ढेमसे (टिंडा) पैसे देणारे वेलवर्गीय फळपीक

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जमीन : सर्व साधारणपणे हलकी ते मध्यम काळ्या जमिनीत ढेमसे या पिकाची लागवड केली जाते. तरी हलकी पोयटायुक्त जमीन या पिकास चांगली मानवते.

हवामान : या पिकाची बाराही महिने लागवड केली तरी चालते. अती उष्ण किंवा दमट हवामान या पिकास मानवत नाही. त्यासाठी कोरडे हवामान या पिकास चांगला प्रतिसाद देते.

जाती : १) अर्का.

२) लुधीयाना

बियाणे : एकरी २ किलो बी पुरेसे होते. ह्या बियाचे कवच दोडका, घोसाळी, भोपळा या पिकाच्या बियांपेक्षा कडक असल्याने उगवण फार कमी होते. त्यासाठी १ लिटर पाणी गरम (कोमट) करून त्यात २५ मिली जर्मिनेटर टाकून १ किलो बी रात्रभर भिजत ठेवावे. नंतर सावलीत सुकवून लावावे.

लागवड : जमिनी हलकी असेल तर ३ x २ फूट अंतर ठेवावे. भारी जमिनीत ५ x २ फूट अंतर ठेवावे. भारी जमिनीत वेलांची वाढ भरपूर होते. साधारण जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीतील अंतर ठेवावे. बी लावताना सुरुवातीला कल्पतरू सेंद्रिय खत १ - १ चमचा टाकून त्यात बी लावावे. त्याने जमीन भुसभुसीत होऊन जारवा व वेल वाढीस मदत होते.

खते : या पिकास रासायनिक खत देऊ नये. त्याने या पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी शेणखत असेल तर ते वापरावे. अन्यथा कल्पतरू सेंद्रिय खत (एकरी ५० किली) दोन टप्प्यात लागवड करताना व खुरपणी केल्यानंतर द्यावे.

पाणी : उन्हाळ्यात ६ ते ७ दिवसाच्या अंतराने सकाळी ९ चे आत पाणी द्यावे. थंडीत ८ ते १० दिवसांच्या अंतराने सकाळी १० ते दुपारी ३ ह्या वेळेत पाणी द्यावे. पाणी देताना भीज पाणी (संपुर्ण पाणी देणे) न देता, टेक पाणी (हलकेसे पाणी देणे) द्यावे. माल लागल्यावर मात्र (तोडे चालू असताना) पाण्याच्या पाळ्या लवकर द्याव्यात.

रोग : ढेमसे (टिंडा) या पिकावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. कारण हे पीक वेलवर्गीय असल्याने वेलची वाढ जमिनीलगत पसरत असते. तसेच पाने केसाळ लवयुक्त, मऊ असल्याने थंडीतील दव, धुके पानावर पडून बुरशी येते. तर उन्हाळ्यात वातावरण अती उष्ण असल्याने पाणी दिल्यानंतर जमीन तापलेली असते. त्यामुळे झाडाला उष्णतेच चटका बसतो. त्यामुळे बुरशी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव होतो.

या रोगांच्या प्रतिबंधासाठी व नियंत्रणसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची खालीलप्रमाणे फवारणी करावी.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २०० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.

ढेमसे ३ महिने सहज चालते. त्यापुढे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अजून ३ महिने दर्जेदार उत्पन्न मिळू शकते.

ह्या तीन फवारण्या सुरूवातीपासून घेतल्यास रोगकिडीस आळा बसून वेलांची जोमदार वाढ होते. तसेच फळधारणा अधिक होउने उत्पादन वाढते.

तोडणी : साधारण ४० ते ४५ दिवसात फुलकळी लागते. ५५ ते ६० दिवसांनी तोडणी सुरू होते. फळ साधारण लहान अमेरिकन सफरचंदाच्या आकाराचे झाल्यावर तोडणी करावी. या अवस्थेत मालाला फिकट हिरवा, पोपटी कलर येतो. नखाने दाबले असता, टोकले असता फळ मऊ असते. १ किलोमध्ये १२ ते १६ फळे बसतात. माल कोवळा असल्यास याला मार्केट किलोस १० ते १५ रू. हून अधिक मिळते. फळे मोठी झाल्यावर वजन वाढते. परंतु फळे कडक बनतात. व चवीला सपक लागतात. त्यामुळे भाव कमी मिळतो. त्यासाठी वेळेवर तोडणी करणे फायद्याचे ठरते.

मार्केट : या पिकाकडे अनेक शेतकऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने आवक कमी असते. त्यामुळे सतत वर्षभर मार्केट असते. जरी मालाची आवक वाढली. तरी ८ ते १० रू. किलोच्या खाली भाव येत नाही. इतर वेळी तर १० ते १५ रू. किलो ठोक भाव सहज मिळून जातो. ह्या फळभाजीस सिंधी, पंजाबी व बंगाली या लोकांमध्ये जास्त प्रमाणात मागणी असते.

उत्पादन : एकरी १५ ते २० टन निघते.