स्टिविया - मधुमेहींस एक संजीवनी

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


निसर्गाची देणगी म्हणूं प्राप्त झालेली स्टिविया (मिठी पत्ती, मधुपर्णी) ही वनस्पती मधुमेहाने आणि लठ्ठपणाने त्रस्त झालेल्या व्यक्तींसाठी जणू काही वरदानच ठरली आहे. स्टिविया हे सुर्यफुलाच्या वर्गातील (Asteraceae) पिक आहे. ही वनस्पती बहुवर्षीय असून हर्ब (Herb) या प्रकारात मोडली जाते. या वनस्पतीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणत नैसर्गिक साखर असल्याने मधुमेही तसेच उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांसाठी याचा उपयोग मोठ्या प्रमाणत वाढत असल्याचे दिसून येत आहे. हिरव्या पानांमध्ये असलेली साखर ही उसापासून तयार करण्यात येणाऱ्या साखरेपेक्षा २५ ते ३० पट गॉड असून कॅलरी रहित असल्याने त्याचे सेवन अत्यंत सुरक्षित तर आहेच तसेच याचे कुठलेही दुष्परिणाम (साईट इफेक्ट्स) नाहीत.

स्टिवियापासून बनविण्यात येणारी अनेक उत्पादने ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, लठ्ठपणा, पोटात होणारी जळजळ, ह्दयाचे आजार, त्वचेचे रोग, दातांच्या समस्या, चेहऱ्यावरील सुरकुत्या इत्यादी समस्यांवर फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये अँटी व्हायरल, अँटी बैक्टेरियल, अँटी एजिंग आणि अँटी डैन्द्रफ गुणधर्म असून १५ आवश्यक खनिजांचा आणि प्रथिनांचा समावेश आहे. या वनस्पतीच्या पानांमध्ये सामाविष्ट असणारे स्टिवियोसाइड (Stevioside), रिबाउडीओसाइड (Rebaudioside) व अन्य घटक इन्सुलिची मात्रा योग्य प्रमाणात ठेवण्याचे कार्य करतात. ह्या वनस्पतीच्या पानांवर प्रक्रिया करून तयार करण्यात येणारी पांढरी पावडर ही साखरेपेक्षा २०० ते ३०० पट गोड आहे.

स्टिवियाचे मूळ उगमस्थान उत्तर व दक्षिण अमेरिका आहे. या पिकाची लागवड ब्राझील, जपान, कोरिया, तैवान आणि दक्षिण पूर्ण एशिया मध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. तचेस भारतमध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड येथे या पिकाचे उत्पादन लहान - मोठ्या - प्रमाणात घेतले जाते. हे पीक सलग ३ ते ५ वर्षाकरिता घेता येत असल्याने लागवडीसाठीचा खर्च एकदाच करावा लागतो. तसेच त्यापासून उत्पादन देखील लवकर मिळत असल्याने शेतकऱ्यांना लगेचच त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळायला सुरुवात होते.

* स्टिवियाचे उपयोग :

स्टिवियाचा उपयोग टूथपेस्ट, च्युईंगम, मिठाई, बिस्किट, चॉकलेट, कॅंडी, मिंट फ्रेशनर, सॉस, जाम, जेली, मार्मालेड, लोणचे, आईसक्रिम , केक, योगर्ट तसेच फार्मसी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.

स्टिवियाचे उपायगो आणि महत्त्व जाणून घेतल्यावर त्याची लागवड कशी करावी हा प्रश्न आता आपल्या समोर उभा राहिलाच असेल. त्यासाठी पहिले लागवडीपूर्व नियोजन कसे करावे हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. पहिले हवामान व जमिनीची निवड कशी करावी या महत्त्वाच्या मुद्द्याविषयी आपण पाहुयात.

* तापमान : समशीतोष्ण तापमान तसेच योग्य आर्द्रता असलेल्या भागात या पिकाची लागवड करावी. ज्या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान १५० सेमी आणि ३० ते ३२ डिग्री सेंटीग्रेड सरासरी तपामण असेल त्या ठिकाणी या पिकाची वाढ चांगली होते. ४१ डिग्री सेंटीग्रेड पेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकणी या पिकाची लागवड करू नये.

* जमीन : पिकाच्या लागवडीकरिता वालुकामय किंवा लाल माती असलेली, पाण्याचा निचरा होणारी व ५ ते ६ च्या दरम्यान सामू असणारी जमीन निवडावी. क्षारयुक्त तसेच पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये. लागवडीपूर्व जमीन तयार करणे हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जमीन तयार करण्यासाठी लागवडीपुर्वी नांगरणीच्या २ ते ३ पाळ्या देऊन त्यानंतर वखरणी करावी. यामुळे जमिनीवरील ढेकळे फुटली जाऊन, शेतीतील तणे सुद्धा निघतात. तसेच जमीन भुसभुशीत होऊन जमिनीचा पोत देखील चांगला होण्यास मदत होते. जमीन तयार करताना जमिनीवर पाणी साठून राहू नये ही काळजी घ्यावी. याकरिता जमिनीचे सपाटीकरण करणे आवश्यक आहे.

* जाती : कुठलेही पीक घ्यायचे म्हटले की त्याच्या जाती कोणत्या, त्याचे गुणधर्म काय हे डोक्यात येणे अगदी सहाजीक आहे. याकरिता स्टिविया काही महत्त्वाच्या जातींची ओळख आपण करून घेवूया. भारतात मुख्यतः एम. डी. एस. - १३ व एम. डी. एस.-१४ या दोन जातीचा वापर लागवड करण्याकरिता केला जातो. या दोन्ही जाती विकसीत असून यांची उत्पादन क्षमता ही इतर जातीपेक्षा जास्त आहे. उष्ण हवामान व कमी पाऊस पडणाऱ्या ठिकाणी ह्या दोन्ही जातीचा वापर लागवडी करीता केला जातो. तसेच मोरिता -१, मोरिता -२, मोरिता -३ ह्या देखील जातीचा वापर हल्ली मोठ्या प्रमाणात लागवडीकरीता केला जात आहे. तसेच स्टिवियाच्या पानांमध्ये असणाऱ्या ग्लुकोसाईडच्या आधारावर पुढील जाती विकसीत केल्या आहेत.

* एस. आर. बी. - १२३: या जातीमध्ये ९ - १२% ग्लुकोसाईडचे प्रमाण असून एका वर्षात याची पाच वेळा कापणी केली जाते.

* एस. आर. बी. - ५१२ : या जातीचा वापर उत्तर भारतात लागवड करण्याकरिता केला जातो. ह्यामध्ये ९ - १२% ग्लुकोसाईडचे प्रमाण असून एका वर्षात याची चार वेळा कापणी केली जाते.

* एस. आर. बी. - १२८ : संपूर्ण भारतात लागवड करण्याकरिता ही जात उत्तम मनाली जात असून या जातीमध्ये २१% ग्लुकोसाईडचे प्रमाण आहे. एका वर्षात याची चार वेळा कापणी केली जाते.

* लागवड : जातींची निवड करून झाल्यावर स्टिवियाची लागवड कशी करावी या विषयाकडे आपण वळूयात. स्टिवियाची लागवड भारतात पूर्ण वर्षभरात केव्हाही केली जाऊ शकते. परंतु दिवसमान मोठे असलेला फेब्रुवारी व मार्च महिना लागवड करण्याकरिता उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. स्टिवियाची लागवड ही बियांपासून किंवा कटिंगद्वारे किंवा रोपांद्वारे केली जाते. या पिकाचे बियाणे आकाराने खूपच छोटे असून त्यांची उगवण क्षमता ही देखील अत्यंत कमी असल्याने शक्यतोवर लागवडीकरिता बियाण्यांचा वापर टाळावा.

चांगल्या उत्पादनाकरिता कटिंगद्वारे लागवड करायची असल्यास पॉलिथीन बॅगमध्ये माती, वाळू आणि कल्पतरू सेंद्रिय खत व शेणखत यांचे मिश्रण करून त्यामध्ये कटिंग जर्मिनेटर १०० मिली + १० लिटर पाणी प्रमाणत द्रावणात ५ ते १० मिनिटे बुडवून काढून लावावीत. त्यानंतर ह्या बॅगा हरित. गृहात ७ ते ८ आठवड्याकरिता ठेवाव्यात. त्यानंतर त्यांची सेटमध्ये पुनर्लागवड करावी. कटिंगची लागवड पॉलिथीन बॅगमध्ये न करता थेट हरितगृहात देखील केली जाते. हरितगृहाची व्यवस्था उपलब्ध नसल्यास सेटमध्ये कटिंगची लावणी करावी. लागवडीकरिता कटिंगची निवड करताना कटिंगची लांबी ही साधारणपणे १५ सेमी असावी. लागवडीनंतर साधारणपणे ४ आठवड्यानंतर कटिंग पुनर्लागवडीकरिता तयार होतात.

रोपांद्वारे लागवड करायची असल्यास गादीवाफ्यावर करावी. या करिता १२ ते १५ सेमी उंच ५० ते ६० सेमी रुंद वाफे बनवावे. वाफ्यावर रोपांची लागवड करतांना ओळीतील अंतर ४० ते ४५ सेमी आणि दोन रोपांमधील अंतर २५ ते ३० सेमी ठेवून लागवड करावी. दोन वाफ्यांमध्ये १.५ फुटाचा रस्ता सोडावा. अशा प्रकारे लागवड केल्यास एक एकर क्षेत्रात २०,००० ते २५,००० झाडे लावली जातात. साधारणपणे रोपाची किंमत २ ते ५ रुपये एवढी असते. या पिकाची रोपे नाजूक असल्याने धुके असलेले वातावरण रोपांसाठी हानिकारक ठरते, म्हणूनच धुके असल्यास रोपांची पुनर्लागवड करणे टाळावे.

लागवड झाल्यावर लागवडी नंतरचे योग्य व्यवस्थापन करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. पिकाला योग्य खतमात्रा देणे, पाणी देणे, तणांचे व पिकावर पडणाऱ्या किडी तसेच रोगाचे वेळीचे नियंत्रण करणे असे अनेक मुद्दे व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचारात घ्यावे लागतात. म्हणूनच लागवड केल्यानंतर खतव्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, किडी व रोग व्यवस्थापन कसे करावे याविषयी आता आपण पाहूयात.

स्टिवियाच्या पानांचा उपयोग औषधी म्हणून केला जात असल्याने शक्यतोवर रासायनिक खताचा किंवा किटनाशकाचा वापर शक्य असल्यास टाळावा. याकरिता कल्पतरू सेंद्रिय खत, फार्म यार्ड मॅन्युअर (FYM), गांडूळखत, शेणखत याचा वापर करावा. रोपांच्या लागवडीपुर्वी शेतामध्ये २० ते २५ दिवस आधी ४ ते ६ टन शेणखत, १२० ते १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत प्रति मिसळावे. अधिक उत्पादनाकरिता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा पुढीलप्रमाणे वापर करावा.

रोपे १०० मिली + १० लि. पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी. म्हणजे रोपांच्या पांढऱ्या मुळ्या अधिक प्रमाणात फुटून रोपे लवकर वाढीस लागतात. रोपांची मर, मुळकूज रोगास प्रतिबंध होऊन लागवड यशस्वी होते.

* फवारणी

१) पहिली फवारणी : ( स्टिवियाची रोपांची लागवड केल्यानंतर १५ ते २० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : ( लागवड केल्यानंतर ३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट १५० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवड केल्यानंतर ५० ते ६० दिवसांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली. + थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ प्रोटेक्टंट ३०० ते ४०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवड केल्यानंतर ७० ते ८० दिवसांनी ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ते ६०० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली. + २५० लि.पाणी.

तसेच लागवडीनंतर दर महिन्यास जर्मिनेटर १ लि. + प्रिझम ५०० मिली + क्रॉपरऑक्सीक्लोराईड १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे एकरी २ ते ३ ड्रेंचिंग करावे. म्हणजे पिकाची १।। ते २ फूट निरोगी जोमदार वाढ होऊन एरवी स्टिवियाच्या पानांच्या पहिल्या कापणीस जो ४ महिन्याचा कालावधी लागतो. तेथे या तंत्रज्ञानाने पहिल्या कापणीची पाने ३ ते ३।। महिन्यातच येत असून पानांचे उत्पादन, पानांचा दर्जात वाढ होते. शिवाय पुढे लवकर ८० ते ९० दिवसात पाने कापणीस येत असल्याने वर्षभरात ४ कापण्या होऊ शकतात.

पहिली कापणी झाल्यानंतर वरील फवारण्या कापणीनंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने कराव्यात तसेच जर्मिनेटर, प्रिझम, कॉपरऑक्सीक्लोराईडचे आळवणी (ड्रंचिंग) १ ते १।। महिन्याच्या अंतराने करावे. त्याचबरोबर कल्पतरू सेंद्रिय खत एकरी ५० ते १०० किलो प्रत्येक कापणी झाल्यावर द्यावे.

वरीलप्रमाणे पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी दरवर्षी वापरले असता झाडाच्या जातीनुसर ४ - ५ वर्षापर्यंत आयुष्य वाढून उत्तम प्रतिच्या पानांचे उत्पादन वाढण्यास मदत होते.

* पाणी व्यवस्थापन : पिकाला योग्य प्रमाणात सिंचन दिल्यास उत्पादनात वाढ होते. म्हणूनच ऋुतुमानानुसार पिकाला पाणी द्यावे. हिवाळ्यात १० दिवसाच्या अंतराने व उन्हाळ्यात प्रत्येक आठवड्यात एकदा पाणी देणे आवश्यक आहे. पाणी देण्याकरिता ड्रीप किंवा स्प्रिंकलर पद्धतीची वापर केल्यास चांगला परिणाम होतो. पिकाला जास्त प्रमाणत पाणी दिल्यास जमिनीवर पाणी साठून राहण्याची शक्यता असते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती पिकाला हानिकारक असते. तसेच पाणथळ जमिनीत मुळांची वाढ योग्य प्रकारे होत नाही. म्हणूनच पाणी देताना योग्य तेवढेच पाणी देवून जास्तीचे पाणी निघून जाईल याची काळजी घ्यावी.

* आंतरमशागत : पिकाच्या योग्य वाढीकरिता शेत तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता पाणी दिल्यानंतर खुरप्याच्या साहाय्याने वेळोवळी तणे उपटून काढावीत. तसेच अधून मधून डवरणीच्या २ ते ३ पाळया द्याव्यात. यामुळे तणांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होऊन जमीन भुसभुशीत राहण्यास देखील मदत होते. तसेच जमिनीतील हवा खेळती राहून पिक वाढीस पोषक वातावरण मिळते.

पीक घ्यायचे म्हटल्यावर त्यावर किड व रोग आलीच. त्याच्यावर नियंत्रण मिळवणे आलेच. परंतु स्टिविया ही एक अशी वनस्पती आहे ज्यावर कुठल्याही प्रकारच्या किडी व रोग दिसून येत नाही. त्यामुळे त्यावर येणाऱ्या खर्चाचा बचत होते. कधी कधी पानांवर डाग पडल्याचे दिसून येते. हे डाग बोरॉनच्या कमरतेमुळे दिसून येतात. याकरिता ६% बोरॅक्सची फवारणी करावी. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या वरीलप्रमाणे नियमित फवारण्यांनी शक्यतो ही समस्या उद्भवत नाही. एखादे वेळी किडीचा पादुर्भाव आढळून आल्यावर कडूनिंबाच्या तेलामध्ये पाणी मिसळून त्याची फवारणी पिकावर करावी.

* काढणी : स्टिवियाच्या झाडाला फुले देखील येतात. पण उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय म्हणजे या झाडाची पाने होय. म्हणूनच फुलांची तोडणी का करावी ह्या एका महत्त्वाच्या विषयावर बोलणे आवश्यक आहे. स्टिवियाच्या पानांमध्ये 'स्टिवियोसाइड' व 'ग्लायकोसाईड' हा मुख्य घटक असल्याने पानांची संख्या वाढणे आवश्यक असते. म्हणूनच याकरिता पीक फुलधारणा या अवस्थेत येण्याआधीच छाटणी करत राहावी. फुलधारणा झाल्यास पानांमधील स्टिवियोसाइडची मात्रा ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.

शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिकाची काढणी रोपाची लागवड केल्यानंतर साधरणपणे ४ महिन्यानंतर पीक पहिल्या कंपनीस तयार होते. यावेळी पिकाची उंची ही साधारणपणे ४० ते ५० सेमी एवढी असते. त्यानंतरच्या कापण्या ९० - ९० दैवाच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे संपूर्ण वर्षभरात या पिकाची ३ ते ४ वेळी कापणी केली जाते. तीन वर्षापर्यंत पानांमध्ये स्टिवियोसाइडचे प्रमाण भरपूर असते. म्हणूनच जातीनुसार ३ ते ५ वर्षापर्यंत पानांची कंपनी करून किंवा पाने तोडून काढणी करावी. त्यानंतर मात्र पानांची तोडणी न करता संपूर्ण पीक जमिनीपासून ६ ते ७ से. मी. वर कापून टाकवे.

* प्रक्रिया : कापणी केलेल्या पिकाच्या फांद्यावरील पाने काढून सुर्यप्रकाशात किंवा ड्रायरमध्ये वाळवावीत. ज्या ठिकाणी पाने वाळवली जातात त्या ठिकाणी हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. पाने वाळवताना ढगाळ वातावरण नसावे. स्वच्छ सुर्यप्रकाशात १२ तास पाने वाळवातीत. पाने वाळवताना ती अधून मधून आलट पालट करावी. पाने व्यवस्थित न वाळविल्यास ती काळी पडून त्यावर बुरशीची लागण होण्याची शक्यता असते. वाळलेली पाने काचेच्या जरामध्ये किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवावीत. साठवण करताना ते डबे थंड ठिकाणी ठेवण्याची काळजी घ्यावी.

लागवड झाली व आता काढणी सुद्धा झाली. पण आता डोळ्यासमोर प्रश्न आला असेल तो म्हणजे यापासून मिळणारे उत्पादन व उत्पादनाला मिळणारा बाजारभाव. पिकाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन तसेच लागवडीकरीता चांगल्या जातीचा वापर केल्यास एक एकर क्षेत्रापासून ३ ते ४ वेळा करण्यात येणाऱ्या कापणीमध्ये एका वर्षात २५०० ते २७०० किलो ग्रॅम वाळलेली पाने एवढे उत्पादन मिळते.

आंतराष्ट्रीय बाजारपेठेत स्टिवियाच्या पानांना जवळपास १०० ते २०० रु. प्रति किलोग्रॅम भाव आहे. परंतु आपण जरी १०० रु. प्रती किलोग्रॅम भाव गृहित धरला तरी एक एकर क्षेत्रापासून जवळपास २,५०,००० ते २,७०,००० रु. उत्पादन पहिल्या वर्षात भेटू शकते. त्यानंतरच्या पुढील वर्षात उत्पादनामध्ये वाढ होते. वाळलेली पाने हवाबंद प्लॅस्टिक डब्यामध्ये पॅक करून १ किलो ग्रॅमची पाकिटे साधारणपणे २५० रु. ते ३०० रु. दराने घरोघरी विकली जातात.

एकंदरीत वरील सर्व मुद्दे लक्षात घेता आता स्टिव्हिया म्हणजे काय व त्याबाबतच्या येणाऱ्या प्राथमिक शंका नक्कीच आता सुटल्या असतीलच. थोडक्यात पण महत्त्वाचे सांगायचे म्हणजे स्टिवियाच्या लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यानंतर पिकाची कापणी सुरू होते. वर्षभरात ३ ते ४ वेळा कापण्या होऊन वाळविलेल्या पानांचे एकरी उत्पादन २५०० ते २७०० इतके मिळते. त्यामुळे २,५०,००० ते २,७०,००० इतके वार्षिक उत्पन्न मिळते.

शेवटी सांगायचा सारांश हा की सध्या संपुर्ण जगात मधुमेहाने आपले थैमान घातले असून जागतिक दृष्ट्या भारतात मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या भरपूर आहे आणि भविष्यात ही संख्या वाढण्याचा फार मोठा धोका आहे. मधुमेह हा आपल्या देशातील आरोग्यावर तसेच अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा एक भयंकर आजार असेल यात शंकाच नाही. तरुणांमध्ये वाढत चाललेले याचे प्रमाणसुद्धा विचार करायला लावणारे आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा आता मधुमेहाचा एका प्रकार आढळून आला आहे.

जातीक आरोग्य संघटनेनुसार (WHO) १९८० मध्ये मधुमेही व्यक्तीची संख्या ही १०८ मिलियन एवढी असून २०१४ सालात ही संख्या ४२२ मिलियन एवढी वाढली आहे. मधुमेह होण्याची अनेक करणे आहेत, परंतु त्यातील एक कारण म्हणजे उसापासून तयार केलेल्या साखरेचे सेवन हे देखील असू शकते. मधुमेह हा कधीच संपूर्ण बरा न होणारा असा एक आजार आहे. परंतु आहार विहार आणि औषधे व्यवस्थित पाळली तर मधुमेह हा नक्कीच आपल्या नियंत्रणात ठेवता येतो. शिवाय मधुमेहाचे गंभीर परिणामही टाळता येतात. म्हणूनच आपला आहार हा उत्तम असणे गरजेचे आहे. आहारात सामाविष्ट असणाऱ्या उसापासून तयार केलेल्या साखरेला उत्तम असा पर्याय आता निसर्गानेच आपल्याला उपलध करून दिला आहे. तो म्हणजेच 'स्टिविया' अशा या स्टिवियाला अर्थातच भविष्यात मोठी मागणी निर्माण होऊन मोठी बाजारपेठ देखील असणारच याबद्दल तिळमात्रही शंका नाही. असा प्रकारे भरघोस उत्पादन देणाऱ्या व आरोग्याला अत्यंत अशा स्टिवियाची लागवड सुरू करण्यास हरकत नाही.