मारवेल - ७

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


'मारवेल - ७ ' हे गवत चारापिकांसाठी फार उपयुक्त आहे. हे गवत मारवेल ८ पेक्षा थोडे जाड काडीचे, पालेदार, हिरवेगार असते. त्याची उंची साधारणत: १.५ मीटरपर्यंत वाढणारी असते. चराईसाठी, कापून हिरव्या चाऱ्यास, वाळवून साठविण्यास, तसेच मूरघास (सायलेज) करण्यासाठी त्याचा भरपूर लाभ होतो. हिरव्या चाऱ्याच्या फुलोऱ्यात आलेल्या अवस्थेच्या वेळी यामध्ये ६ ते ७.५ टक्के प्रथिनांचे प्रमाण समावलेले असते. याशिवाय साधारणपणे २ टक्के चरबीचे प्रमाणही यामध्ये आढळते. भारी जमिनीच्या बांधावर व नदीकाठी लावण्यासाठी मारवेल - ७ हे गवत विशेषकरून प्रभावी ठरते. ते बहुवार्षिक असल्याने नव्याने दरवर्षी लावावे लागत नाही. प्रसंगी पाण्याची सोय असल्यास अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन ह्या गवतापासून मिळते. असा बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

जमीन व हवामान : मध्यम ते खोल प्रकारच्या जमिनी या चारापिकासाठी उपयुक्त ठरतात. नदीकाठच्या जमिनीतही ते फार मोठ्या जोमाने फोफावते. कसदार व भारी जमीन यासाठी अतिशय फायद्याची ठरते. हवामानाच्या बाबतीत ३० ते ५० इंच पाऊसमान असणाऱ्या प्रदेशासाठी हे एक उत्तम चाऱ्या चे पीक म्हणून वाढीस लागते.

पूर्वमशागत : मध्यम पाऊस व मध्यम ते खोल जमिनीत या पिकाची लागवड चांगली होत असल्यामुळे अशा जमिनी निवडून त्यांची पूर्वमशागत करणेदेखील गरजेचे असते. साधारणपणे नांगराने एक खोलवर नांगरट किंवा कुळवाच्या १ -२ पाळ्या खोलवर देऊन शेत लागवडीपूर्वी चांगले भुस भुशीत करून ठेवावे. तणे, धसकटे किंवा इतर नको असलेल्या छोट्या - मोठ्या वनस्पती उपटून शेत स्वच्छ राखावे.

लागवड : 'मारवेल - ७' हे कसदार, भारी व मध्यम प्रकारच्या जमिनीत येणारे आणि ६३ ते १०० सेंटिमीटर पाऊसमान असणाऱ्या प्रदेशात वाढीस लागणारे चाऱ्याचे पीक असल्याने त्याची लागवड जून ते ऑगस्ट महिन्यांत उरकावी. लागवडीतील अंतर साधारण ६० x ३० सें. मी. असावे.

बी. किंवा ठोंब: 'मारवेल - ७' ह्या चारापिकाची टोकण पद्धतीने पेरणी करावयाची असल्यास १ किलो प्रति एकरी बी लागते. पाभरीने किंवा हाताने ओळीत पेरणी करावयाची असल्यास २ ते २॥ किलो बियाणे प्रति एकरी वापरावे, आणि हेच बी हाताने फिस्कारून पेरणी करावयाची झाल्यास ३ किलोपर्यंत ते वापरावे. प्रति एकरी साधारणत: २४ ते २८ हजार ठोंब वापरता आणावेत.

बी पेरताना अथवा ठोंब लावताना जर्मिनेटर व प्रोटेक्टंटचा वापर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (कृषी विज्ञान केंद्र) च्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावा.

सप्तामृताच्या फवारण्या प्रथम कापणीस येईपर्यंत तीन व नंतर कापण्या लवकर व भरघोस येण्यासाठी प्रत्येक कापणीनंतर २ ते ३ कराव्यात.

खते : खतांच्या मात्राबाबत या पिकाला सेंद्रिय खत सुरुवातीला २.५ ते ३ टन प्रती एकरी वापरावे. जुलै ते ऑगस्ट या काळात दरवर्षी एकदा २० किलो नत्र घालावे. Bosal Dose म्हणून १० किलो नत्र आणि ५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत यांची मात्रा द्यावी.

पाणी : सुरुवातीच्या काळात पाऊसमान चांगले होत असेल तर पाण्याची तितकीशी गरज भासत नाही, परंतु पुढे - मागे उन्हाळ्यात पाणी - पुरवठा करणे गरजेचे असते. साधारणत: एक दोन पाण्याच्या पाळ्या उपलब्धतेनुसार १५ ते २० दिवसांच्या अंतराने देत रहाव्यात.

कापण्या : हे चाऱ्याचे पीक बहुवार्षिक असल्याने नव्याने लावावे लागत नाही. एकदा ह्याची लागवड केल्यावर साधारणत: त्याचा लागवड टिकविण्याचा काळ ३ ते ४ वर्षभराचा असतो. प्रसंगी पाण्याची चांगली सोय झाल्यास वर्षाला ४ ते ५ कापण्या सहज मिळतात.

उत्पन्न : हे गवत पसरणारे असल्याने त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. एकरी २० ते २८ टनांपर्यंत हिरवा चारा उपलब्ध होतो. आणि ४ टन वाळलेला चारा प्रति एकरी मिळतो.