मारवेल - ४०

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


(डायकॅनथियम करीकोसम)

हे गवर सरळ व उभे वाढताना आढळते. ते झुपकेदारपणे वाढत राहते. सर्वसाधारणपणे १०० ते १२५ पर्यंत याला फुटवे येतात. ह्या गवताची उंची सर्वसाधारणपणे १ ते २ मीटरपर्यंत असते. या गवताच्या काडीचा रंग फिक्कट पिवळा असून, पानांचा रंग पिवळा असून, पानांचा रंग पिक्कट हिरवा असतो. ह्याचे गवत पालेदार, मऊ व रसाळ असते. जनावरांना ते एक आवडीचे एखाद्य असल्याने भरपूर प्रमाणात या गवताचा वापर जनावरांच्या खाद्यासाठी करून घेतला जातो. या गवतामध्ये प्रथिनांचे प्रमाण ६ ते ७ टक्के असते. गवत चराईसाठी कापून घालता येते. काही वेळा असे हिरवे गवत चाऱ्यासाठी वापरता येते, तर काही ठिकाणी याचा वापर वाळविण्यासाठी तसेच मूरघास (सायलेज) करण्यासाठीही उत्तमरित्या केला जातो. 'मारवेल - ४०' हे सरळ उभट वाढणारे असल्यामुळे त्याचा बांधावर लावण्यासाठीदेखील चांगला उपयोग होतो. भातशेतीमध्ये भातपिकाला अपाय न होता बांधापासून याची भरपूर प्रमाणात वैरण उपलब्ध होते.

जमीन व हवामान : या चारापिकासाठी जमीन निवडताना शक्यतो मध्यम ते खोल प्रकारचीच निवडावी. जास्त पाऊसमानाच्या भागासाठी 'मारवेल - ४० ' ह्या गवताची शिफारस केली जाते. साधारणपणे ६३ ते २५० सें.मी. पाऊस पडणाऱ्या भागात या चारापिकाची लागवड करणे फायदेशीर ठरते.

पूर्वमशागत : मारवेल - ४० या गवताची लागवड करण्यापूर्वी पूर्वमशागतीची कामे करावीत. यासाठी शक्य झाल्यास एक खोलवर नांगरट आणि चांगली भुसभुशीत जमीन होईल अशा पद्धतीने एखाददुसरी कुळवाने कुळवणी करून घ्यावी. आणि जमीन लागवडीसाठी तयार ठेवावी.

लागवड : 'मारवेल - ४०' ह्या गवताची लागवड बियांपासून, ठोंबांपासून आणि रोपांपासूनही करताना आढळते. पाभरीने किंवा हाताने ओळीत पेरणी करावयाची असल्याची २.५ किलो बियाणे प्रति एकरी लागते. हाताने किस्कारून पेरणीमध्ये ५ किलो प्रति एकरी बी वापरावे लागते. बहुधा लागवड जून - जुलैमध्ये वेळच्या वेळी संपुष्टात आणावी.

खते व फवारणी : 'मारवेल - ४०' हे गवत जास्त पावसाच्या भागात लावण्यास योग्य असल्याने कंपोस्ट खत आवश्यकतेप्रमाणे टाकावे. लागवडीपूर्वी शक्य झाल्यास ३ ते ४ टन चांगले कंपोस्ट खत घालावे अथवा काडीकचरा गोळा करून टाकावा. म्हणजे पावसात भिजून त्याचा सेंद्रिय खतासारखा वापर होईल. तसेच एकरी १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत दोन टप्प्यात द्यावे आणि प्रत्येक कापणीस अनुक्रमे सप्तामृत २५०, ३५० आणि ५०० मिलीच्या १०० लि. पाण्यातून तीन फवारण्या कराव्यात.

पाणी : वास्तविक पाहता हे गवत जास्त पावसाच्या भागात चांगले येत असल्याने ओलिताची सोय पहिल्या पासोनच चांगली असावयास पाहिजे. नकळत एखाद्या वर्षी पावसाने ताण दिला तर मात्र पाण्याच्या २ ते ३ पाळ्या आवश्यकतेप्रमाणे उन्हाळी हंगामात द्याव्यात.

कापण्या : 'मारवेल - ४०' हे गवत बहुवार्षिक असल्याने त्यापासून जनावरांना मुबलकपणे चांगल्या सकस चाऱ्याची सोय होते. खरे म्हणजे या चारापिकाची लागवड टिकविण्याचा काळ सर्वसाधारणपणे ३ ते ४ वर्षाचा असतो. अशा वेळी वर्षातून २ ते ३ कापण्या सहजरित्या मिळतात.

उत्पन्न : जनावरांच्या खाद्यासाठी जास्तीत जास्त चारा उपलब्ध व्हावा म्हणून 'मारवेल -४०' ह्या गवताची शिफारशीप्रमाणे लागवड केली तर शेतकरी बांधवांना त्यापासून हमखास फायदा होतो. साधारणत : २५ ते ३५ टन हिरवा चारा आणि ८ टन वाळलेला चारा या गवतापासून प्रति हेक्टरी मिळतो.