हळद म्हणजे - 'पी हळद की, हो गोरी (सुदृढ)' हे खरेच होय !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


हळदीचे पीक हे ज्या प्रकारे आल्याचे पीक मसाला पीक म्हणून माहीत आहे तसे मसाला पिकाबरोबर आयुर्वेद ऋषीमुनी व आयुर्वेदातील तज्ज्ञ, वैध हजारो वर्षापासून हळदीचा आयुर्वेदात प्रतिबंधक इलाज म्हणून वापर करत असत. तद्वतच भारतामध्ये हळदीचे उत्पादन हे हजारो वर्षापासून होत आलेले आहे. बहुदा अन्नातील हळदीचा वापर हा अलिकडच्या ५०० ते ६०० वर्षातील असावा, परंतु हळदीचा वापर हा आयुर्वेदात हजारो वर्षापासूनचा असावा. नंतर इ.स. नंतर भारतातील अनेक राज्यात आजीबाईच्या बटव्यात घरगुती उपचारातील हळदीचा वापर सर्रास सुरू झाला. आशिया खंडातील राष्ट्र हळदीचा वापर आहारात जवळ - जवळ रोज करीत आहेत. आशिया खंडातील व आखाती राष्ट्रात हळदीच्या स्वयंपाकातील व आयुर्वेदातील वापराने इतर राष्ट्रांतील अनेक होणाऱ्या आजारांपेक्षा आशिया खंडात हळदीचा वापर प्रतिबंधात्मक होतोय असे जाणवते. अलिकडच्या काळात पाश्चात्य राष्ट्रांत हळदीत अल्कलाईड (Alklied) कुरकुमीसनचा (Curcumin) वापर कॅन्सर बरा करण्यसाठी होतो, हे लक्षात आल्यावर याचा वापर साऱ्या जगभर होऊ लागलेला आहे. जागतिक लोकसंख्या ६०० कोटीवर गेल्याने आणि २०१५ पर्यंत ती ७०० कोटीवर पोहचेल, तेव्हा कॅन्सर, हृदय विकार, रक्ताभिसरणाचे रोग, मधुमेह असे लांब पल्ल्याचे रोग यामध्ये हळदीचे योगदान फार मोठे राहणार आहे. कारण वरील दुर्गम्य रोगाचे प्रमाण इतर देशांच्या मानाने आपल्या देशात कमी राहणार आहे. परंतु ज्या वेगाने जग आणि देश प्रगती करीत आहे त्यामुळे मानवाची धावपळ, अनिश्चितता वाढली आहे. प्रगतीचा वेग आधुनिक साधन सुविधा सामुग्री जमविण्याची मानवाची हाव आणि काळाची सांगड मानव घालू शकत नाही. त्यामुळे रक्तदाब, हृदय विकाराच्या तक्रारी वाढतीलच. वैज्ञानिक प्रगती, ऐहीक प्रगती, निसर्गाला ओरबडण्याची मानवाला लागलेली चटक याला आधुनिक वैद्यक क्षेत्रात शास्त्रीय दृष्टीकोनातून, प्रयोगातून व अनुभवातून हळदीचे महत्त्व सिद्ध झाल्याने ते आता जगभर मान्य पावलेले आहे. त्यामुळे साहजिकच हळदीची मागणी वाढल्याने त्याचे क्षेत्र वाढणे गरजेचे आहे. दर्जेदार व एकूण उत्पन्न, एकूण क्षेत्रात वाढ होत आहे. त्यात अजून वाढ होणे अपेक्षित आहे. एकरी व एकूण उत्पादन तसेच दर्जात वाढ होणे अत्यावश्यक आहे. जसे शास्त्र अजून प्रगत होईल तसे हळदीचे विविध अंगी उपयोग कॉस्मेटिक, अन्नपदार्थात प्रतिबंधात्मक व प्रभावी उपाय म्हणून त्याची मागणी वाढतच राहील. म्हणून ५० वर्षापुर्वी असलेली १९ रू. किलो हळद ही भारतात गेल्या ७ - ८ वर्षात १७५ रू. पासून ते २१० रू. पर्यंत झाल्याने शेतकऱ्यांचा या पिकाच्या लागवडीकडे कल वाढलेला आहे. त्यामुळे या पिकामध्ये अनेक शास्त्रामध्ये बहुअंगी संशोधन होऊन त्याची उपयुक्तता वाढविणे गरजेचे आहे. उदा. जसे डाळींबाच्या फळाच्या आतील दाणे चिकटून असणाऱ्या कप्प्यामध्ये एक संरक्षित पातळ पांढरा पडदा असतो. त्याचा कॅन्सरवर औषध निर्मितीत उपयोग होतो. हे आयुर्वेदाने सिद्ध केले आहे. तद्वतच हळद शिजवून झाल्यावर स्वच्छ करताना ड्रममधून फिरवतात. तेव्हा जी साल निघते तिचा उपयोग आयुर्वेदात कसा होतो त्याचा तसेच अर्क, पावडर, अर्काचा अर्क (इतर अल्कलाईड) याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. जसे बटाटा उकडल्यानंतर त्याच्या सालीचा उपयोग भाजलेल्या जागी लावण्यासाठी तसेच बटाट्याच्या सालीचा सुती कपडे स्टार्च करण्यासाठी होतो.

४० वर्षापुर्वी मुंबईतील एका डॉक्टरने ताज्या लोण्यात हळदीचा पावडर मिसळून जखमेवरचा मलम तयार केला होता आणि ५ ते ७ ग्रॅमच्या ट्युबची किंमत १ रू. ते १ रुपया १० पैसे होती. त्या मलमाचे नाव अॅफ्रिको (Accrico) हे होते. मलम इतका रामबाण होता की कुटुंबात कोणाला भाजलेले. कापलेले असले तर लोक डॉक्टरकडे न जात, (त्यावेळी मलमपट्टी करण्यास ५० पैसे ते १ रुपया डॉक्टर त्यावेळी घेत असत) त्याऐवजी लोक ह्या मलमाचा वापर करत असत. त्यामुळे डॉक्टरांची प्रेक्टीस कमी झाली. म्हणून हे चांगले औषध अचानक मार्केटमधून गायब झाले. म्हणजे याचे कारण आपल्या लक्षात आले असेलच, परंतु अजूनही आजीबाईच्या बटव्यातील हळदीचे महत्त्व कमी झालेले नाही. तेव्हा हळद प्रक्रियेची पद्धत जरी अवघड व किचकट असली तरी यावर अनेक पद्धतीने संशोधन व गावातील पद्धतीने हळद उकडून पॉलीश करून अनेक शेतकऱ्यांनी त्या प्रक्रिया आत्मसात करून एकरी ८ ते १० लाखापर्यंत उत्पन्न मिळविले आहे. हळद पिकाची गरज म्हणजे आल्यापेक्ष हळदीचे गड्डे दीड ते दोन पट अधिक असून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरू वापरून लागवड केलेल्या एका बेण्याला ३ - ३ किलो हळदीचे कंद लागल्याचे कोल्हापूरचे शेतकऱ्याने सांगून स्वत: लोकांना माहिती व्हावी यासाठी कोल्हापूर प्रदर्शनात ते गड्डे मांडले होते.

हळदीच्या पिकाच्या पानांची कॅनॉपी कर्दळीच्या किंवा लहान केळीच्या पानांसारखी मोठी, रुंद असल्याने अन्नप्रक्रिया तयार करण्याची प्रक्रिया हळद पिकात आल्यापेक्षा अधिक असते व या पिकाची वाढ चांगल्या रितीने ४ ते ५ - ५।। फुटापर्यंत होते. याला जमीन पाणीधारण क्षमता चांगली असणारी, निचरा होणारी आणि जमिनीमध्ये कंदाची वाढ होत असल्याने जमिनीतील कणांची रचना (Water Stable Aggregate) ०.२५ मि.मी. चे प्रमाण अधिक असणारी जमीन या पिकास अतिशय अनुकूल असते आणि हे मिळविण्यासाठी सेंद्रिय खताचा (गांडूळ, कंपोस्ट, शेणखत), हिरवळीचे खतांचा (ताग, धैंचा, मूग, चवळी, मटकी) तसेच कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करावा.

निंबोळी, करंज पेंडीचा वापर केल्यास सुत्रकृमी, खोडकिडीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो. ज्यावेळेस पाऊस अधिक पडतो तेव्हा पाने पिवळी पडून त्यावर काळे ठिपके टॅफरिनाम्याकुल्न्स (Tapharina maculans) या बुरशीमुळे तो रोग पडतो. परंतु डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्यास हा रोग पाऊस जास्त जरी झाला तरी त्यावर प्रतिबंधक उपाय करून दुरुस्त करता येतो. इतर व्यापारी पिकांपेक्षा हळद हे प्रयोगशीलतेच्या व अनुभवाच्या दृष्टीने नवीन पीक असल्याने त्यावर प्रयोगशील शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करून शिफारसीची समीकरणे शोधता येतील. यासाठी भारतातील कृषी विद्यापीठे जगभरातील संशोधन प्रकल्प यांच्यातील समन्वय साधला तर हे पिकही ४ - ५ वर्षात जागतिक स्थरावर मसाला पीक व अनेक प्रकारच्या आयुर्वेदाच्या औषधी (Panacaea) म्हणून अव्वल मानांकन मिळवू शकेल ही फार मोठी आशा आहे. यामध्ये भारताचा हिस्सा उजवा असेल हा एक आशावाद आहे. तेव्हा प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी, डॉक्टर, वैद्य, शास्त्रज्ञ, विकास अधिकारी, तंत्रज्ञ, अभियंते यांनी याकडे लक्ष घालणे राष्ट्रीय पातळीवर गरजेचे आहे.

हळद पुस्तकामध्ये आम्ही हळद या पिकाचे विविध विषय, प्रश्न हाताळले असून शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून अधिक व दर्जेदार उत्पादन घेतले त्यांच्या मुलाखती दिल्या आहेत. सोबत जगभरच्या हळद या पिकाविषयी व तत्सम उद्योग व उपयोग याचे इंग्रजीमधून विवेचन दिले आहे. ते संशोधनक, शास्त्रज्ञ, विविध विषयातले विद्यार्थी, स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी, विकास अधिकारी, शेतकरी बंधुंना अत्यंत उपयुक्त ठरतील हे आपणच आम्हाला कळवाल !