तेल्या का ? कसा ? व त्यावर संभाव्य उपाय !

श्री. दिगंबर आत्माराम देवरे,
मु.पो. देऊर बु।।, ता. धुळे.
मो. ९८८१२६३५०९


जानेवारी २००९ मध्ये ८ एकर भगवा डाळींब लावले आहे. प्लॉट वेगवेगळे आहेत. लागवड १३ x ९ फुटावर असून यातील ३० गुंठ्याचा वेगळा प्लॉट आहे, तेथे १४ x १० फुटावर लागवड आहे.

या बागेचा पहिला बहार घेतला तेव्हा बहार चांगला मिळाला. त्यानंतर पुढील वर्षीचा दुसरा बहार मध्यम मिळाला. नंतर तिसरा बहार पुन्हा चांगला मिळाला. आता चौथा बहार धरला होता तो चांगला आला मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीने बराचसा झडला. जी फळे आहेत, ती साधारण १०० ग्रॅमची आहेत. या १३०० - १४०० झाडांवर गेल्या २ वर्षापुर्वी तेल्या नव्हता. मात्र यातील वाय (Y) शेप फळांवर तेल्या दिसत आहे.

यासाठी साक्रीचे बाळू पवार यांच्या सल्ल्यानुसार आज (२४ एप्रिल २०१५) सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी पुण्याला आलो आहे.

सरांनी सांगितले तेल्या रोग येण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या बागेतील लागवडीचे अंतर कमी आहे. ते साधारण १४ x १२ फुट किंवा १४ x १४ फुट तरी असावे. अंतर कमी झाल्याने बागेत ३ - ४ वर्षाची झाडे एकमेकांत मिसळतात. हवा खेळती राहत नाही, सुर्यप्रकाश सर्व फांद्यांना मिळत नाही. परिणामी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

यावर मी सांगितले सर मी एका ठिकाणी ३० गुंठ्यात १४ x १० फुटावर लागवड केली आहे. तेथेही तेल्या जाणवतोय व विशेष म्हणजे तेथे मर रोगाचा प्रादुर्भाव आहे, मग हे कसे ? यावर सरांनी सांगितले, याचे कारण असे असू शकते, तुम्ही या जमिनीमध्ये पुर्वी कांद्याचे पीक घेतले असेल. त्याच्या वरील रोग पुढे डाळींबावर येतो असा अनुभव आहे. तसेच बागेला जर अर्धवट कुजलेले शेणखत वापरले असतानाही मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. तेव्हा मी सरांना सांगितले, डाळींबापुर्वी कांदा नव्हता मात्र डाळींब १ वर्षाचे असताना कांद्याचे आंतरपीक घेतले होते. त्यामुळेच मर होत असेल. तसेच आम्ही बागेला वाड्यावस्त्यावरील जमा केलेले ३० टन शेणखत दिले आहे. ते अर्धवट कुजलेले होते. त्यामुळेदेखील मर रोग जाणवत असेल. तेव्हा यावर सरांना उपाय विचारला असता सरांनी सांगितले, "वाड्यावस्त्यावरील खत बागेत वापरू नये. आता तुम्ही प्रथम जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + कॉपरऑक्सिक्लोराईड १ लि. चे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करा. तसेच बागेत सुत्रकृमिचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे. तेव्हा निंबोळी पेंड, करंजपेंड १ - १ किलो प्रत्येक झाडास द्या आणि खोडाला गेरू १ किलो + मोरचुद १ किलो + चुना १ किलो + प्रोटेक्टंट १ किलो हे मिश्रण २० लि. पाण्यात कालवून खोडाला तागाच्या कुंच्याने लावावे. लागलेल्या फळांचे पोषण होण्यासाठी तसेच नवीन कळी लागण्यासाठी पत्येक झाडास कल्पतरू १ किलो देवून जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १।। लि. + प्रोटेक्टंट १ किलो + हार्मोनी ३०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी करा. त्यानंतर १५ दिवसांनी वरीलप्रमाणे पुन्हा ड्रेंचिंग करा. म्हणजे सुत्रकृमी व खोडकिडीचा प्रादुर्भाव होणार नाही.

पुढे सरांनी सांगितले, "मी धुळ्याला प्रोफेसर असताना (१९८१- ८२) त्याभागातील जमिनी मी पहिल्या आहेत. त्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण आढळते, तेव्हा धैंचा हे हिरवळीचे खत पीक घेऊन ते फुलावर येतात कापून नांगराने गाडावे. यासाठी एकरी सधारण ५० किलो बी आता पाणी असेल तर मधल्या जागेत टाकून जून अखेर रोटावेटर मारून नांगराने गाडून टाकला असता चुनखडीचे प्रमाण कमी होईल. त्याने जैविक नत्राचे स्थिरीकरण होऊन जमिनीत नत्राचे प्रमाण वाढते. जमिनीतील क्षार कमी होतात. जमिनीची सुपिकता वाढते."

शेणखत उपलब्ध होत नाही म्हणून तुम्ही वाड्यावस्त्यावरील शेणखत गोळा करून बागेस देता. त्याने बागेत रोगराई पसरत असते. त्याकरिता तुमच्याकडे ८ एकर क्षेत्र (जमीन) आहे, तर त्यातील निघणारे गवत जमा करा. खड्डयामध्ये प्रथम शेणकाला शिंपडून त्यावर ह्या गवताचा १ फुटाचा थर देऊन त्यावर १ किलो गूळ व १ किलो डाळीच्या पिठाचे वादळीभर पाणी करून शिंपडावे. असे प्रत्येक थरावर करावे. याचवेळी प्रत्येक थरावर बाहेरून गांडूळ आणून सोडावेत. म्हणजे २ - ३ महिन्यांत चांगले कुजलेले खत कमी खर्चात उपलब्ध होईल, असे सरांनी सांगितले.