दुर्लक्षित शेवग्यातील झेंडूच्या आंतरपिकाचे दिवसाआड २०० किलोचे १४ ते १५ हजार रू.

श्री. सुरेश बाळासो शेलार, मु.पो. वडगाव रासाई, ता.शिरूर, जि.पुणे,
मोबा. ८२७५०६७०१०/८६९८९०९७७९


२।। एकर मध्यम प्रतिच्या जमिनीत ५' x ५' वर ओडीसी जातीचा शेवगा लावला आहे. त्यामध्ये आंतरपीक गावरान झेंडू लावला आहे. या शेवग्याला आज अखेर (१६ सप्टेंबर २०१४) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ फवारण्या केल्या आहेत. झाडांची उंची सततच्या पावसाने व छाटणी न करता आल्याने सध्या ७ - ८ फूट असून फुलकळी लागण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे वाध्यात रूपांतर होऊन बहार चांगला लागण्यासाठी आज सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे. शेवग्यामध्ये झेंडूचे आंतरपीक घेतलेले असल्याने झेंडू वाचविण्याच्या नादात शेवग्याकडे दुर्लक्ष झाले. शेवग्याची छाटणी (शेंडा खुडणी) एकदाच केली. त्यामुळे झाडांचा घेर कमी राहून उंची वाढली. त्यामुळे फुलकळी कमी आहे. शेवग्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करताना यातील आंतरपीक झेंडूवरही आपोआपच फवारणी होत असल्याने वेगळी फवारणी न करता कमी खर्चात झेंडू चालू झाला. संदर्भ : श्री. वसंतराव काळे (वय ७४, शिक्षण बी.ए.) महम्मदवाडी, हडपसर, पुणे यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने 'सिद्धीविनायक' शेवग्यात सलग ८ ते १० वर्ष कोथिंबीर, पालकाचे आंतरपीक घेताना मुख्यपीक शेवगा व आंतरपिकाचेही यशस्वी उत्पादन कमी खर्चात घेतले. ते शेवग्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करताना औषध खाली आंतरपिकावर पडत असल्याने वेगळी फवारणी करावी लागत नसे आणि आंतरपिकाला पाणी देत असताना वरंब्यावरील शेवग्यास वेगळे पाणी देण्याची आवश्यकता राहत नसे.

झेंडू गणपतीच्या ४ -५ दिवस अगोदर सुरू होऊन दिवसाड २०० - ३०० किलो निघत होता. हा झेंडू ऐन गणपतीत चालू झाल्याने ८० रू./किलो भाव मिळाला. दिवसाड १४ - १५ हजार रू. ची पट्टी घेत होतो. पितृपंधरावड्यात भाव खाली आले असले तरी दसऱ्यापर्यंत हा झेंडू ठेवून नंतर काढून शेवग्याकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. गणपतीच्या पंधरावड्यात या झेंडूपासून १ लाख रू. उत्पन्न मिळाले आहे.

सप्टेंबरच्या सुरूवातीस सतत ७ - ८ दिवस पाऊस झाल्याने शेवग्याची पाने पिवळी पडली आहेत. त्याने लहान फांद्या व फुले गळून गेली. तसेच झेंडू फुले चालू असल्याने शेवग्याच्या छाटणीकडे दुर्लक्ष झाले. यावर सरांनी सांगितले, "प्रथम आता तुम्ही शेवग्याच्या करंगळीच्या जाडीच्या फांद्या सिकेटरने क्रॉस छाटा आणि जर्मिनेटर, प्रिझम व कॉपरऑक्सीक्लोराईड १ लि. चे २०० लि. पाण्यातून ठिबकद्वारे ड्रेंचिंग करा. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. आणि हार्मोनी ५०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी करा. म्हणजे पावसाच्या पाण्याने मुकी झालेली मुळी ड्रेंचिंगमुळे कार्यरत होईल आणि फवारणीमुळे नवीन फुटीला दिवाळीपर्यंत फुले लागून डिसेंबरमध्ये तोडे चालू होतील. या शेवग्यास डिसेंबर ते मार्चपर्यंत बाजारभाव चांगले ६० - ७० रू. पासून १२० रू. किलो पर्यंत मिळतात. त्यानंतर माल कमी होईल व भावही उन्हाळ्यात कमी होतात. साधारण ३६ ते ४२ डी. से. तापमानात शेवग्याला २२ ते २६ रू. भाव मिळेल. म्हणून मार्चमध्ये शेवग्याची छाटणी करा. मग त्याचा दुसरा बहार जून ते ऑगस्ट २०१५ पर्यंत चालेल. पुन्हा सप्टेंबर २०१५ मध्ये छाटला की भाद्रपद महिन्यात नवीन फुलकळी लागेल. शेवग्याला साधारण २ वेळा म्हणजे भाद्रपद आणि उन्हाळ्यात फुलकळी लागते. तेव्हा बहाराचे याप्रमाणे नियोजन करा."

सरांनी सांगितले, "शेवग्याला जादा पाणी चालत नाही. जर पाऊस सतत ७ - ८ ते १५ दिवस झाला तर मावळ, मुळशी तालुक्यात तसेच कोकणात टिकावाच्या दांड्याच्या आकाराचे शेवग्याचे खोडदेखील सहज उपसून येते. सध्या पाऊस जादा झाल्याने गवत जादा झाले असेल. तेव्हा ते काढण्यासाठी मजूर न लावता छोट्या ट्रॅक्टर किंवा औताखाली गाडून टाकावे. गवत जर उंच वाढलेले असेल तर प्रथम ते विळ्याने वीत ते १ फूट कापणे. म्हणजे ते ट्रॅक्टरच्या दात्यात अडकणार नाही. जर हे नाही कापले तर ते अर्धेसुद्धा मातीत गाडले जात नाही आणि तसेच जर गाडले तर परत उगवण्याची शक्यता असते. तसेच शेवग्याला या परिस्थितीत (जादा पाऊस) कोणत्याही प्रकारे रासायनिक खत वापरू नये कारण त्याला फूल न लागता तो माजतो व उंच वाढतो.

शेवग्याला विदर्भातील ४० - ४२ ते ४५ डी.से. तापमानात पाणी ठिबकने दिल्याने ते बुंध्यापर्यंत (मुळ्यांपर्यंत) पोहचत नाही, त्यापुर्वीच त्याचे उष्णतेने बाष्पीभवन होते. अशा परिस्थितीत शेंगा ह्या जांभळ्या होतात, त्या फुटतात. देठाच्या बाजूला शेंगा पिचकते. देठ सुकतात. तेव्हा या अवस्थेत पाण्याचे प्रमाण वाढवून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी ही संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत करावी. म्हणजे शेंगा चांगल्या पोसतात.

या शेवग्याबाद्द्ल सल्ला मसलत चालू असतानाचा श्री. भास्कर विठ्ठलराव दहातोंडे, मु. पो. साले वडगाव, ता.आष्टी, जि.बीड. मोबा. ९८८१४६४७४४ हे शेवग्याची कमी उगवण आणी पुढे उत्पादनाच्या दृष्टीने करावयाचे नियोजन याबद्दल सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांनी 'सिद्धीविनायक' शेवग्याचे १५०० बी १ सप्टेंबर २०१४ ला थेट शेतात टोकले. आम्ही देखील शेतातच थेट बी टोकले होते. मात्र आम्ही वापसा आल्यावर बी टोकलेले असल्याने १००% उगवले आणि दहातोंडे यांनी पाऊस जादा झालेला असताना शेतात चिखल असताना लावल्याने त्यांचे ५० ते ६०% च बी उगवले. हे आता दहातोंडे यांच्या लक्षात आल्यावर ते सरांकडून रोपे अथवा नवीन बी घेवून लावणार आहे असे म्हणाले.

सरांनी कमी उगवणीचे कारण असे सांगितले की, ज्याप्रमाणे कंदीलाची काच तापते आणि त्यावर ओल्या हाताचे पाणी पडले तर काच तडकते. त्याप्रमाणे ४ महिने उन्हाने जमीन तापली असताना अचानक जादा पाऊस झाल्याने जमिनीत उष्णतेची धग निर्माण झाली आणि अशा परिस्थितीत बी लावले गेल्याने शेवग्याचे बियाने गुबारा धरला किंवा हुपारले आणि कुजले असणार, त्यामुळे ५०% च उगवण झाली.

दहातोंडे यांनी त्यांची दुसरी समस्या मांडली, ती म्हणजे पाऊस जादा झाल्याने शेतात गवत जादा झाले आहे. तेव्हा यावर तणनाशक फवारले तर चालेले का ? तेव्हा मीच (शेलार) त्यांना माझा अनुभव सांगितला. आमच्या शेवग्याच्या शेजारच्या श्री. शिवाजी ढवळे या शेतकऱ्याने उसाला तणनाशक फवारले तर त्याची वाफ एवढी तीव्र होती की, या उसाच्या कडेच्या ओळीतील छातीएवढी उंच ३०० शेवग्याची झाडे गेली. तणनाशकाची ८ दिवस वाफ जात नाही. तेवह कृपया तुम्ही तणनाशक फवारू नका. आमची २।। एकरात ४३५० शेवग्याची झाडे होती. त्यातील ४००० च झाडे राहिली आहेत. आम्ही ५' x ५' वर लागवड केली असून छोट्या ट्रॅक्टरने मशागत करता येवू शकते. तेव्हा तुम्ही तर ७' x ७' वर शेवगा लावला आहे. यामधून उभी- आडवी छोट्या ट्रेक्टरने पाळी मारून फक्त रोपाभोवतीचे गवत मजुरांकडून काढून घ्या. म्हणजे सुलभतेने कमी वेळेत, कमी खर्चात पीक तणमुक्त होईल.