थंडीच्या काळात व त्यापुढील शेवग्याचे व्यवस्थापन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पाऊस झाल्याने शेवग्याला भाद्रपद महिन्यात येणारी फुले टिकली नाही तसेच दिवाळीनंतर आलेल्या अवकाळी पावसाने परत फुलगळ झाली. संक्रांतीनंतर जेव्हा थंडी कमी होण्याची चाहूल लागले आणि ऊन वाढू लागते तेव्हा शेवग्याचा बहर मोठ्या प्रमाणात येतो. संध्याकाळच्या वेळेस ६ वाजल्यानंतर उंच टेकडीवरून किंवा घरावरून शेवग्याच्या प्लॉटकडे पहिले असता शेवग्याचा प्लॉट चांदण्यासारखा चकमताना दिसतो.

संक्रांत झाली तरी हवी तशी थंडी कमी होत नाही. त्यात सतत बदल होत आहेत. तापमान ७ ते १० डी. से. इतके किमान तापमानातील चढ - उतार होत आहेत. प्रत्यक्षात फुले लागण्यासाठीचे तपमान हे २२ ते ३५ डी. से. असावे लागते. शेवग्याची व्यवस्थित छाटणी केली व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित केल्यास फेब्रुवारी महिन्यात फुले लागून वाध्या लागून शेंगा पोसत आहेत. या काळामध्ये झाडाची अवस्था पाहून (खोड पोटरी ते मांडीच्या जाडीचे असल्यास) पोयटायुक्त जमीन असेल तर ५०० ग्रॅम ते १ किलो कल्पतरू खत द्यावे व हलकी जमीन असल्यास त्या शिवाय सम्राट (१८:४६) पावकिलो ते अर्धा किलो, पोटॅश पाव किलो द्यावे. गांडूळ खताचा रिझल्टही चांगला येतो. अपक्व किंवा कमी कुजलेले शेणखत झाडास दिले गेल्यास हुमणीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि शेवग्याचे खोड हे गोड व मऊ असल्याने हुमणी कीड खोडावर तुटून पडते. त्यामुळे झाडांचे मरीचे प्रमाण वाढते. शक्यतो पोल्ट्रीचे किंवा मेंढीचे खत वापरू नये, कारण त्यातील अमोनिया वायूमुळे फुलगळ होण्याची शक्यता असते.

८ ते १२ वाजेपर्यंत अजूनही (जानेवारी अखेरीसही) थंडीचा काळ असल्यामुळे शेवगा पिकास आठवड्यातून एकदाच पाणी मोकळे द्यावे किंवा ठिबक चालवायचे झाल्यास हलक्या जमिनीत आठवड्यातून २ वेळा (प्रत्येक वेळेस २० लि. पाणी ) द्यावे. म्हणजे वाध्या व शेंगा पोसण्यास मदत होईल. मात्र जेव्हा १८ ते २० डी. से. तापमान असते तेव्हा आठवड्यातून एकदाच पाणी द्यावे. महाशिवरात्रीपर्यंत थंडी टिकून असते आणि नंतर होळी पेटल्यावर हवेतील उष्णता वाढते, तेव्हा मात्र शेवगा पिकास पाण्याची गरज अधिक भासते. म्हणजे दोन पाण्याच्या पाळीतील अंतर ५ दिवसांचे ठेवावे. फुलगळ होऊ नये म्हणून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रिझम, न्युट्राटोनचा वापर करावा, तर मावा व बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून स्प्लेंडर, प्रोटेक्टंट, हार्मोनीचा वापर करावा.

म्हणजे गुढी पाडव्यापासून शेंगा सुरू होतात. या शेंगांचा हंगाम २ ते २।। महिने चालतो. या काळात शेंगांना भाव २५ ते ७५ रु./किलो शेतकऱ्यांना मिळतो. गावात हातविक्री केल्यास अधिक पैसे मिळून ग्राहकाला ताजा व चविष्ट माल मिळाल्याने तो सतत याच 'सिद्धीविनायक' शेवग्याची मागणी करतो. तेव्हा यापुढेही (जुलै - ऑगस्टपर्यंत) शेंगा हव्या असतील व पावसाचे मान कमी असते तेथे ऑगस्टअखेर (कोकण, भंडारा या भागात) पाऊसमान अधिक असते तेथे फुले व वाध्या गळून पडतात. शेंगांचे टोक अधिक पावसाने काळे पडून शेंगा वाकड्या होतात, कुजतात, सडतात. तेव्हा अशा हंगामातील बहर धरू नये. कारण यावर इलाज नाही.

भाद्रपद महिन्यात उष्णता वाढल्याने शेवग्याला पुन्हा फुले येतात, त्यापुर्वी माध्यम छाटणी करून घ्यावी. दिवाळीनंतर माध्यम पाऊस असला तर शेंगांचा बहर परत लागतो. हा शेवगा नाताळापर्यंत ऐन थंडीतही बहरू शकतो, परंतु इथे पाण्याचे नियोजन फार महत्त्वाचे असते, कारण हा काळ अति थंडीचा असतो. हवामानामध्ये, अंदाज न करता येणारे बदल घडत असल्यामुळे अवकाळी पावसाने शेवगा पिकाचे प्रचंड नुकसान होते आणि शेंगा लागत नाही. तेव्हा संक्रांतीनंतरचा बहर हमखास मिळतोच. तो बहर धरण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे. म्हणजे या काळामध्ये मंदी असली तरी हा काळ शेवग्याच्या दराचा बेगमीचा असतो आणि एकरी ६० हजार ते १ लाख रु. सहज होतात.

शेवग्याची नवीन लागवड दिवाळीनंतर केलेल्या शेतकऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये उष्णता वाढल्याने धन्याची उगवण कमी होईल, तेथे जर्मिनेटरचा वापर करून शेवग्याच्या विरळ सावलीत आंतरपीक म्हणून करावा. म्हणजे मर न होता ८० ते १०० टक्के उगवण होऊन कोथिंबीर निरोगी राहील. या काळात कोथिंबीरीला दर अधिक राहत असल्याने कोथिंबीरीचे प्लॉट टप्प्याटप्प्याने बी फोकून करावेत. म्हणजे शेवग्याच्या गारव्याने धन्याला पोषक वातावरण तयार होते. धन्याला पाणी दिले म्हणजे शेवग्याला पाणी द्यावे लागत नाही आणि शेवग्याला फवारणी केली म्हणजे धन्याला फवारणी करावी लागत नाही. संदर्भ - श्री. वसंतराव निवृत्ती काळे, ससाणेनगर, हडपसर, पुणे, फोन नं. (०२०) २६८२४२३८ यांची याच पुस्तकातील मुलाखत पहावी आणि अशा शेवग्यातील उन्हाळ्यातील कोथिंबीरीचे आंतरपिकाचे एकरी सहज ५० ते ६० हजार रुपये २ महिन्यात होतात.

शेवगा आरोग्याचा दागिना

जगभरातील आहारातील बदल व वाढत्या मांसाहाराचे प्रमाण यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) ही मधुमेहाच्या बरोबरीने निर्माण झालेली विकृती आहे. यामुळे त्रिफळा चूर्ण किंवा औषधी इलाज करतात. परंतु आहारामध्ये पपई जर जेवणामध्ये दररोज घेतली तर बद्धकोष्ठता कमी होते, परंतु प्रत्येक वेळी पपई उपलब्ध असेलच असे नाही. आमच्याकडे बहारीनचा शेतकरी आला होता, त्याला त्याच्या बहारीन या देशात पपई लागवड करायची होती. तेव्हा आम्ही त्याला शेवग्याच पर्याय सुचविला होता. प्रत्येक माणसाने आपल्या परसात १ शेवग्याचे झाड लावले तर आहारात शेंगाचा वापर होऊन आरोग्याच्या विविध समस्या कमी होतील. डोळ्याचे विकार, बद्धकोष्ठता कमी होतील.

ग्रामीण भागातील दुषित पाण्याने होणारे विविध रोग पाणी शुद्धीकरणात शेवग्याचा वापर केल्यास टळतील. म्हणजे शेतकर्‍यांचे नैसर्गिकरित्या आरोग्याचे संवर्धन होईल आणि आरोग्यावर होणारा औषधोपचारावरील खर्च टळेल. शेवग्याची लागवड अती थंडी सोडून कधीही करता येते. कमी कष्टात, कमी खर्चात बर्‍यापैकी उत्पन्न देऊन हमखास भाव देणारा 'सिद्धीविनायक' शेवगा हा खरोखरच शेतकर्‍यांचा मित्र सिद्ध झाला आहे.