अवकाश शास्त्रातील महान तारा निखळला !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


डॉ. वसंतराव गोवारीकरांचे महानिर्वाण झाल्याचे शुक्रवारी २ जानेवारी २०१५ ला टी.व्ही. चॅनलवर समजले व काळजात धस्स झाले. माणसासाठी विज्ञान पेरणाऱ्या व वेचणाऱ्या थोर शास्त्रज्ञास आपण मुकलो याचा धक्का बसला. भारताच्या वैज्ञानिक इतिहासाची नोंद घेताना समाज त्यांची नोंद घेईलच व वैज्ञानिकांचे पुस्तक लिहिताना त्यांच्या नावाने एक चाप्टर सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल.

डॉ. वसंतराव गोवारीकर यांचा आणी माझा संबंध बराच जुना आणि जवळून आला. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांना समजले की, वसंतराव गोवारीकर हे मोठे शास्त्रज्ञ व ते परदेशात आहेत. तेव्हा त्यांना पंतप्रधानांनी दिलेला कॉल व आपले योगदान देशासाठी उपयोगी यावे या महान विचारांनी डॉ. गोवारीकर भारतात आले व पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार झाले. ही घटना ज्यावेगाने घडली त्याच वेगाने ही शास्त्रीय बातमी साऱ्या जगात पसरली. त्यावरून त्यांचे देशासाठी योगदान किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. त्यांच्या विषयी बरेच वाचण्यात आले आणि ते कामानिमित्त दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर त्यांच्या बहिणीकडे येत असत.

त्यांचा मुळात भारतीय जनतेसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा या तळमळीने ते सुरूवातीपासून झटत असत. याच समान घाग्यामुळे त्यांचे आणि माझे विचार जुळले. त्याअगोदर नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात मी धुळ्याला प्राध्यापक असताना सप्टेंबर १९८१ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेत (IARI) मला आमंत्रित करण्यात आले होते. तेथे देशाची सर्व कृषी विद्यापिठे व कृषी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ व प्राध्यापक यांच्यासाठी सेंद्रिय शेतीवर परिसंवादात मला तेथे सेंद्रिय शेतीवर माझ्या कार्याबद्दल बोलण्याची संधी मिळाली व ते माझे लेक्चर एवढे प्रभावी झाले की, देशभरातील शास्त्रज्ञ व प्राध्यापकांना लेक्चर देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने मि दिलेल्या लेक्चरवर काव्य लिहिले ते डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी मार्गदर्शिकेत पान नं. २०५ वर दिले आहे व तेथून मला प्रेरणा मिळाली की आपण आपल्या ज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतावर करावा. म्हणजे आपल्या ज्ञानाचे चीज होईल आणि त्यानंतर मी माझ्या नोकरीचा राजीनामा ६ एप्रिल १९८२ रोजी दिला. या एकाच समविचाराच्या धाग्याने माझे व गोवारीकरांचे विचार जुळले. ते दिल्लीमध्ये फार व्यस्त असत. ते स्फटिकासारखे स्वच्छ, मोत्यासारखे निर्मळ, पोलादासारखे मजबूत, मधासारखे गोड प्रसंगी वज्रासारखे कठीण पण अंत:करणाने मेणासारखे मऊ होते. ते शांत, कुशाग्र बुद्धीचे, दुसऱ्याचे ऐकून घेणारे, कुठल्याही गोष्टीवर सर्वांगाने विचार करून निर्णय घेणारे होते. समोर आलेल्या प्रत्येक तरुणास आधार देवून प्रेरणा देण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. असेच डॉ. वसंतराव दिल्लीवरून एकदा पुण्यात आले होते तेव्हा मी त्यांच्या बहिणीकडे ते घरी केव्हा येणार याची चौकशी केली. तेव्हा ते येतीलच असे त्यांनी सांगितले व तुम्ही येणार हेही मी त्यांना सांगितले असे त्या म्हणाल्या. त्यांनतर त्यांच्या बहिणीकडे भोसले नगर येथे पोहोचलो. तेव्हा मी देशातील शेतकऱ्यांसाठी मी शोध लावलेल्या तंत्रज्ञानाचे निरूपण, पेरणी कशी करतो आहे या विषयी त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांना रिझल्ट दाखविले. त्यावेळी त्यांनी मला चांगल्यापैकी आधार दिला. सुचना केल्या व हे काम फार चांगले आहे असे सांगितले. त्यामुळे आपली दिशा बरोबर आहे याची मला खात्री झाली. त्यांच्याकडून मला होकारार्थी प्रेरणा मिळाली. ते अतिशय मृदू स्वभावाचे होते. बुद्धीमत्ता अफाट होती. ते सतत कार्यमग्न असत. परिस्थितीवर ते लिलया मात करून यश संपादन करीत असत.

या शास्त्रज्ञाचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे पुर्ण नाव वसंतराव रणछोडदास गोवारीकर. त्यांचे शिक्षण कोल्हापूरात झाले. येथील हरिहर विद्यालय, सिटी हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. तर राजाराम कॉलेजमध्ये बी.एस्सी. केली. पुणे विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी.ची पदवी मिळविली.

गांधीजींनी एकदा आदर्श चरखा निर्माण करण्यासाठी लोकांकडून सुचना बोलावल्या होत्या. तेव्हा वसंतरावांनी भरीव अशी सुचना करून वसंतरावांच्या वडीलांनी तो चरखा बनविला. महात्मा गांधीजींचे जे सचिव होते ते महादेवभाई देसाई यांनी वसंतरावांच्या कल्पकतेबद्दल कौतुकाचे पत्र धाडले. वयाच्या १२ - १३ व्या वर्षी भारतात मोटार बनवाव्यात असे त्यांच्या मनात आले म्हणून त्यांनी अमेरिकेत हेन्री फोर्ड यांनाच पत्र पाठविले. त्यांनीही गोवारीकरांचे कौतुक करून सकारात्मक उत्तर दिले. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरला कागलजवळ नोकरी केली. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी व पुणे येथे नोकरी केल्यावर लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेले. तेथे रासायनिक अभियांत्रिक यामध्ये प्राध्यापक फिट्झ गार्नर यांच्या मार्गदर्शनाखाली पिएच.डी. ही पदवी प्राप्त केली. पिएच.डी. म्हटले की, या पदवीसाठी सर्वसाधारण ५ वर्षाचा कालावधी लागतो. परंतु त्यांनी हे काम २ वर्षात पुर्ण केल. ब्रिटनमध्ये अणुशक्ती आयोगाच्या हाताखाली वरिष्ठ शास्रज्ञ म्हणून काम केले व नंतर अमेरिकेत संशोधन केले. अमेरिकेत असताना स्पेस रिसर्च प्रणेते व अणुशक्ती आयोगाचे डॉ. विक्रम साराभाई यांची भेट झाली व भारतात परतण्याच्या त्यांच्या इच्छेला योग्य दिशा मिळाली. नंतर ते विक्रम साराभाईच्या सुचनेनुसार इस्रो येथे रुजू झाले. भारताचे जे पहिले रॉकेट २१ फेब्रुवारी १९६९ रोजी यशस्वीपणे अवकाशात पोहचले त्याचे जनक डॉ. वसंतराव गोवारीकर होते. कारण त्यासाठी लागणारे घन इंधन त्यांनी तयार केलेले होते. यावेळेस डॉ. अब्दुल कलाम यांचे सहकार्यदेखील त्यांना लाभले. नंतर १९८३ मध्ये एस.एल.व्ही.-३ उपग्रह अवकाशात सोडला तो यशस्वीपणे कार्यरत झाला. त्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी गोवारीकरांना शुभेच्छा दिल्या व ही कार्यपद्धती बघून त्यांनी पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून गोवारीकरांची नेमणूक केली.

त्याकाळी हवामानाचे अंदाज हे ढोबळ स्वरूपाचे असल्याने ते अचूक येत नसत. अवकाळी पाऊस, गारपीट व त्याचा पीक, जमिनीवर होणारा दुष्परिणाम यामुळे शेतकऱ्यांना व विविध शास्त्रज्ञांना काम करताना अडचणी येत असत. कीड - रोग याचे नियंत्रण करण्यास संभाव्य दिशा मिळत नसे. तेव्हा त्यांनी विविध देशांतील हवामान अंदाजाकरिता त्या - त्या देशातील शास्त्रज्ञांना हवामानाच्या विविध परिमाणांचा केलेल्या वापरांचा अभ्यास करून त्याचा भारतीय हवामानाशी तुलनात्मक अभ्यास करून भारतातील हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांशी चर्चा करून देशातील राज्यवार सरासरी पाऊस व त्याचा मान्सूनचा काल, पावसाची पडण्याची क्षमता व त्याचा शेतीसाठी होणारा, उपयोग, पिकांचे कीड व रोंगाकरिता करावयाचे प्रतिबंधात्मक व परिणामकारक उपाय याचे जे आराखडे अंदाज बांधले ते शेतीशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, विकास अधिकारी यांचेबरोबर चर्चा करून विविध हवामानाचे मापदंडाची सांगड घालून अंदाज यांना फार उपयुक्त ठरत असत. त्यांच्या हवामानातले प्रारूप (Model) 'डॉ. गोवारीकर मॉडेल' म्हणून प्रसिद्ध झाले. त्यामुळे हा अवकाश शास्त्रज्ञ जनतेचा बहुउपयोगी 'हवामान शास्त्रज्ञ' म्हणूनही प्रसिद्ध झाला व देशभर त्याला मान्यता प्राप्त झाली. त्यानंतर मग ग्लोबल वार्मिंगची सुरुवात झाली. त्यात झपाट्याने फेरबदल होत गेले. १९८८ सालापासून २००० सालापर्यंत जे प्रारूप निर्माण केले होते त्यात ६ घटकांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांचे मॉडेल हे देशभर फार प्रभावी व उपयुक्त ठरले. ते १९८६ साली विज्ञान खात्याचे सचिव झाले. हे होण्यामध्ये त्यांचा हेतू सर्वांसाठी विज्ञान, आमआदमीसाठी विज्ञान, गरीबांसाठी विज्ञान हाच होता. हे आम्ही जेव्हा - जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा - तेव्हा त्यांच्या विचारातून जाणवत होते. उद्योजक जर बनायचे असेल तर त्याला नुसतीच इच्छाशक्ती असून चालत नाही. तर त्याबरोबर अपार कष्ट व तंत्रज्ञानाची जोड मिळाली पाहिजे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी देशपातळीवर राज्यवार शास्त्रज्ञांच्या बैठका घेतल्या. परदेशात असलेले एन.आर.आय. यांना आपल्या देशात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. देशामध्ये १९९४ ते २००० या दरम्यान विज्ञान संशोधनाचे सरकारी धोरण व त्याचा समाजासाठी करावयाचा वापर हा या ६ वर्षात झपाट्याने झाला. त्याकाळात उद्योगधंद्याचा प्रसार झपाट्याने वाढला. या काळातच डॉ. वसंतराव गोवारीकर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. मराठी विज्ञान परिषद ही नामवंत विज्ञान परिषद म्हणून गाजली आहे. आशिया खंडातील भारत आणि चीनसारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या प्रगतीबद्दलचे त्यांचे अंदाज अचूक ठरले. एवढ्या महान शास्त्रज्ञास पुणे विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून नेमण्यात आले. त्यांनी विद्यापीठामध्ये नुसते शिक्षण देणे परिक्षा घेणे एवढेच कार्य न राहता भरीव समाजोपयोगी शिक्षणाला चालना दिली. त्यांनी नवीन - नवीन प्रकल्प राबविले. प्राध्यापकांनी सामन्यांच्या गरजांसाठी संशोधन करावे असा आग्रह धरला. त्यांना काही वेळेला विरोधकांशी सामना करावा लागला. त्यांचा अनुभव, देशपरदेशातील काम व अवकाश शास्त्रात त्यांनी मिळविलेले उत्तुंग यश यामुळे त्यांची शास्त्रीय बैठकीवर प्रचंड मांड होती. त्यामुळे ते विरोधाला आणि लोकशाहीतील चुकीच्या दिशेने जाणारी नौका, खोटे तेच खरे याला छेद देवून सत्याची ते कास धरून लढणारे खरे 'सत्यमेव जयते' असे थोर शास्त्रज्ञ व महामानव होते.

त्यांच्या या दृढ, स्पष्ट, सखोल ज्ञानामुळे मंगळावरील मोहीम जी अनेक प्रगत देशांना झुलवित राहिली ती भारतासारख्या महाकाय देशाने पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करून दाखविली याचे सर्व श्रेय हे डॉ. गोवारीकरांना जाते. त्यांचे कार्य अवकाशापर्यंत असले तरी ते सर्वसामन्यांसाठी कायम जमिनीवरच राहिले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ते कधीही पुरस्कारांच्या मागे न धावता आपले संशोधन यातच मग्न राहत असत. त्यांना खरे तर भारतरत्नच मिळायला हवे होते. गोवारीकर व डॉ. स्वामीनाथन यांच्या संयुक्त समितीला देशासाठी लोकसंख्या व अन्नधान्य उत्पादन यासाठी धोरणात्मक विचार ठरविण्यासाठी इंदिरा गांधीनी सांगितले होते. तेव्हा त्यांनी 'पॉलिसी नोट' इतकी स्पष्ट व सुबक तयार केली कि त्याची राजकीय नेते व शास्त्रज्ञ यांच्यात वाहवा झाली.

अशा या थोर शास्त्रज्ञाच्या कार्याची आठवण व त्यांनी दिलेल्या विचारांची देशातील शास्त्रज्ञ व नेत्यांनी स्वच्छ रितीने कुठलेही राजकारण न करता किंवा विरोधासाठी विरोध न करता सर्वांनी एकजुटीने अवलंब केला तर 'अच्छे दिन' या देशाला व जगाला कृतीत लवकर येतील. हे निर्विवाद. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या नावाने भारत सरकारने त्यांचे पोस्टाचे ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयाचे तिकीट व त्यांच्या स्मरणार्थ नाणे काढणे उचित ठरेल. त्यांना ' भारतरत्न' देवून त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केल्यासारखे होईल व त्यांच्या कार्याला न्याय देवून तो खऱ्या शास्त्रज्ञाचा मार्गप्रदीप सन्मान ठरेल. यापुढे जगात कुठल्याही शास्त्रज्ञाने एखादा नवीन तारा अथवा ग्रह अवकाशात शोधून काढला तर डॉ. गोवारीकरांच्या सन्मानार्थ त्याला 'डॉ. गोवारीकर स्टारग्रह' असे नामकरण अधिकृत रित्या केल्यास त्यांचा हा जागतिक सन्मान केल्यासारखे होऊन त्यांच्या अवकाश क्षेत्रातील कार्याची दखल घेतल्यासारखे होईल. भारतीय नोबेल पारितोषिक विजेते सर चंद्रशेखर व्यंकटेश रमण यांचे नावाने बेंगलोरला संशोधन संस्था आहे, त्या धर्तीवर भारतीय अणुऊर्जा आयोग (IAEC) तसेच इस्रो (ISRO), भारत जागतिक अणुशक्ती आयोग (Austria, Vienna), U. N.O. यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात पुढील मुलभूत संशोधनासाठी जागतिक दर्जाची गोवारीकरांच्या नावे संस्था (Post Doctorate) अवकाश शास्त्र संस्था काढून येथे सर्व जगातील चांगले तरुण जग कल्याणासाठी घडवावेत. म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळून समाधान लाभेल !