लिंबू फळाचे औषधोपयोगी महत्त्व

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


लिंबू हे फळ आपण सर्वांच्या परिचयाचे आहे. लिंबलेट म्हणजे लिंबूपाणी. लिंबाचे सरबत खेड्यापासून शहरापर्यंत आवडीने चाखले जाते. लिंबाचे फळ टिकण्यास चांगले आहे. पक्व फळातील रसाचा उपयोग जेवणात पेय म्हणून केला जातो. लिंबापासून रस, लोणचे, पेक्टीन, सायट्रीक अॅसिड इ. पदार्थ करता येतात. त्याचप्रमाणे लिंबू या फळाचा उपयोग दाह, तहान शमविण्यासाठीसुद्धा करण्यात येतो. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो. स्कर्व्ही रोग बरा करण्यासाठी लिंबाचा उपयोग फार काळापासून होतो. या फळातील प्रत्येक भागाचा उपयोग केला जातो व फळावर प्रक्रिया केली जाते. यापासून लायमोनिन तेल, रसायनापासून अर्कपशुखाद्य, सायट्रिक अॅसिड तसेच लिंबूसत्व तयार करण्यासाठी येते व त्याचा उपयोग जेवणामध्ये करण्यात येतो. घरगुती औषधात कागदी लिंबाचा नेहमी उपयोग करतात. कारण प्रत्येक घरात हे फळ उपलब्ध असते, लिंबाचा रस, लिंबाचे तेल, सायट्रिक अॅसिड यांचा निरनिराळ्या औषधी बनविण्यात उपयोग करतात.

आयुर्वेदात लिंबू (फळ) सुगंधित, मूत्रवर्धक, संकोचक व पाचक म्हटले आहे. फळाचे उकळलेले पाणी साटवक पीडाहारक, शेतकरी, स्वास्थ्यवर्धक, खरूज रोगप्रतिबंधक व पाचक असते. फळाचा रस पित्त व ताप (ज्वर) दूर करण्यात उपयोगी पडतो. लिंबाच्या पाचक गुणधर्माचा उपयोग आयुर्वेदाच्या अनेक औषधांत व रसायनांत प्राचिन काळापासून करण्यात आला आहे.

लिंबाचा उपयोग :

१) ज्वरात शरीरात सूज आल्यास लिंबू सरबत उपयुक्त असते.

२) लिंबाच्या ३ पातळ चकत्या परातीत १ लि. पाण्यात टाकाव्यात. रात्रभर ती परात मोकळ्या हवेत ठेवून ते पाणी सकाळी उपाशीपोटी घेतल्यास हिवताप जातो.

३) आमवात, रक्तपित्त, वातरक्त यासाठी लिंबू सरबत दोन - दोन तासांनी प्याल्यास घाम सुटतो आणि झोप व तहान शमते.

४) रक्तपित्त फार वाढल्यास अर्धा कप लिंबाचा रस चार चार तासांनी दिल्यास आमवात कमी होते. रक्तपित्तात उष्णता वाढल्यास चार - चार तासांनी लिंबाचा रस व साखर देत जावे. घोळणा फुटलयास (नाकातून रक्त येणे) थोडा लिंबाचा रस नाकात सोडावा.

५) लिंबाच्या रसात ओवा भिजवून त्यात अष्टमांश सैंधव मिश्र करून तो ओवा जेवणानंतर अर्धा ते एक चमचा घेतल्यास अपचन, पोट फुगणे, दुखणे वगैरेसारख्या वाताच्या तक्रारी दूर होतात.

६) आमवाताच्या रुग्णांनी पाचकरस सेवन करीत गेल्यास पोटाचे विकार कमी होतील. २०० मि. ली. लसणाचा रस यात ५० ग्रॅम सैंध, ७ ग्रॅम उत्तम हिंग, प्रत्येकी १ ग्रॅम आसमंतारा, देशी कापूर व ओव्याचे फूल ही सर्व एकत्र करून पाचकरस तयार करावा आणि तो दोन्ही जेवणानंतर १ चमचा दुप्पट पाण्यात घ्यावा. अजीर्ण, अपचन, करपट, ढेकर आणि अधिक जेवल्याने उद्भवणा ऱ्या तक्रारी नष्ट होतात.

७) लिंबाची साल जाळून ती राख मधातून वारंवार देत गेल्यास वांती (ओकारी) बंद होते.

८) काही गृहिणी लिंबाचा रस काढून त्यात तेवढीच साखर मिसळतात आणि ती काचेची भरणी उन्हात ठेवतात. दररोज ही भरणी हलवतात. आठ दिवसांत टिकावू सरबत तयार होते. उन्हाळ्यात सर्वत्र कडक उन तापते आणि शरीराची काहिली होते. अशा वेळी सरबत माणसाला शांतता देते आणि शरीरातील उष्णता कमी होते.

९) जलपर्यटनात उलटी होत असल्यास किंवा मळमळत असल्यास लिंबाची फोड व आले खाण्यास द्यावे. म्हणजे उलटी बंद होते आणि बोट लागत नाही.

१०) आरोग्य व सौंदर्य रक्षणासाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याने चेहरा धुवावा. कांती तेजस्वी होते आणि सुरकुत्या नाहीशा होतात. तसेच हिवाळ्यात अंग फुटणे वगैरे त्वचारोग दूर होतात. रस काढल्यानंतर लिंबाची साल फेकून देवू नये. ती चेहऱ्यावर दोन्ही हातांनी नाजूकपणे घासावी म्हणजे रक्तवाहिन्या उत्तेजित होतात आणि सौंदर्य खुलते.

११) मध व दोन चमचे लिंबाचा रस गरम पाण्यात मिसळून घेतल्यास सहा ताबडतोब थांबते. दररोज सकाळी घेतल्यास लठ्ठपणा कमी होतो.

१२) डोक्यावर टक्कल पडल्यास त्या जागेवर लिंबाचा रस दररोज चोळावा. म्हणजे पुन्हा तेथे केस येतात. लोणी व लिंबाचा रस डोक्याला चोळून घेण्याची पद्धत जुन्या लोकांमध्ये होती.

१३) जेवणाचे वेळी कमीत-कमी अर्ध्या लिंबाचा रस पोटात गेला म्हणजे पचनक्रियेला मदत होते.

१४) रात्री झोपण्यापूर्वी अर्धा लिटर कोमट पाण्यात एका लिंबाचा रस पिळून तो प्याल्याने सकाळी शौचाला साफ होते.

१५) भांग, अफू वगैरे व्यसनापासून मुक्त होण्याकरिता लिंबाचा रस गरम पाण्यात टाकून काही दिवसापर्यंत नेमक्या वेळी घ्यावा. म्हणजे व्यसनाबद्दल अरुची होवून व्यसन सोडता येते.

१६) हातास किंवा पायास भेगा पडल्यास लिंबाचा रस तेलामध्ये उकळून लावावा. वाट चालू पाय दमल्यास किंवा सूज आल्यास हे तेल गुडघ्यापर्यंत चोळावे.

१७) आजारी पडलेल्या बैलाला एक बाटलीभर लिंबाचा रस पाजला, तर आजार बरा होतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

१८) लिंबाचा रस काढल्यानंतर राहिलेली साले प्रेशर कुकरमध्ये शिजवावीत. प्रेशर कुकर स्वच्छ होतो. शिवाय ही साले शिकेकाईत शिजवावीत आणि न्हाण्याकरिता वापरावीत. अशाप्रकारे लिंबाचे आपल्या जीवनात महत्त्व आहे.