दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे, शेती व जनावरांच्या चारा - पाण्याचे नियोजन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


२०१२ मधील पाऊसपाण्याची अवस्था १९७२ च्या दुष्काळापेक्षा अधिक गंभीर व बिकट अशी निर्माण झाली. खरीप पुर्ण वाया गेला, रब्बीचे नियोजन कोलमडले. ज्वारीत दाणे भरले नाही.बाटुक म्हणावे तर अर्ध्यातच करपल्याने जनावरांना पुरेसा चारा नाही.बऱ्याच ठिकाणी जनावरांना चाऱ्याचा वाणवा आहे, ती तहनलेलीची आहेत आणि गेल्या २ - ३ महिन्यापासून शेतकर्‍यांच्या हाताला काम नाही. अशी अभूतपुर्व गंभीर अवस्था आज मराठवाडा व काही अंशी उत्तर महराष्ट्रात प्रकर्षाने जाणवत आहे. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील पाणीसाठा हा ४८% तर मराठवाड्यातील पाणीसाठा १७ % आहे असे सांगितले जाते. आजच गावात प्यायला पाणी नाही. शाळेत जाणारी मुले अभ्यास आणि त्यांचे बालपणामध्ये खेळण्या - बागडण्याऐवजी त्यांना कुटुंबासाठी रोज मैलो - मैल चालून शाळेतून आल्यानंतर ८ - १० खेपा पाणी आणण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे आणि अशा रितीने खेडोपाडी स्त्रिया आणि पुरूष यांचे कामाचे लाखो तास वाया जाऊन नैराश्याच्या गर्तेत लोटले जात आहे. अजून तर थंडी आणि जानेवारीच महिना आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर तापमान वाढल्यावर पाण्याचा दुष्काळा भीषण जाणवणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सहा महिन्याचा काळ कसा काढायचा ? हा जनतेसमोर गंभीर प्रश्न आहे.

लोकांची भावना अशी आहे की, माणसांची पाण्याची गरज भागेल, परंतु जनावरांची गरज भागवायची म्हणजे हे मोठे महासंकट त्यांच्यासमोर कोसळले आहे. हातांना काम नसल्यामुळे शेतकर्‍यांकडे शेती असून ती नापीक असल्याने अनान्न दशा झाली आहे. पाण्याअभावी फळबागांचे सरपण झाले आहे. जनावरांना चार उपलब्ध नाही. मराठवाड्यामध्ये आणि त्यामध्ये विशेषकरून जालना आणि औरंगबादमध्ये पाण्याची टंचाई तीव्र आहे. तेथे अद्यापही जनावरांसाठी छावण्या नाहीत. त्यामुळे तेथे चांगली जनावरे आणि गावाकडील पशुधन यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. चांगली जनावरे कुंकू लावून सोडून दिली आहेत. अशा अवस्थेमध्ये सरकारला दुष्काळी भागामध्ये जनतेसाठी आणि जनावरांना वाचविण्यासाठी पिण्याचे पाणी कसे पोहोचावावे ही एक जटील समस्या आहे. तातडीचा आणि आणीबाणीचा उपाय म्हणून काही भागतील धरणातून पाणी सोडून माणसे आणि जनावरांची गरज भागविण्यापुरते १ महिना पुरेल एवढे पाणी सोडले आहे. त्यातही ज्याभागातून पाणी सोडण्यात आले त्यांच्या भागातील धरणातही त्यांना काटोकाट पुरेल किंबहुना कमीच पडेल असा जेमतेम साठा आहे. म्हणजे 'काही जात्यात तर काही सुपात" अशी अवस्था जनतेची झाली आहे. जेमतेम १ महिना म्हणजे फेब्रुवारीपर्यंत किंवा महाशिवरात्रीपर्यंतची वेळ भागविता येईल पण जसे ऊन वाढेल तसे मार्च, एप्रिल, मे, जून हे चार महिने पाण्यासाठी म्हणून भीषण संकट उभे करेल. पिण्याच्या पाण्याची व्यावास्था सरकार यावेळेपुरते रेल्वेच्या मालगाडीतून पाण्याची वाहतूक करण्याची नियोजन करत आहे. हे आणिबाणीचा उपाय म्हणून टिक आहे. परंतु हे कायमस्वरूपी व्यवहार्य नव्हे.

दुष्काळी भागामध्ये सरकारने शेतसारा माफ करणे, शाळेतील मुलांची फी माफ करणे तसेच दुध व कामाच्या जनावरांसाठी एका जनावराला ६० रू. व लहान जनावरांना ३० रू. अशी चार्‍यासाठी रोजची रक्कम असे निर्धारीत केले आहे. परंतु ही मदत अजूनही गावोगावो पोहोचली नाही असे जनतेचे म्हणणे आहे.

तेव्हा अशा अभूतपूर्व परिस्थितीवर कायम स्वरूपी उपाय शोधण्याची नितांत गरज आहे. त्यामध्ये पहिले म्हणजे गावागावात अस्तित्वात असणारे तळे आणि तलाव सध्या पुर्ण आटलेले असल्याने त्यातील गाळ व माती ही उपसून शेतकऱ्यांना फुकट देण्यात यावी. म्हणजे तलावाची रुंदी, खोली, लांबी वाढून पावसाच्या पाण्याचा साठोपा वाढेल व हे पाणी जनावरांना माणसांना पुरेल असे राज्यातील अनेक ठिकाणी केलेल्या प्रयोगातून दिसून येते. सुरेश खानापूरकरांचा शिरपूर पेटर्न' देशभर राबवावा.

दुसरे म्हणजे उताराच्या आडव्या बाजूने पाणी साठविण्यासाठी कोल्हापूर टाईप बंधारे सिमेंटने पक्क्या स्वरूपात टप्प्या - टप्प्याने बांधणे व त्याचा वापर शेती व पिण्याच्या पाण्यासाठी करणे. यापेक्षा सोपा उपाय म्हणजे सिमेंटच्या रिकाम्य पिशव्यात नदीतील वाळू, दगडगोटे भरून असे बंधारे आतापासून केले म्हणजे ग्रामीण भागातील जनतेच्या हाताला काम मिळेल व येणाऱ्या पैशातून त्यांची रोजीरोटी मार्गी लागेल आणि पावसाळ्यामध्ये २०१३ च्या मान्सून पावसात जे पाणी पडेल ते कालमान व साठवणशक्तीच्या अंदाजानुसार एकूण पावसाचा अंदाज घेऊन हे पाणी ग्रामीण भागात आठमाही किंवा दुसोत्याच्या पिकांना (जसे जवस, गहू, ज्वारी, हरभरा अशा पिकांना ) वापरून एक ते दोन पाण्याच्या पाळ्यावर अशा पिकाचे उत्पादन घेता येईल, तसेच जनावरांसाठी कमी (१ ते २ संरक्षीत) पाण्यावरील चारापिके घेता येतील. ज्या ठिकाणी दोन्ही बाजूने डोंगर आहे तेथे उताराच्या बाजूला ते आडवून तेथे साठलेले पाणी परिसरातील लोकवस्तीला उन्हाळी भाजीपाला व छोट्या काळाच्या फळभाज्यांना उदा.काकडी, कलिंगड, डांगर टोमॅटो अशा पिकांना वापरता येईल. एकदा ही व्यवस्था कायम स्वरूपी व सुरळीत अंमलात आली म्हणजे बहुवर्षीय पिकांसाठी वापरता येईल. कमी पाणी असतान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत व हार्मोनी जैविक बुरशीनाशकाचा वापर हमखास करावा. म्हणजे दुष्काळात एका पाण्यावर द्राक्ष (संदर्भ - आधुनिक द्राक्ष लागवड पुस्तक पान नं. ३२) किंवा नुसत्या आंबवणी - चिंबवणीवर कांदा (संदर्भ - कृषी विज्ञान, जानेवारी २००५, पान नं. ८), नुसत्या पावसाच्या पाण्यावर कोथिंबीर आली (संदर्भ - याच अंकातील पान नं. १७) किंवा तत्सम पिके प्रगतीशिल शेतकऱ्यांनी आणली तशी तुमचीही येतील आणि अशा मुलाखती व यशोगाथा कृषी विज्ञानमधून अथवा चॅनलवर येऊन त्या साऱ्या देशातील शेतकरी व तंत्रज्ञांना प्रेरणा देतील.

ज्याठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे तेथे गवारगम व शेवगा ही पिके घेऊन तेथे उत्पन्नाचा श्रोत निर्माण होऊ शकतो. पाण्याचा वापर आणि उपयुक्तात याचे योग्य नियोजन होण्यासाठी सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढवावे. म्हणजे जमिनीतील पाण्याची धारणाशक्ती (W. H. C.) वाढेल ज्याठिकाणी पालापाचोळा आहे त्याचा वापर अच्छादन म्हणून केला तर पाणी पिकांना पुरेल व तणांचा त्रास होणार नाही. ज्या ठिकाणी सेंद्रिय खते नाहीत त्याठिकाणी ४० ते ६० दिवसात तयार होणारी धैंच्या, ताग, चवळी, मूग अशी हिरवळीची खत - पिके घेऊन ही पिके हिरवी असतान कापून नंगारटीखाली गाडली असता ती कुजून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि पर्यायाने सेंद्रिय अन्नधान्य उत्पादन वाढेल व माणसांचे आरोग्यदेखील सुधारेल. वरील दोन्ही पर्याय नसल्यास गांडुळखत , कंपोस्टखत व कल्पतरू सेंद्रिय खताचा माफक वापर करावा.

उपलब्ध पाण्याची बचत कशी होईल ?

गावाकडे जर कोणी पाहुणे आले तर त्यांना प्रथम प्यायला पाणी देण्याची प्रथा आहे. तेव्हाव त्यांना ग्लासभर पाणी प्यायला दिले जाते. ते त्यांना जास्त होते. त्यामुळे उरलेले पाणी ओतून दिले जाते. प्रत्येकवेळी ते पाणी फेकणे व ग्लास धुणे यामध्ये माणसी एक ग्लास पाणी वाया जाते. हे वाया जाणारे पाणी परवडणारे नाही.

दुसरे म्हणजे शहरामध्ये हात धुताना साधारण प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीकडून साधारण अर्धा ते एक लिटर पाणी वाया जाते. असे दिवस्तून ३ ते ४ वेळा हात धुतला असता ३ ते ४ लिटर पाणी माणसी वाया जाते. तेव्हा हात धुताना पाणी हे मगमध्ये घ्यावे, म्हणजे पाण्याची बचत होते. एरवी बेसीनवर मोकळा नळ चालू ठेवून हात धुतला जातो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. तेव्हा वरील पद्धतीने राज्यातील व देशातील कोट्यावधी लिटर पाणी हे रोजचे वाचेल .

ग्रामीण भागात दुष्काळी भागामध्ये पाणी टंचाईमुळे २ ते ३ दिवसांनी आंधोळ करतात. तेव्हा आंघोळ खाटेवर करून ते पाणी सांडपाणी किंवा कपडे धुण्यासाठी म्हणून वापरले जाऊ शकते. म्हणजे तेच पाणी २ ते ३ वेळा वापरले जाऊ शकते. या सांडपाण्यावर आळूचे पीक चांगले येते .

कमी पाण्यावरील उन्हाळी पिकांचे नियोजन

उन्हाळी पिकांमध्ये मेथी व कोथिंबीर या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या पालेभाज्या ३ ते ४ पाण्यावर येऊ शकतात. तसेच ४५ ते ६० दिवसांत येणारे वैशाखी मूग हे डाळवर्गीय पीक येऊ शकते. मूगडाळ, मोड आलेले मूग हे अधिक प्रथिनेयुक्त, पचायला हलके व आरोग्यवर्धक आहे. तर अशा पिकांची निवड करावी. उन्हाळी व्यापारी पीक म्हणून गवारगमची लागवड करावी. हे पीक राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते व ते परदेशात निर्यात होते. अलिकडे हे पीक विदर्भ, खान्देश भागात बऱ्यापैकी बाळसे धरू लागले आहे. जेथे ठिबकचा वापर करणे शक्य आहे तेथे ठिबक करावे. परंतु हल्ली रिकाम्या बिसलरी पाण्याच्या बाटल्या मिळतात. त्यात पाणी भरून तळाला सुईने जर बारीक होल पडले तर त्या पाण्यावर फळभाजी पिके जास्त काळ तग धरू शकतात. त्यामुळे पाण्याची मोठी बचत होते.

कायम स्वरूपी उपाय करण्यामध्ये जमिनीतील पाणी वाढविण्यासाठी जागोजागचे खडक फोडून तलावाकाठी किंवा उताराच्या वाजूला तळे सदृष्य परिस्थिती निर्माण करावी. म्हणजे पावसाचे पाणी अडून जमिनीत मुरेल व विहीरींची पाण्याची पातळी वाढेल. हा कार्यक्रम उन्हाळ्यात साधारण ३ - ४ वर्ष टप्प्याटप्प्याने राबवावा. म्हणजे दुष्काळ कायमचा हटून बारमाही पाण्याचा व शेतीची प्रश्न सुटून 'आदर्श गाव' झाले, म्हणजे 'आदर्श भारत' निर्माण होईल.