लसूण लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


आयुर्वेदिक महत्त्व : आयुर्वेदामध्ये लसणाचे गुणधर्म इतके प्रभावी आहेत की, आयुर्वेदाचार्य, हृदयरोग तज्ज्ञ रोजच्या आहारात एक लसणाची पाकळी घेण्याची शिफारस करतात.

लसणाच्या पाकळीचा रस घेण्याने शरीरातील रक्त पातळ होते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तसेच आतील रक्तवाहिन्यांची अनियमित जाडी कमी होते. रक्त पातळ झाल्याने रक्तातील प्लेटलेटस चोपड्या होतात आणि रक्ताच्या गाठी बनत नाहीत. रक्ताच्या गाठी संकुचित धमन्यांमध्ये आडकल्यास हृदयविकार आणि पक्षाघ होण्याचा संभव असतो. हगवण थांबविण्यासाठी लसणाचा वापर केल जातो. लसूण खाल्ल्याने जठराग्नी प्रभावित होतो. लसणाच्या पाकळ्यांचा रस घेतल्याने ज्वर कमी होतो. लसूण कृमी नाशक आहे, तेव्हा लसणाचा आहारात वापर नियमितपणे करवा. ताजे लसूण खाल्ल्यास शरीरात जमा झालेले नुकसानकारक कोलेस्टेरॉल कमी होते. त्याचबरोबर व्यक्तीचा आतड्याच्या कर्करोगापासून बचाव होतो. ज्यावेळेस कोलेस्टेरॉल वयोमानानुसार वाढत असेल (८० -१२० Standard Level) म्हणजे १५० पेक्षा पुढे जात असेल अशा व्यक्तींचा व्यायाम कमी असतो.

मांसाहार, चरबीयुक्त, तेलयुक्त, तळलेले पदार्थ यांचे आहारात प्रमाण जास्त असून रक्तदाबाचे प्रमाण १५० ते २०० पर्यंत वाढलेले असते. अशा अवस्थेमध्ये त्ज्ज्ञ डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांबरोबरच, सकाळी दूध घेण्याअगोदर तांब्याच्या भांड्यातील पाण्याबरोबर लसणाच्या एका पाकळीचा रस महिनाभर घेतल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाल्याचे अनुभवास आले आहे. म्हणून प्रथमपासून आहारामध्ये लसणाचा समावेश, आल्याबरोबर लसूण पेस्टचा समावेश अत्यावश्यक आहे. जरी चातुर्मासामध्ये काही लोकांना कांद्याबरोबर लसूणही वर्ज्य आहे किंवा जैन, मारवाडी समाजातील लोकांच्या आहारामध्ये साधारणपणे कांदा, लसणाचा समावेश नसतो. अशा लोकांना बैठे काम असल्यामुळे जास्तीत जास्त हृदयविकार, रक्तदाब आढळतो तेव्हा मात्र नाईलाजाने डॉक्टरांनी सुचविल्या प्रमाणे लसूण अर्कयुक्त कॅप्सूल्स 'औषध' या नावाखाली द्यावे लागते. म्हणून काही मतप्रवाहामध्ये लसूण निशिद्ध आहे. असा विचार करू नये व आहारात नेहमी लसणाचा समावेश करावा. वरील सर्व आयुर्वेदीक गुणधर्मांच आधार घेऊन 'रॅनबक्सी' या कंपनीमार्फत लसणाच्या कॅप्सूल्स तयार करून सर्व आशिया खंडात यशस्वी वितरण सुरू केले आहे.

अर्धशिशीवर लसणाचा रस कानात घालावा. पोटशुळावर लसूण,हिंग,जिरे, सुंठ, ओवा, मीठ यांचे चूर्ण करून त्याची गुळामध्ये गोळी करून खावी. कान ठणकत असल्यास २ -३ चमचे खोबरेल तेलामध्ये ४ लसणाच्या पाकळ्या सोलून टाकाव्यात. तेल गरम करून ते कापसाच्या बोळ्यात २/३ थेंब टाकून तो कानात ठेवावा किंवा लसणाचा रस एके चमचा व तीळाचे तेल एक चमचा यांचे मिश्रण करून २ -३ वेळा कानात घालावे. आर्दित वायूवर लसूण वाटून तीळाच्या तेलातून खाणे. कर्णशूळावर तीळाच्या तेलात लसूण, बेलफळाचा गर टाकून उकळावा व कानात टाकावा. वाताने अंगात कळा येत असल्यास लसूण, सुंठ व मिरी एकत्र वाटून त्याची गुळामध्ये गोळी करून कोमट पाण्यातून घ्यावी. खोकला झाल्यास लसूण भाजून ३ -४ पाकळ्या चुरडून, दुधात घालून कोळाव्यात, नंतर लसणाच्या पाकळ्या काढून ते दूध साखर घालून अर्धी वाटी प्याल्यास खोकला थांबती. लसूण भाजून तो गुळाबरोबर खाल्ल्यास थंडीचा खोकला थांबतो.

हवामान : लसूण हे रब्बी हंगामात येणारे पीक आहे. दिवसाचे तापमान साधारण २५ ते ३० डी. सें. आणि रात्रीचे तापमान १० से १५ डी. सें. या तापमानात लसणाच्या गड्ड्याची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्यात केल्यावर डिसेंबर - जानेवारी या महिन्यातील तापमानात गड्डा चांगला पोसला जातो. समशीतोष्ण वातावरण व प्रदीर्ध हिवाळा असतो. तेथे लसूण लागवड फायदेशीर ठरते.

जमीन : लसूण हे कंदवर्गीय पीक असल्याने हलकी ते मध्यम प्रकारची जमीन चांगली असते. गड्डा पोसण्यासाठी पोयट्याची, मध्यम काळी व सुपीक जमीन निवडावी. कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्यावर जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकविला जातो. त्यामुळे गड्डा पूर्ण पोसला जाऊन उत्पन्नात वाढ होते. खारवट किंवा भारी काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत नाही. त्यामुळे गड्डा मर्यादित वाढतो व काढणीच्या वेळी गड्डा जमिनीत तुटून राहतो. त्यामुळे उत्पन्नात घट येते.

जाती :

१)साधा लसूण -

या लसणाच्या पाकळ्या बारीक असून साल पांढरट असते. निघायला किचकट, अर्क व वास गावराण लसणापेक्षा कमी असून एका गड्ड्याचे वजन १५ ग्रॅमपर्यंत असते. या लसणाच्या पाकळ्या जास्त निघतात.

२) गावराण लसूण - या लसणाचा आकार डेरेदार, आकर्षक व रंग पांढरा मिश्रीत फिक्कट जांभळा असतो. लसूण घट्ट असून मर कमी असते. कवच जाड, कुडी मोठी डेरेदार व सोलण्याच्या जागी विशिष्ट प्रकारची ठेवण असलेला व सोलायला सोपा असतो. आतल्या कुडीच्या वरही मध्यम जाड, चमकदार असतो. हा लसूण सोलताना नाकात झिणझिण्या आणणारा वास येतो व यात अर्क जास्त असतो. या लसणास स्वाद चांगल असून आयुर्वेद मुल्य अधिक आहे. हा लसूण खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये प्रसिद्ध आहे.

३) गुजरात (जुनागढ ) लसूण - गेल्या १० -१५ वर्षामध्ये राजकोट किंवा जुनागढचा लसूण सध्या प्रचलित झाला आहे. हा लसूण अतिशय मोठ्या पाकळीचा साधारण १ किलोत १५ ते २० लसूण कांड्या बसतात. या लसणास स्वाद कमी व अर्क कमी असतो. परंतु अधिक उत्पन्न व दिसण्यास आकर्षक असल्याने प्रक्रिया उद्योजक, हॉटेल व्यावसायिक व्यवसायिक, मसाले उत्पादक निर्यातदार हा लसूण अधिक पसंत करतात, हा लसूण निवडायला सोपा असून टरफल मोठे असते.

४) यमुना सफेद लसूण (जी २८२) - राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान नाशिक या संस्थेने हे वाण विकसीत केले आहे. गड्डा घट्ट, पांढरा १ ते ६ पाकळ्यांचा असून ५.६ सेंमी जाड व ५.५ ते ६ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १५० दिवसात काढणीला येतो. एकरी ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळते.

५) अॅग्रीफाउंड व्हाईट लसूण (जी ४१) - राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान नाशिक (एन.एच.आर.डी.एफ) या संस्थेने हे वाण विकसीत केले आहे. लागवडीपासून १२० ते १३५ दिवसात काढणीस येतो. गड्डा मध्यम ते मोठा साधारण जाडी ४ ते ४.५ सेंमी व उंची ४.५ सेंमी असते. गड्ड्यामध्ये १३ ते १८ पाकळ्या असून रंग पांढरा असतो. स्वाद मध्यम तिखट असून सरासरी एकरी ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळते.

६) श्वेता लसूण - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून विकसीत केलेली जात असून गड्डा पांढरा शुभ्र, ५.२ सेंमी जाड व ५ सेंमी उंचीचा असतो. गड्ड्यात २२ ते ३३ पाकळ्या असतात. १३० ते १३५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळते.

७) गोदावरी लसूण - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून विकसीत झाली असून गड्डा मध्यम, जांभळट पांढरा असतो. गड्ड्यामध्ये २० -२५ पाकळ्या असतात. गड्डा ४.३५ सेंमी जाड व ४.३ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १४५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० ते ४५ क्विंटल उत्पादन मिळते.

लसणाचे बेणे - गेल्या वर्षीचे चांगले बेणे निवडावे सर्वसाधारणपणे शेतकरी लसणाच्या माळा गाठी बांधून छप्पराच्या आतील बांबूवर साठवणूकीसाठी टांगून ठेवतात व असे बेणे मरत नाही.

बेणे प्रक्रिया - १५ ते ३० मिली जर्मिनेटर + १ लिटर पाणी या प्रमाणात मिश्रण तयार करून या मिश्रणामध्ये लसणाच्या पाकळ्या रात्रभर भिजवून व नंतर उपसून, सुकवून लावाव्यात. एकरी २ क्विंटल बेणे लागते. जमिनीची जलधारण क्षमता (Water Holding Capacity ) मध्यम म्हणजे ३० ते ४५ पर्यंत असेल आणि जमिनीमध्ये वाळू (silt) चे प्रमाण जास्त असेल तर शेणखत ४ ट्रोल्या, कल्पतरू सेंद्रिय खताच्या ५० किलोच्या २ते ३ गोण्या ( सपाट वाफ्यावर वापराव्यात. जमीन अति चांगली असल्यास रान कोरडे करून, वाफे तयार करून (अगोदर कल्पतरू सेंद्रिय खत १०० किलो टाकून घ्यावे) यामध्ये प्रक्रिया केलेल्या कुड्या ७.५ x ७.५ सेंमी अंतरावर टोकाव्यात. याची उगवण १५ दिवसात पूर्ण होऊन अतिशय टवटवीत दिसते. याची लागण बर्‍याच भागात काही शेतकरी गणपतीमध्ये करतात. (खेड, मंचर, नारायणगांव भागांमध्ये कमी पाऊस असलेल्या ठिकाणी) हे पीक साधारणपणे साडेतीन ते पाच महिन्यात तयार होते.

पीक संरक्षण - लसणाची पात एक महिन्याची झाल्यावर हलकीशी खुरपणी करावी व नंतर कल्पतरू सेंद्रिय खताची मात्रा व सप्तामृत प्रत्येकी २५० मिलीचा फवारा घ्यावा. ज्यावेळेस गणपतीच्या आसपास किवा नवरात्री ते दिवाळीपर्यंत लसणाची लागवड होते. अशा कालावधीमध्ये हवामान खराब असते. गणपतीच्या काळात हवेत आर्द्रता, ढगाळ हवामान, हवेत उष्णता व हस्ताचा मुसळधार पाऊस पडतो तर नवरात्रामध्ये थंडी, धुई, धुके, सुरकी पडते व ७ डी. ते ८ डी. सें. पर्यंत तापमान खाली जाते. अशा वातावरणामध्ये लसणाची पात पिवळी पडते. 'करपा' रोगाचा प्रादुर्भाव होतो. पतीला 'सुकवा' होऊन गाठ भरत नाही. अशा अवस्थेमध्ये दोन्ही वेळा खुरपणी करून पहिली फवारणी प्रत्येकी २५० मिली सप्तामृतची एकरी करावी. नंतर दर १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. शक्यतो रासायनिक खताचा वापर करू नये. भारी किंवा हलक्या जमिनीत रासायनिक खते वापरल्याने उत्पन्न अधिक येते, परंतु टिकाऊपणा राहत नाही.

साधारणपणे कांदा मागणी व गरज जास्त असल्याने लवकर संपतो. परंतु लसूण कांद्याच्या मानाने आहारामध्ये कमी लागत असल्याने शेतकरी, व्यापारी व गिर्‍हाईकांकडे १५ दिवस ते महिनाभर राहतो. अशा राहिलेल्या लसणामध्ये 'मर' सुरू होते. रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर मर होते असा सर्वसाधारण अनुभव आहे. परंतु लसणाकरिता सप्तामृत औषधे वापरल्याने ६ ते ७ महिने काढल्यानंतरही मर होते नाही.

कल्पतरू सेंद्रिय खत व सप्तामृत औषधे वापरलेला लसूण हा निर्यातीकरीता, आहारामध्ये आयुर्वेदामध्ये, प्रक्रिया उद्योगामध्ये, रसनिर्मितीमध्ये, औषध निर्मितीसाठी अतिशय उपयुक्त ठरतो.

काढलेला लसूण गरवा किंवा जुनागढ किंवा बारीक कुड्यांचा लसूण जानेवारी/ फेब्रुवारी मध्ये काढला तर वातावरणातील तापमानामुळे खांदलेला लसूण बारीक कुड, कवच पातळ असल्याने यामध्ये मर मोठ्या प्रमाणात आढळते. असा लसूण आत दबलेला, पोकळ, वजनाला हलका, आतून लालसर, पिवळसर करड्या रंगाचा झटकन पाकळ्या निघणारा असा होते. हा लसूण बदला नव्हे तर बाद होतो. अशी अवस्था होऊ नये म्हणून, तसेच लसूण पोसावा. लवकर काढणीस याचा म्हणून काही शेतकरी मिश्रखत, रासायनिक खताचा वापर करतात. रासायनिक खत वापरल्याने ३०% मर आढळते व प्रचंड नुकसान होते.

लसणाचे कीड, रोगमुक्त पीक येऊन अधिक दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी खालीलप्रमाणे घ्यावी.

१) पहिली फवारणी : ( उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर ३०० ते ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( ४५ ते ६० दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : ( ६० ते ७५ दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + २०० लि. पाणी.

ढगाळ पावसाळी हवामान, धुके अशा अवस्थेमध्ये फवारणी वाढवावी. सप्तामृताच्या वापराने लसणाचा टिकाऊपणा वाढतो. शेंडे जळत नाहीत. पातीवर करपा येत नाही. पात डेरेदार व रसदार तयार होऊन याचे रूपांतर गड्डा चांगला पोसण्यास होते. सप्तामृतातील प्रोटेक्टंटमुळे मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होत नाही. तर क्रॉंपशाईनरमुळे थंडीत जरी पातीवर दव पडले तरी या पातीवर विशिष्ट प्रकारची चमक व क्युटिकल लेअर (Cutiacal Layer) वाढत असल्याने दवाचे थेंब पातीवर थांबर नाही, सटकतात व करपा, टाक्या येत नाही. रासायनिक खत वापरल्यास करपा येतो. पात पिवळी पडते. अशा खतांमुळे पात लुसलुशीत झाल्याने पातीवर मावा, वफा, चीलटाचे प्रमाण वाढून पात निस्तेज व कोमेजलेली होऊन गड्डा भरत नाही, तेव्हा वरील दक्षता घेऊन लसणाचे पीक करावे.

काढणी व उत्पादन : लसूण ४।। ते ५ महिन्यात काढणीस येतो. तेव्हा पाने (पात) पिवळी पडून सुकू लागतात. गड्ड्याच्या मानेजवळ पातीत बारीक गाठ तयार होते. त्याला 'लसणी फुटणे' असे म्हणतात. १५ -२०% लसणी फुटल्यावर पिकाला पाणी देणे बंद करावे. नंतर १० -१२ दिवसांनी गड्डे उपटून किंवा लहानशा कुदळीने खणून गड्डे काढावेत. पातीसह गड्डे ५ -६ दिवस उन्हात वाळवून नंतर जुड्या बांधून त्या छपरात किंवा घरामध्ये हवेशीर दोरावत टांगून ठेवल्यास या पद्धतीने टिकाऊपणा वाढतो.

विशेष महत्त्वाचे : साधारण पुढील १० वर्षामध्ये ज्याप्रकारे आले, कांदा यांना मागणी वाढत आहे, त्यापेक्षाही अधिक लसणास जगभर मागणी वाढत राहील. म्हणून शेतकर्‍यांनी लसणाचे आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्व लक्षात घेता निर्यातीपेक्षा प्रक्रिया उद्योग (रस, तेल आदी) उद्योगाकरिता लागवड करवी. लसणाचे तेल पाय मुरगळल्यावर, चमक भरल्यावर, लसूण व लवंग तेलाचा वापर करतात. त्याचप्रमाणे लसूण तेलाने दाढदुखी बरी होते. अशा वेळेस लंवग तेलाचा तुटवडा भासल्यास लसणाच्या तेलचा उपयोग दंतमंजन करण्यामध्ये होऊ शकतो का ? याकडे प्रक्रिया उद्योजकांनी लक्ष द्यावे.