तण नियंत्रणासाठी - आच्छादन

सहाय्यक प्रा. कु. एस. एस. गणविर आणि प्रणाली कळमकर कृषी विद्या विभाग आर. जी. देशमुख कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, तिवसा, जि. अमरावती


जमिनीवर आच्छादन करणे ही तण नियंत्रणाची भौतिक पद्धत होय. आच्छादन (मत्व) म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर पसरलेला सेंद्रिय पदार्थाचा थर असतो. आच्छादनाचा उद्देश मुख्यत: तणांचे नियंत्रणा करण्याचा असतो पण त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि जमिनीची संरचन व सुपीकता सुधारते.

आच्छादनाचे फायदे :

१) पिकाच्या ओळीमध्ये जमिनीवर आच्छादन पसरल्याने जास्त तापमानापासून पिकाचे संरक्षण होते. कारण आच्छादनाखाली जमीन थंड राहते. कडक ऊन व उष्ण वाऱ्याने आच्छादनाखाली जमीन तापत नाही. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो.

२) आच्छादनामुळे मुसळधार पावसाने व वाऱ्याने जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो. जमिनीत भेगा पडत नाहीत.

३) आच्छादनामुळे जमिनीची सुपीकता वाढते, कारण जमिनीतील जिवाणू व गांडूळांचे कडक उन्हापासून संरक्षण होते. सेंद्रिय पदार्थ त्यांचे अन्न आहे. जीवाणूमुळे सेंद्रिय पदार्थ कुजतात आणि त्यातील खनिजे पिकांना उपलब्ध होतात.

४) आच्छादनामुळे शेतकऱ्यांना वेळ व श्रम कमी होतात. तण जमिनीवर वाढण्यापूर्वी आच्छादन पसरल्याने तणाला सुर्यप्रकाश न मिळाल्याने तण वाढत नाही. जमीन भुसभुशीत राहते. जमिनीवर पापुद्रा तयार होत नाही. त्यामुळे वारंवार जमिनीची मशागत (निंदणी व कोळपणी) करण्याचे श्रम वाचतात. पैशाची बचत होते.

५) काही पिकांना आच्छादनाचा खूप फायदा होतो. फळांचे उत्पादन वाढते आणि फळांची प्रत चांगली राहते.

६) जमिनीवर पसरणाऱ्या वेलींच्या पानावर पावसामुळे मातीचे कण उडतात आणि त्यातून पानांना बुरशी रोगाची बाधा होते. आच्छादनामुळे पावसाचे थेंब जमिनीवर न आदळता आच्छादनात शोषले जातात.

सखल जमिनीवर आच्छादन करू नये ही जमीन नेहमी ओलसर दमट राहते. त्यामुळे रोगकारक बुरशी वाढण्यास अनुकूल वातावरण मिळते. जमिनीवरील आच्छादनामुळे वादळी पावसाने शेतातील रोपे उन्मळून पडत नाहीत. तसेच पावसाचे पाण्याने जमिनीची धूप होण्यात प्रतिबंध होतो. जमिनीला भेगा पडत नाहीत व कडक उन्हाने जमिनीतील पाण्याची वाफ होत नाही.

आच्छादन कसे करावे.

जमिनीवर आच्छादन तीन भिन्नवेळी करावे.

१) बियांची पेरणी करण्यापुर्वी

२) बियांची पेरणी झाल्यानंतर

३) पीक वाढत असताना

पिकांत आच्छादन सपाट जमिनीचे पृष्ठभागावर जाड थरात पसरावे पण जमिनीत मिसळू नये. आच्छादनाच्या जाड थरामुळे त्यातून उगवलेल्या बियांची रोपे वर न येत गुदमरून मरतात. पेरणी केलेल्या रोपाभोवती अगर लावणी केलेल्या रोपाभोवती जाड व जाडेभरडे काड परसणे अवघड असते म्हणून त्याचे बारीक तुकडे करून जमिनीवर आच्छादन पसरावे. गादीवाफ्यात बी पेरल्यानंतर तात्काळ त्यावर पातळ आच्छादन पसरावे. म्हणजे बियांचे अंकुराचे ऊन पावसापासून संरक्षण होते. बी उगवल्यानंतर आच्छादन काढून टाकवे. पिकाची रोपे भरपूर वाढल्यानंतर पिकाचे ओळीत आच्छादन पसरावे कोवळ्या रोपामध्ये आच्छादन पसरल्याने मर रोगाचा (डॅम्पींग ऑफ) संभव असतो. आच्छादनासाठी लाकडाचा भुसा किंवा बागासी (साखर कारखान्यातील उसाचा भुसा) वापरल्याने तो कुजण्यासाठी जमिनीतील नत्र भोषाले जाते म्हणून पिकाला नत्राची टंचाई जाणवते. अशा वेळी पिकाला अधिक नत्रखत द्यावे.

आच्छादनासाठी साहित्य :

१) पिकांचे अवशेष : आच्छादनासाठी पिकांचे अवशेष वापरता येतात, मात्र त्यामध्ये तणांचे बी नसावे, त्यात कीड व रोगकारक बुरशी नसावी. आपली जनावरे गव्हाचे काड खात नाहीत त्यामुळे शेतकरी ते जाळून टाकतात. त्याचे उत्कृष्ट आच्छादन होते. धानाचे तणीस, तांदळाचे गिरणीतील धानाची टरफले, भुईमुगाच्या शेंगाची टरफले, साखर कारखान्यातील बागासी लाकडाचा भुसा, सालीचे तुकडे, केळीच्या खोडाचे तुकडे, जनावरांची उष्टी वैरण, वाळलेले गवत, कोंबडीच्या खुरड्यातील गादी, निंदणाने काढलेले शेतातील तण, झाडांची छाटणी केलेल्या फांद्या, तीळ करडई व सुर्यफुलाचे काड, पानगळ झालेली झाडांची पाने इत्यादी शेतातील टाकाऊ पदार्थाचा आच्छादनासाठी उपयोग होतो. हे सेंद्रिय पदार्थ २ - ३ महिन्यात शेतातच कुजतात आणि थोड्या प्रमाणात पिकाला खनिजे व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. सेंद्रिय पदार्थ कुजविण्याचे कार्य जमिनीतील गांडुळ, सुक्ष्म जंतु व बुरशी करतात. त्याचे वाढीसाठी नत्राची गरज असते. शिवाय सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी जमिनीतील ओलावा शोषला जातो. पावसाळ्यात पाण्याची टंचाई नसते.

२) प्लॅस्टिकचे आच्छादन : जमिनीचे पृष्ठभागावर प्लॅस्टिकची चादर पसरतात. झाडातील अंतराप्रमाणे त्या चादरीत भोके पडतात आणि त्या भोकात पिकाचे बी पेरतात. तेथे पिकाची रोपे वाढतात आणि जमिनीवर तण वाढण्यास प्रतिबंध होते. प्लॅस्टिकच्या आच्छादनाखाली ठिबक सिंचनाच्या नळ्या असतात. या आच्छादनामुळे झाडावरील फळांचा ओल्या जमिनीला स्पर्श होत नाही. त्यामुळे फळे सडत नाहीत. फळांचे उत्पादन वाढते आणि फळांची प्रत चांगली मिळते. स्ट्रोबेरीकरिता ही पद्धत उत्तम आहे. अलिकडे भाजीपाला पिकासाठी तसेच कलिंगड खरबूजासाठी ही पद्धत शेतकरी अवलंबत असून ती फायदेशीर ठरत आहे. प्लॅस्टिकच्या काळ्या चादरीमुळे तण वाढण्यास प्रतिबंध होतो. आणि जमिनीत ओलावा टिकून राहतो. लाल रंगाचे प्लॅस्टिकचे आच्छादन वापरल्याने काकडीचे उत्पादन १४ ते २२ टक्के वाढते. लाल किंवा तपकिरी रंगाचे प्लॅस्टिकचे आच्छादन टोमॅटो पिकाकरिता पिवळे चंदेरी रंगाचे ढोबळी मिरचीसाठी आणि निळ्या किंवा लाल रंगाचे आच्छादन कोहळ्याचे वेलीसाठी चांगले असते.

३) वर्तमानपत्राचे आच्छादन : बागेतील फुलझाडे व भाजीपिकासाठी जुन्या वर्तमानपत्राचे आच्छादन वापरता येते. पिकांच्या ओळीत वर्तमानपत्राचे थर पसरावे. त्यावर पाणी शिंपल्याने तो थर जड होतो आणी वाऱ्याने वर्तमानपत्रे उडून जात नाहीत. ओल्या वर्तमानपत्राने जमिनीतील तणांचे बी उगवते पण तणांची रोपे वर्तमानपत्रांचा थर भेदून वर येऊ शकत नाहीत. त्या रोपांना सुर्यप्रकाश न मिळाल्याने ती रोपे मरतात. ओली वर्तमानपत्रे लवकर कुजतात आणि त्यातील खनिजे पिकांना मिळतात. कोरड्या वर्तमानपत्रांच्या थरावर शेणखत किंवा कम्पोस्ट खत पसरल्याने वर्तमानपत्रे वाऱ्याने उडून जात नाहीत. पावसाच्या किंवा सिंचनाच्या पाण्याने ही खते पिकांना मिळतात. वर्तमानत्राच्या आच्छादनामुळे बहुवार्षिक तणांचे यशस्वी नियंत्रण होते. कारण त्यांचे वाढीसाठी सुर्यप्रकाश मिळत नाही. ही तणे आच्छादनाखाली गुदमरून मरतात.

४) झाडांच्या पानोळ्याचे आच्छादन : सुबाभुळ गिरीपुष्प (ग्लिरीसीडीया), कडुनिंब, पांगारा, जयंती, धैंचा, अगस्ती, शेवरी ही झाडे शेताच्या बांधावर लावली असता त्याच्या फांद्या छाटून त्याचे आच्छादन शेतात पसरता येते. त्यामुळे तण वाढण्यास प्रतिबंध होतो आणि पिकांना हिरवळीचे खत मिळते. हिरव्या फांद्या उन्हाळ्यात लवकर सुकतात आणि त्यांची दाट पाने जमिनीवर पसरून आच्छादन तयार होते. कुजणारी पाने परस्परांना चिकटुन चटईप्रमाणे आच्छादन तयार होते.