यावर्षी माझी प्रकृती ठिक नसल्याने मुलाला या 'सिद्धीविनायक' शेवग्याची ४ पाकिटे आणण्यास पुण्याला पाठविले होते. त्या झाडांचादेखील पहिला बहर आता संपत आला आहे. सध्या माझ्याकडे एकूण १ हजार झाडे आहेत. आता अजून वाढवायचे नाही. कारण १ ते १। एकर पर्यंतचे शेवग्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करता येते. यापुढे क्षेत्र वाढविले तर छाटणी, पाणी व्यवस्थापन (टंचाईमुळे) व्यवस्थित होणे शक्य होत नाही.

मी शेवग्याचा वर्षातून एकच बहार घेतो, तर पहिल्यावर्षी सरासरी एका झाडापासून १० ते १२ किलो शेंगा मिळाल्या. त्याचे सरासरी २५ ते ३० रू. होलसेल भावाप्रमाणे या ६०० झाडांपासून १।। लाख रू मिळाले. दुसऱ्यावर्षी माल वाढल्याने २ लाख रू. उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या नवीन लावलेल्या ४०० झाडांचा पहिला बहार व या जुन्या ६०० झाडांचा तिसरा बहार यापासून २ लाख ८० हजार रू. उत्पन्न मिळाले असून आता (मे २०१५) या दोन्ही प्लॉटमधील शेवग्याची छाटणी करून पुढील बहार घेणार आहे.

माझा 'सिधीविनायक' शेवग्याचा हा प्लॉट पाहण्यास परभणीपासूनचे शेतकरी येतात. हिरव्यागार शेंगांनी लगडलेली शेवग्याची झाडे पाहून आश्चर्यचकीत होतात. मला विचारतात ही शेवग्याची कोणती जात आहे. बी काठे उपलब्ध होते ? यावर त्यांना मी सांगितले हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा असून त्याचे बी पुण्याला मिळते. मात्र ते शेतकरी इतक्या लांब येतील की नाही याबाबत शंका होती. म्हणून मी स्वत: पुण्याला त्यांच्यासाठी बी नेण्यास स्वखर्चाने आलो आहे. यातील मधुसुदन हरीभाऊ लटपटे, कोद्री, ता. गंगाखेड, जि. परभणी यांच्यासाठी ६ पाकिटे बी आणि अर्जुन बडवणकर व गोविंद ज्ञानोबा लटपटे या दोघांसाठी २ - २ पाकिटे तसेच उंडेवाडी ता. गंगाखेड (परभणी) येथील दत्तात्रय माणिकराव केंद्रे यांच्याकरीता २ पाकिटे आणि गावातील दोघांना २ - २ पाकिटे व एकाला १ अशी 'सिद्धीविनायक' शेवगा बियाची एकूण १७ पाकिटे आणि जर्मिनेटर ५०० मिली घेवून जात आहे.

माझ्यासाठी लागवडीच्यावेळी मला हे बियाणे उपलब्ध करण्यसाठी ज्या अडचणी आल्या (संदर्भ : कृषी विज्ञान, सप्टेंबर २०१३, पान नं. ३१ वरील मुलाखत) त्या इतर शेतकऱ्यांना येवू नये म्हणून मी स्वत: हे बियाणे घेण्यास आलो आहे. याची रोपे माझ्या देखरेखेखाली तयार करून घेणार आहे. रोपे तयार करताना प्रथम पिशवीत निचऱ्याची काळी माती बारीक करून ७५% पिशवी भरतो. नंतर ती पाण्याने पुर्ण ओली करून घेतो. त्यानंतर त्यावर थोडी - थोडी राख टाकतो. त्यानंतर जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केलेले बी वरून अर्धा इंच खोल पिशवीत आडवे टोकतो. अशा पद्धतीने आठवड्याभरात बी उगवून येते. त्यानंतर ते २१ ते २५ दिवसात शेतात लावावे. अन्यथा ज्यादा दिवस पिशवीत रोप राहिले की, मुळ्या पिशवीतून बाहेर येतात व पुनर्लागवडी च्यावेळी पिशवी उचलताना मुळ्या दुखावतात व अशी रोपे पुनर्लागवडीत मरण्याची शक्यता बळावते. त्यांना सांगितले की, तुम्ही सुरूवातीला ही २०० च झाडे लावा, आणि त्याची व्यवस्थित जोपासना करा. त्याचे उत्पादन घेतल्यानंतर स्वअनुभवातून पुढे १ एकरपर्यंत तुम्ही शेवगा लावू शकता.