शेवगा पुस्तकाची सुधारीत ६ वी आवृत्ती प्रसिद्ध

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



भारतीय शेती ही इतर उद्योगधंद्यासारखी नसून भारतामधील अर्धशिक्षीत व अशिक्षीत ७०% लोक आपल्या वसुंधरेवर मायेच्या पोटी प्रेम करून शेती कसत आहेत. स्वातंत्र्यापुर्वीची १०० वर्षे व स्वातंत्र्यानंतरच्या ३० वर्षापर्यंत निसर्ग, मान्सुन आणि हवामान हे बऱ्यापैकी शेतीला साथ देत होते आणि गरजेपुरते अन्नधान्य व भुलभुत लागणाऱ्या वस्तू डाळ, गळीतधान्य, तृणधान्य (भुसार) पिकविला जात असे. परंतु राजकिय व्यवस्थेतून जेव्हा ऊसासारख्या पिकाचा उदय व उद्रेक १९६० - ७० आणि ८० च्या काळात झाला तेव्हा जोपर्यंत निसर्ग अनुकूल होता. तोपर्यंत क्षेत्र व उत्पादन वाढत गेले. रासायनिक खते व पाण्याच्या अति वापराने एकरी उत्पादन घटून क्षेत्र वाढून राजकिय लोकांनी कारखान्यांची संख्या वाढवून अनेक राजकिय अड्डे निर्माण झाले आणि येथून काही अंशी जरी सकारात्मक बदल ऊस शेती व कारखानदारीने केले तरी नंतर ऊस शेती ही वरदान नसून शाप ठरली. साखर कारखाने तोट्यात जाऊन दिवसेंदिवस साखर महाग होत गेली. ३०% साखर गृहोपयोगी व ७०% साखर ही व्यवसायात मिठाया, चॉकलेट, गोळ्या, बिस्कीटे, विविध पेये असे पदार्थ बनविण्यात वापरली जाऊ लागली. म्हणजे खरे तर साखरेचा दर व्यापारी उद्योगात जास्त ठेवणे व गृहोपयोगात कमी ठेवणे असे धोरणात्मक अजूनही जमले नाही. यातून उपाय निघत नाही. म्हणून ऊस शेतीला समांतर फळबागा लागवडीकडे शेतकरी वळले. परंतु यातही निसर्ग बदलला, निविष्ठांचा खर्च वाढला, बाजारभाव मिळेना, यामध्ये भारतीय शेतकरी हा भरडला गेला. तरीही काही अंशी फळबाग शेतीला चांगले दिवस आले. परंतु बाजारपेठा आणि मुल्यवर्धन न साधल्याने, पावसाचे मान प्रचंड कमी झाल्याने अभ्या राहिलेल्या फळबागा ह्या दुष्काळाने उद्ध्वस्त झाल्या. या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही २५ वर्षापासून पारंपारिक शेती व फळबागा याला पर्यायी पीक म्हणून भारतीय आणि तिसऱ्या जगातील गरीब शेतकऱ्यांसाठी शेवगा या पिकाचा अभ्यास केला, देशभर अनेक प्रयोग केले आणि ९० च्या दशकानंतर हे पीक भारतीय आणि तिसऱ्या जगातील गरीब राष्ट्रांना वरदान ठरत आहे हे लक्षात आले आणि यात जस जशा समस्या येऊ लागल्या त्यावर उपाय शोधत गेली. परंतु गेल्या ५ - ६ वर्षात हवामानात प्रचंड बदल झाले, दुष्काळी परिस्थिती यामुळे नवनवीन समस्या निर्माण झाल्या. त्यावरून आम्ही महाराष्ट्रात व देशाच्या अनेक जिल्ह्यात प्रयोग करत गेलो, त्याचे निष्कर्ष चांगले मिळत गेले.

या पिकास इतर अन्य पिकांपेक्षा बरा भाव व पहिल्या वर्षीय उत्पादन मिळत असल्याने लोक पैशाच्या मोहापाई एक एकरपेक्षा जास्त लागवड/प्रयोग करू लागले. ज्यांनी काटेकोर नियोजन केले त्यांना यश मिळाले. पण ज्यांनी आमच्या मुख्य कार्यालय व कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क न साधता त्याची काळजी, दक्षता, व्यवस्थापन वेळेवर न केल्याने शेतकऱ्यांना विविध समस्या येऊ लागल्या. गेल्या २ वर्षांमध्ये दुष्काळ आणि वातावरणातील बदल यामुळे शेवग्याची उत्पादन क्षमता व हवामानातील बदलामुळे शेवग्यातील विविध भाव जसे पान, फुल, शेंगा यात अधिक विकृती येऊन उत्पादनात व दर्जात घट येऊन बाजार भावातील चढउतार यामुळे शेवग्यामधील प्रश्न थोडे गुंतागुंतीचे होऊ लागले. या सर्व प्रश्नांवर बऱ्यापैकी उत्तर मिळत गेल्याने केलेल्या प्रयोगाची निरीक्षणे व टिपणे आम्ही 'सिद्धीविनायक' शेवग्याची ६ वी सुधारीत आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये कमी क्षेत्रावर (अल्पभुधारक) यशस्वी केलेल्या यशोगाथा, शेवग्यातील आंतरपिकाच्या यशोगाथा, दुष्काळ व कमी पाण्यावर 'सिद्धीविनायक' शेवग्याने दिलेले उत्पन्न, पारंपरिक पिके न घेता 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी, आदिवाशी भागात 'सिद्धीविनायक' शेवग्याचे प्रयोग, निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रयोग, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतावर केलेले प्रयोग, शेवग्याच्या अनेक बहाराचे यशस्वी प्रयोग, महाराष्ट्राबाहेर केलेले प्रयोग, व्यवसाय, नोकरदार व निवृत्तीनंतरच्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, शेवग्यातील विविध समस्या, कारणे व उपाय, 'Moringa A Crop of Future ' हा डॉ. एच. पी. सिंग, उपमहासंचालक फलोद्यान, भारतीय कृषी अनुसंधान, भारत सरकार, नवी दिल्ली यांचा अनुभव सिद्ध लेख हा आधुनिक काळातील शेतकऱ्यांच्या मुलांना अधिक प्रेरणादायक ठरेल.

शेवगा या विषयावर ज्यांना नवीन अभ्यास करायचा आहे व यातून शेवग्याचे मुल्यवर्धन कसे करता येईल याचे आम्ही इंग्रजीत संदर्भ दिले आहेत आणि शेवगा आयात करणाऱ्यांची यादी ही प्रकरण ५२ वर नमुना दाखल दिली आहे. याचा आपण नेटवरून अभ्यास करून मुल्यवर्धन न निर्यातयोग्य पदार्थ निर्माण झाले तर आमच्या प्रयत्नांचे सार्थक झाले असे होईल. नवनवीन प्रकल्प, पिकांचा शोध घेण्यामध्ये आम्हाला प्रेरणा मिळेल, तेव्हा आपले सहकार्य आम्हाला अपेक्षीत आहे.

गेल्या २५ वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि जवळील राज्य येथे ४० - ५० हजार शेतकऱ्यांनी 'सिद्धीविनायक' शेवगा लावला व त्यासाठी संदर्भ म्हणून आतापर्यंत शेवग्याच्या ३० हजार प्रतींचा अभ्यास केला तसेच १० ते १५ वर्षांपासून शेतकऱ्यांचे दरवर्षी अनुभव व प्रयोग 'कृषी विज्ञान' मासिकातून दिल्यामुळे हे शक्य झाले आणि अशा रितीने पुढे वाटचाल चालूच आहे. नवीन परिस्थितीने नवीन प्रश्न व समस्या निर्माण होतात. म्हणून खचून जाऊ नये. २० - २५ वर्षाच्या काळात १ - २% उदाहरणे अडचणी येत राहतात आणि याच्यावर सहकार्याने आपण सर्वांनी मात करायची आहे. तेव्हा आपली आम्हाला साथ आणि सहकार्य याची मायेसारखी गरज आहे. म्हणून नवीन ६ वी सुधारीत आवृत्ती देण्यामध्ये आम्हाला आनंद होत आहे. हे पुस्तक सर्व शेतकऱ्यांना, विकास अधिकारी, संस्था, तरुणांना, नवीन शेतीमध्ये पदार्पण करणाऱ्यांना, स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल याबद्दल खात्री आहे.