जल साक्षरता, जल बचाव, जल सुधार आणि नव जल निर्माण !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


आम्ही सर्व आखाती राष्ट्रांचा भाजी, फळे त्या राष्ट्रात भारतातून निर्यात करण्यासंदर्भात १५ दिवसांना अभ्यास दौरा १९९६ साली केला होता. नंतर लगेचच त्याचवर्षी इस्त्राईलचा तेथील शेती व पाणी व्यवस्थापन व कृषी प्रदर्शन संदर्भात अभ्यास दौरा केला होता. सुदैवाने अमेरिकाचा २ वेळा २००१ व २००४ मध्ये दौरा करता आला. प्रथमत: आखाती राष्ट्रातील दौऱ्यामध्ये ज्या कुवेत, बहारीन, मस्कत, शारजा, अबुधाबी, दुबई या राष्ट्रांच्या दौर्यात शेतीच्या दृष्टीने अभ्यास केला असता असे लक्षात आले की, या राष्ट्रांकडे खरोखरच निसर्ग कायमचा कोपलेला आहे. भारतात किंवा महाराष्ट्रात नुसतेच दुष्काळ - दुष्काळ म्हणून भुईघोपटण्यासारखे तेथील चित्र नाही.

आखाती राष्ट्रांतील लोक विदर्भाच्या उन्हाला 'महाबळेश्वर' म्हणतील अशी अवस्था आहे. तेथे माती म्हणाल तर गिरणीत ज्वारी. बाजरी, गहू देताना गिरणीवाल्याने निट दळले नाही म्हणून पिठाला रया येत नाही म्हणून भाकरी वळत नाही. म्हणजे 'नाचता येईना अंगण वाकडे, रांधता येईना ओली लाकडे' असे म्हणायला थोडाही वाव तेथे नाही. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा तेथील मातीला चिकटपणा (रया) नाही. तेथे पुर्ण वालुकामय प्रदेश व रणरणते ऊन आहे. त्यांचे नशीब जागेवर असेल त्यामुळे बोटीद्वारे दळण - वळण एवढाच त्यांना समुद्रकिनार्‍याचा आधार आहे आणि काही अंशी पाणी विकतचे प्यायला आहे. परंतु पेट्रोल आज तरी पाण्यासारखे असले तरी उद्याची अवस्था भारतातील दुष्काळी राज्यातील पाण्यासारखी खचितच होईल.

इस्त्राईल हे राष्ट्र केवळ ४ इंच पावसावर रणरणत्या उन्हात माती विना शेती करीत आहे. इस्त्राईलसारख्या राष्ट्रांमध्ये फक्त एकमेव जॉर्डन नदी आहे. तिचे पात्र आम्ही एसी बसमधून फुलावरून गेलो तेथे २० फुटाहूनही कमी आहे. अशा अवस्थेतही म्हणजे अत्यंत दुर्मिळ पाणी उपलब्ध अवस्थेत मोठ्या शिताफीने शेती करून तेथील माल जगभर निर्यात करतो. ही खर्‍या राष्ट्रप्रेमाची चुणुक नव्हे काय? म्हणजे हे राष्ट्र निवडुंगासारखे किंवा कुठल्याही प्रकारचा आधार नसताना वड, पिंपळ, औदुंबरासारखे बांधकामाच्या दगडाच्या खाचेत येऊन टवटवीत रहाते. म्हणजे या वृक्षापासून त्यांना प्रेरणा मिळाली असेल का ?

याउलट भारतासारख्या खंडप्राय देशात भरपूर सुर्यप्रकाश, उन्हाळा अधिक आणि पावसाळा व हिवाळा प्रमाणात आहे. भरपूर सुर्यप्रकाश ही साऱ्या जीवसृष्टीची धमनी आहे. म्हणजे भरपूर सुर्यप्रकाश हा देशाला वरदानच आहे. कारण नुसत्या जीवसृष्टीसाठी नव्हे तर पाऊस पडण्यासाठी देखील सुर्यप्रकाशाचीच गरज असते. भरपूर पर्जन्यमान, पर्जन्यमानाची कालानुसार विभागणी ही या देशाला देणगी आहे. त्यावरून असे लक्षात येते की, ह्या राष्ट्राची काळजी निसर्गाला जास्त आहे. म्हणून मागच्या वर्षी जरी दुष्काळ पडला किंवा मुद्दाम निर्माण केला असला तरी हवामान खात्याच्या विशिष्ट मानकानुसार यंदा देशामध्ये पर्जन्यमान हे विस्तृत होऊन महाराष्ट्रात अनुकूल आहे आणि हे सत्यातही उतरणार आहे. मग या देशात भरपूर टेकड्या, २ हजाराहून अधिक नद्या, एवढी वनसंपदा असूनही आपल्यावर ही वेळ का येते ? तेव्हा हे जर जलव्यस्थापनाचे अभियंते यांनी जर याचा विचार करून नुसते डोंगर जरी सांधले तर हे काम कमी खर्चात होऊन जलसाठा वाढणार आहे. धरणासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी ह्या ओरबडल्या जाणार नाहीत. ते शेतकरी जमिनी कसतील, ते विस्थापित होणार नाहीत. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढेल. त्यासाठी डोंगर उतारावर छोटे - छोटे बंधारे जर बांधले तर पडणारा पाऊस टप्या - टप्याने जमिनीत खोलवर मुरेल आणि मग कुठेतरी पाणी मुरते ? असे म्हणण्याची वेळ येणार नाही. या सध्या उपायांमुळे नद्या नाले, शेतातील विहीरी, कालवे यांना मुबलक पाणी उपलब्ध होईल.

हे घडविण्यासाठी प्रथम जसे पुस्तकी शिक्षणापेक्षा अडाणी लोकांसाठी 'प्रौढ शिक्षण' दिले जाते, तशी जलसाक्षरतेची जागरूकता गावोगावी निर्माण करण्यात यावी. म्हणजे पाणी विविध उपायांनी कसे अधिक निर्माण करता येईल हे पहावे. जसे रेन ट्री, वड, पिंपळ, औदुंबर अशा झाडांची लागवड, त्यांचे संगोपन केले गेले पाहिजे. म्हणजे आपोआप पर्जन्यमान वाढेल. त्याचप्रमाणे जमिनीची पाणी धारणशक्ती कशी वाढवायची याचे शास्त्रीय विवेचन सोप्या शब्दात करावे. त्यामुळे पहिले म्हणजे जमिनीतील पाणी साथ वाढेल, दुसरे म्हणजे जमिनीची सुपीकता वाढेल, तिसरे म्हणजे हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढेल हे मुद्दे जलसाक्षरतेमध्ये आले पाहिजेत.

जल साक्षरता, जल बचाव, जल सुदार आणि नव जल निर्माण अशा प्रकारचे शेतीविषयक आणि शेतीपुरक विषय हे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले जातील, त्याप्रमाणे पाण्याच्या संदर्भातील वरील विषय जल निर्माण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतील आणि तीच राज्याची व देशाची 'जलनिती' ठरेल आणि हे सहज शक्य आहे. कारण वर उल्लेख केलेली राष्ट्रे ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना केवळ निसर्गाने त्यांना तेलविहीरींची मुबलकता दिल्याने या एकमेव होकारार्थी मुद्द्याने तेलाच्या किंमतीमधील चढ - उतार करून सार्‍या जगावर हुकूमत गाजवत आहेत. ती राष्ट्रे सार्‍या जगाला वेठीस धरत आहेत. मग भारतात मुबलक प्रमाणात सुर्यप्रकाश, टेकड्या, नद्या, नाले, वनसंपदा निर्माण होऊ शकत असताना 'शेती निसर्गावर अवलंबून आहे' अशी सांत्वन करण्याची वेळ येणार नाही. कारण हे सत्य आहे आणि सत्य हे नेहमी कटू असते ते स्विकारावेच लागेल. म्हणजे पाण्याचा व समृद्धीचा मार्ग सुखकर होईल.