काजू उत्पादनाचे तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


फळझाडांमध्ये हापूस आंब्याला 'फळांचा राजा' म्हटले जाते. त्याचप्रमाणे काजूला 'फळांची राणी' म्हटले जाते. भारतात काजूची ओळख पोर्तुगीज लोकांनी अंदाजे ४०० वर्षांपूर्वी करून दिली. काजूला 'फिंगरी मँगो' असे ही म्हणतात. पुर्वीच्या काळी काजूची लागवड भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रामुख्याने जमिनीची धूप होऊ नये म्हणून करण्यात आली होती.

महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाच्या घाटमाथ्यावर काजू लागवडीला फार मोठ्या प्रमाणावर वाव आहे.

जगात ब्राझील, भारत, इंडोनेशिया, मोझांबिक, नायजेरिया, टांझानिया या प्रमुख देशांमध्ये काजूची लागवड केली जाते. जगामध्ये भारताचा काजू लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात पहिला क्रमांक लागतो.

भारतात काजूच्या लागवडीखाली ५ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापासून २ लाख ४६ हजार टन कच्च्या काजूबिया मिळतात. महाराष्ट्रात काजू या फळझाडाची लागवड पश्चिम किनारपट्टीतील कोकण भागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात आढळून येते.

* महत्त्व : काजूबियांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण :

पाणी - ६.०%, शर्करा (कार्बोहायड्रेट्स) २२%, स्निग्धांश (फॅट्स)- ४७%, प्रथिने (प्रोटिन्स) - २१%, खनिजे - २.४%, स्फुरद (फॉस्फरस) - ०.५%, चुना (कॅल्शियम) - ०.६%, लोह - ०.००५%, कॅटोरीन - १०० इ.यु., जीवनसत्व ब २ - ०.६%, रिबोफ्लेविन - ०.२%, उष्मांक (कॅलरी) - ५९६%.

* हवामान : काजू हे उष्ण कटिबंधातील फळझाड आहे. उष्ण आणि दमट हवामान काजूला चांगले मानवते. कडाक्याची थंडी आणि धुके काजूच्या झाडाला सहन होत नाही. थंड कोरड्या हवेत काजूच्या झाडांची वाढ खुंटते आणि अशा ठिकाणी काजूचे उत्पादन कमी येते. ज्या भागात पाऊस कमी, परंतु वर्षभर सारख्या प्रमाणत पडतो आणि तापमान २० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत असते. अशा भागात काजूचे पीक उत्तम येते. काजूचे झाड प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असल्यामुळे काजूच्या उत्पादनात पाऊस हा एक फार महत्त्वाचा घटक समजला जातो. ज्या विभागात कमीत कमी ५०० मिलीमीटर आणि जास्तीत जास्त ४,००० मिलीमीटर पाऊस पडतो, अशा भागात काजूचे पीक वाढू शकते. समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंचीपर्यंत काजूची लागवड यशस्वी होऊन भरपूर उत्पादन मिळते. समुद्रकिनारपट्टीपासून जसजसे दूर जावे. तसतसे उत्पादन कमी मिळते. काजूच्या झाडाला भरपूर सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते.

* जमीन : काजूचे झाड खडकाळ, डोंगरउतारावरील हलक्या प्रतीच्या मुरमाड जमिनीत वाढू शकते. पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरील रेताड आणि वाळूमिश्रित जमिनीत काजूची लागवड करता येते. विशेषतः जांभ्या दगडापासून तयार झालेल्या तांबड्या जमिनीत काजूचे पीक चांगले येते. जमिनी पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. मध्यम काळ्या, पाणी साचून राहणाऱ्या क्षारयुक्त जमिनीत काजूची लागवड करू नये.

* सुधारित जाती : कोकण कृषी विद्यापीठाने काजूच्या सात जाती प्रसारित केल्या आहेत, त्यापैकी वेंगुर्ला - १ व वेंगुर्ला - २ या निवडपद्धतीने आणि इतर ५ संकरित पद्धतीने विकसीत केल्या आहेत. त्या पुढीप्रमाणे -

अ. क्र.   जात   एका झाडाचे प्रति वर्षी उत्पादन (किलो)   वैशिष्ट्ये   जातीचा विकास  
१)   वेंगुर्ला -१   १५-२०   एका किलोत १६० बिया बोंडाचा रंग पिवळा   अणसूर -१ या जातीपासून निवड  
२)   वेंगुर्ला -२   ३०- ४०   एका किलोत २३० बिया बोंडाचा रंग गर्द लाल   दिपाल - ५ या जातीपासून निवड  
३)   वेंगुर्ला - ३   २० -२५   एका किलोत १०० बिया बोंडाचा राग पिवळा   वेंगुर्ला -१ आणि वेतोरे - ५६ या जातींपासून संकर  
४)   वेंगुर्ला -४   २५ - ३०   एका किलोत १३० बिया बोंडाचा रंग तांबडा   मिदनापूर लाला आणि वेतोरे -५६ या जातींपासून संकर  
५)   वेंगुर्ला - ५   ३० - ३२   एका किलोत २२० बिया बोंडाचा रंग नारिंगी   अणसूर अर्ली आणि काटेकोर या जातीपासून संकर  
६)   वेंगुर्ला - ६   १७ - १८   एका किलोत १२५ बिया बोंडाचा रंग पिवळा   ---  
७)   वेंगुर्ला - ७   ३० - ३५  एका किलोत १०० बिया बोंडाचा रंग पिवळा   वेंगुर्ला - ३ आणि एम - १० - ४ जातींपासून संकर 


वरील जातींमध्ये वेंगुर्ला - ७ ही जात सर्वोत्तम असून या जातीचे बी सर्वांत मोठे म्हणजे १० ग्रॅम वजनाचे आहे. काजू बी मध्ये गराचे प्रमाण ३०.५% आहे. या जातींच्या पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी १९ किलो काजू बी चे उत्पादन मिळते.

* अभिवृद्धी आणि लागवड पद्धती : काजूच्या झाडाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून तसेच गुटीकलम, भेटकमल, मृदुकाष्ठ कलम, व्हिनीयर कलम अथवा डोळे भरून करता येते. काजूमध्ये पररागीकरणामुळे बियांपासून तयार केलेल्या झाडामध्ये मातृवृक्षाचे सर्व गुणधर्म येत नाहीत. म्हणूनच काचूची कलमे लावून काजूची लागवड करणे आवश्यक आहे. कलम पद्धतीमध्ये मृदुकाष्ठ कलमे करण्याची पद्धत सोपी, कमी खर्चाची आणि जास्त यशस्वी होत असल्यामुळे या पद्धतीचा वापर काजूच्या अभिवृद्धीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

काजूची बियांपासून लागवड करताना रोपे तयार करण्यासाठी गावठी झाडाच्या बिया वापरू नयेत. त्यासाठी वेंगुर्ला - १ आणि वेंगुर्ला -२ ह्या निवड पद्धतीने विकसित केलेल्या जातींच्या चालू हंगामातील बिया वापराव्यात.

पेरणीसाठी पूर्ण वाढलेले, टपोरे आणि राखाडी करड्या रंगाचे ताजे बी वापरावे. काजू बी तयार झाल्यापासून त्याची उगवणक्षमता ७ ते ८ महियांनी कमी होत जाते. साधारणपणे एका किलोत १२५ ते १५० पक्व बिया मावतील, अशा रितीने बियांची निवड करावी. पॉलीथीनच्या १५ x २५ सेंटिमीटर आकाराच्या ३०० गेज जाडीच्या पिशव्या २:१ या प्रमाणात पोयटा माती आणि कुजलेले शेणखत यांच्या मिश्रणाने भरून घ्याव्यात. पिशव्या भरण्यापुर्वी प्रत्येक पिशवीला खालील भागात ४ ते ६ छिद्रे पाडावीत. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होऊन रोपे कुजणारा नाहीत. पॉलिथीन पिशव्यांमध्ये बियाणे रुजत घालण्यापुर्वी ते सुमारे २४ ते २८ तास जर्मिनेटरच्या द्रावणात भिजत ठेवावे. पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये बिया २.५ ते ३ सेंटिमीटर खोल रुजत घालाव्यात. रोपे २ ते ३ महिन्यांची झाल्यानंतर शेतात कायम जागी लावावीत.

* मृदुकाष्ठ पद्धतीने कलम तयार करणे: मृदुकाष्ठ कलम तयार करण्यासाठी प्रथम बियांपासून खुंटरोपे तयार करावीत. यासाठी १५ x २० सेंटिमीटर आकाराच्या पॉलिथीनच्या पिशव्यांना खालील अर्ध्या भागात पेपरपंचने ८ - १० छिद्रे पाडून या पिशव्या ३:१ या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत व पोयटा माती आणि चमचाभर कल्पतरू सेंद्रिय खत यांच्या मिश्रणाने भराव्यात. शेणखत आणि पोयटा मातीच्या मिश्रणात लिंडेन भुकटी (१०%) मिसळावी. या पिशव्यांमध्ये काजूचे ताजे बी साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला १.५ ते २ सेंटीमीटर खोल लावावे. बी लावण्यापूर्वी १ - २ दिवस जर्मिनेटरच्या द्रावणात (१ लि. पाण्यात ५० मिली जर्मिनेटर + २० ग्रॅम प्रोटेक्टंट) भिजत ठेवावे. फेब्रुवावरी महिन्यात रोपांवर मृदुकाष्ठ कलम करावे.

कलमे करण्यासाठी निवडक जातीच्या भरपूर फळे देणाऱ्या, निरोगी झाडावरील, शेंड्याकडील सुमारे चार महिने वयाच्या फांद्या डोळकाडीसाठी निवडाव्यात. या फांद्यांची जाडी कलमे करण्यासाठी वापरावयाच्या खुंटरोपांच्या जाडीएवढी असावी. या फांद्यावरून १५ सेंटीमीटर लांबीच्या डोळकाड्या घ्याव्यात.

कलमे करताना खुंटरोपाच्या शेंड्याकडून १० सेंटीमीटर खाली आडवा काप घेऊन शेंडा छाटावा. खुंटरोपावर ४ ते ५ सेंटीमीटर लांबीचा उभा काप घेऊन पाचरीचा आकार द्यावा. नंतर ही डोळकाडी खुंटरोपाच्या उभ्या कापामध्ये घट्ट बसवावी आणि पॉलिथीन पट्टीने कलम केलेला भाग घट्ट बांधावा.

कलमांची अथवा रोपांची लागवड करण्यासाठी योग्य अंतरावर ६० x ६० x ६० सेंमी. आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे १:१ या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत आणि मातीने भरावेत. खड्डे भरताना मातीमध्ये लिंडेन भुकटी (१०%) दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट, अर्धा किलो निंबोळी पेंड आणि कल्परू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम मिसळावे. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात एक रोप अथवा कलम लावावे. लागवड करताना कलमाला अथवा रोपाला काठीचा आधार द्यावा.

* हंगाम आणि लागवडीचे अंतर : काजूच्या लागवाडीसाठी जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवाडीची पद्धत ठरवावी. लागवडीच्या पद्धतीमध्ये १) चौरस पद्धत, २) चौकोनी पद्धत, ३) षट्कोनी पद्धत, ४) समपातळी उतार पद्धती अशा निरनिराळ्या पद्धती आहेत. प्रत्येक पद्धतीने एक हेक्टर क्षेत्रावर बसणाऱ्या झाडांची संख्या वेगवेगळी येईल. काजूच्या लागवडीसाठी सपाट जमिनीवर चौरस पद्धत वापरावी. या पद्धतीने दोन ओळींमधील आणि दोन झाडांमधील अंतर सारखेच असते. या पद्धतीने दोन्ही बाजूंनी आंतरमशागत करणे फारच सोपे जाते.

काजूच्या लागवडीसाठी जमिनीची निवड केल्यावर उन्हाळ्यात मशागत करावी. एप्रिल - मे महिन्यात ७ ते ८ मीटर अंतरावर चौरस पद्धतीने काजूची लागवड करावी.

* वळण आणि छाटणी: काजूच्या झाडाला लागवडीनंतर २ - ३ वर्षात योग्य वळण देणे हे पुढील व्यवस्थापनाच्या आणि झाडाच्या वाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे. काजूचे झाड १ मीटर उंचीचे झाल्यावर त्याचा शेंडा खुडावा त्यापासून पुढे येणाऱ्या ५ ते ६ जोमदार फांद्या योग्य अंतरावर चारी दिशांना विखुरलेल्या स्थितीत वाढतील अशा प्रकारे ठेवाव्यात. झाडांची चांगली वाढ होण्यासाठी लागवडीनंतर ५ वर्षापर्यंत वेड्यावाकड्या वाढणाऱ्या रोगट, कमजोर वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. काजूच्या झाडाची दरवर्षी छाटणी करण्याची आवश्यकता नसते.

* खते आणि पाणी व्यवस्थापन : काजूच्या झाडाला शेतकरी शक्यतो खते देत नाहीत. मात्र काजूची झाडे खतांच्या मात्रांना चांगला प्रतिसाद देतात. खतांचा पुरवठा केल्यास झाडांची जोमदार वाढ होऊन उत्पादनही जास्त मिळते. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यावर झाडाच्या विस्ताराखाली बांगडी पद्धतीने वर्तुळाकार चर खोदून खते द्यावीत.

झाडाचे वय आणि विस्तार लक्षात घेवून झाडाभोवती चर खोदावेत. मोठ्या झाडांच्या बाबतीत चराची रुंदी ३० ते ४५ सेंटीमीटर आणि खोली १५ ते २५ सेंटीमीटर ठेवावी. त्यामध्ये पालापाचोळा, शेणखत, गांडूळखत कल्पतरू सेंद्रिय खत आणि रासायनिक खते थोड्या प्रमाणात टाकून चर मातीने बंद करावा.

काजूच्या झाडाला द्यावयाची खते

नत्र (ग्रॅम)
वर्ष   शेणखत (किलो)   कल्पतरू (ग्रॅम)     स्फुरद (ग्रॅम)   पालाश (ग्रॅम)  
पहिले   १५   ५००   १२५   ६०   ६०  
दुसरे   २०   १०००   २५०   १२५   १२५  
तिसरे   २५   १५००   ३७५   २००   २००  
चौथे व त्यापुढील   ३०   २०००   ५००   २५०   २५०  


नवीन बागेची निरोगी, लवकर, जोमदार वाढ होण्यासाठी खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात -

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रिझम १५० मिली. +१०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर १ ते १।। महिन्यांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली + १५० लि.पाणी.

नंतर दुसऱ्या, चौथ्या वर्षी वरील प्रमाणात पहिली फवारणी जून - जुलैच्या दरम्यान आणि दुसरी फवारणी ऑगस्ट - सप्टेंबरच्या दरम्यान करावी. म्हणजे ४ वर्षानंतर बहार धरता येईल.

काजूचे झाड कणखऱ असल्यामुळे या झाडाला वारंवार पाणी देण्याची आवश्यकता नसते. ज्या ठिकाणी ओलिताची सोया आहे. अशा ठिकाणी काजूची लहान झाडे जगविण्यासाठी उन्हाळ्यातील चार महिन्यांपर्यंत ५ ते ६ दिवसांच्या अंतराने आणि हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे.

* आंतरपिके : काजू लागवड हलक्या ते मध्यम जमिनीत केली जात असल्यामुळे तसेच कोरडवाहू फळझाड म्हणून काजूची लागवड केली जात असल्यामुळे सर्वसाधारणपणे या पिकात आंतरपिके घेतली जात नाही. परंतु ज्या ठिकाणी ओलिताची सोया आहे, अशा ठिकाणी सुरुवातीच्या २ -३ वर्षांच्या काळात मिरची, आले, रताळी, हरभरा, बीट, वांगी, उडीद ही पिके आंतरपिके म्हणून घेता येतात.

जमिनीची सुपीकता आणि पोत सुधारण्यासाठी ताग किंवा धैंच्याची लागवड करून हे पीक फुलावर येण्यापूर्वी जमिनीत हिरवळीचे खत म्हणून गाडून टाकावे. आंध्र प्रदेशात चवळी, मटकी, भुईमूग ही पिके काजूमध्ये आंतरपिके म्हणून घेण्यास चांगली आहेत. त्याचप्रमाणे काजूमध्ये शेवगा, कढीपत्ता ही पिके आंतरपिके म्हणून घेता येतात.

* महत्त्वाचा किडी आणि त्यांचे नियंत्रण :

१) टी मॉस्क्विटो: हा लालसर भुरकट रंगाचा किडा असून झाडाची नवीन पालवी आणि मोहोर कोवळा असताना या किडीचा उपद्रव होतो. या किडीच्या अळ्या तसेच प्रौढ कीड हे दोन्ही झाडाच्या कोवळ्या फांद्या, मोहोर आणि लहान फळे यामधील रस शोषून घेतात.

किडीचा उपद्रव झालेला भाग किडीने पेशी खाल्ल्यामुळे खोलगट बनतो. हा भाग नंतर कोरडा होऊन फांद्या, मोहोर आणि फळे जळून जातात. किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात झाल्यास सर्व झाडच जळून गेल्यासारखे दिसते.

* उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी १०० लिटर पाण्यात २०० मिली कार्बारिल (५०% प्रवाही) किंवा २५० ग्रॅम कॉपरऑक्सिक्लोराईड या प्रमाणात मिसळून ३ ते ४ वेळा फवारावे. पहिली फवारणी नवीन पालवी फुटताना, दुसरी फवारणी मोहोर येताना आणि तिसरी फवारणी फलधारणेच्या वेळी करावी.

२) खोडकिडा किंवा रोठा : ही कीड झाडांची साल पोखरून खोडात प्रवेश करते आणि खोड आणि मुळाचा गाभा खाते, त्यामुळे झाडाच्या फांद्या अथवा संपूर्ण झाडही मरून जाते. दुर्लक्षित बागेत या किडीचा प्रादुर्भाव अधिक होतो. झाडाच्या खोडावरील आणि फांद्यांवरील छिद्रांमधून डिंक अथवा भुस्सा बाहेर आलेला दिसल्यास खोडकिडींचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजावे.

* उपाय : खोडकिडा बंदोबस्तासाठी किडीने पोखरलेल्या छिद्रातील अळ्या तारांच्या मदतीने बाहेर काढून नष्ट कराव्यात. पेट्रोल अथवा कार्बनडायसल्फाईड मध्ये बुडविलेल्या कापसाने छिद्रे बंद करावीत. नंतर सर्व छिद्रे मातीने लिंपून घ्यावीत व झाडांचा खोडालगतचा भाग स्वच्छ ठेवावा आणि किमान दोन महिन्यांच्या अंतराने झाडाची व्यवस्थित पाहणी करावी.

३) लीफ मायनर आणि पाने खाणारी अळी : ही अळी झाडाची नवीन कोवळी पाने पोखरून पानाचा आतील भाग खाते, त्यामुळे पानाचा वरील भाग तसाच राहून पानावर पारदर्शक नागमोडी पोखरलेल्या आकृत्या दिसतात.

* उपाय : लिफ मायनर या किडीच्या नियंत्रणासाठी ५ मिलीमीटर फॉस्फोमिडॉन किंवा २० मिली स्प्लेंडर २० ग्रॅम प्रोटेक्टंटसह १० लिटर पाण्यात मिसळून नवीन पालवी येताना फवारावे.

४) पाने गुंडाळणारी अळी : या किडीची अळी झाडाच्या कोवळ्या फांद्या आणि मोहोर एकत्र गुंडाळून जाळे तयार करून आत राहते. ही अळी झाडाच्या कोवळ्या फांद्या आणि मोहोर यावर उपजिवीका करते.

* उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी लिंडेन २० किलो दर हेक्टरी धुरळवी अथवा २ किलो कार्बारिल भुकटी (५०% पाण्यात मिसळणारी) किंवा स्प्लेंडर १ लि. ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

* महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

१) फांद्यांची मर (डायबॅक) : हा काजूवरील प्रमुख रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात आणि पावसानंतर दिसून येतो. या रोगामुळे काजूच्या फांद्या टोकाकडून वाळू लागतात. फांद्यांच्या टोकाकडून चिकट द्रव बाहेर येतो. फांद्या मरतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते अशा झाडापासून अतिशय कमी उत्पादन मिळते.

* उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त फांद्या कापून काढाव्यात. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. बोर्डो पेस्ट पावसात धुऊन जाऊ नये म्हणून त्यात जवसाचे तेल मिसळावे. जर्मिनेटर, प्रिझम, (प्रत्येकी १ लिटर २०० लिटर पाण्यातून) चे मुळाला ड्रेंचिंग करावे आणि एक टक्का बोर्डो मिश्रण मे, जून, आणि आणि ऑक्टोबरमध्ये असे तीन वेळा झाडावर फवारावे.

२) पानावरील करपा (पेस्टॅलोशिया ब्लाईट) हा रोग पूर्ण वाढलेल्या पानांवर आढळून येतो. पानांवर काळसर पिंगट रंगाचे अनियमित ठिपके दिसतात. ठिपक्यांचा मध्यभाग राखाडी रंगाचा असतो. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पाने करपतात. ज्या बागांची निगा योग्य रितीने घेतली जात नाही, अशा बागांमध्ये हा रोग आढळून देती.

* उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी काजूच्या बागेची योग्य काळजी घ्यावी. काजूच्या झाडांना योग्य प्रमाणात खते देणे आवश्यक आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी झाडावर १% बोर्डो मिश्रण फवारावे.

३) रोपांची मर : हा रोग प्रामुख्याने रोपवाटिकेत आढळती. पाण्याचा निचरा न होणाऱ्या रोपवाटिकेत हा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. हा बुरशीजन्य रोग असून बुरशीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेतीला रोपांच्या मुळांवर होतो. त्यामुळे रोपांची वाढ खुंटते आणि रोपे मरतात.

* उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेत पाण्याचा निचरा करावा. एका टक्का बोर्डो मिश्रण रोपांच्या मुळांच्या भोवती ओतावे. त्यानंतर पांढऱ्या मुळ्यांचा जारवा वाढीसाठी जर्मिनेटर ३० मिलीचे १० लि. पाण्यात द्रावण करून प्रत्येक रोपावरुन मुळांपर्यंत सोडावे.

या कीड व रोगांवर प्रतिबंधक व प्रभावी उपाय करण्यासाठी तसेच भरघोस, दर्जेदार काजू उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सुरुवातीपासून खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (बहार धरल्यानंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर २०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (बहार धरल्यानंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ७५० मिली.+ थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ३०० मिली + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ४०० मिली. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (बहार धरल्यानंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ४०० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (बहार धरल्यानंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ४०० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + २०० लि. पाणी.

* फळांची काढणी, उप्तादन आणि विक्री : लागवडीच्या सुरूवातीपासून काजूच्या झाडांची चांगली निगा राखल्यास काजूच्या झाडांना लागवडीनंतर तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षपासून उत्कृष्ट प्रतीच्या काजूबियांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते आणि पुढे ४० - ५० वर्षे काजूचे नियमित उत्पादन मिळते. काजूच्या झाडाला नोव्हेंबरपासून मोहोर येण्यास सुरुवात होते. फुलोरा आल्यानंतर फळे पक्व होईपर्यंत ६२ ते ६५ दिवसांचा कालावधी लागतो. काजूच्या झाडाला नवीन पालवी येते आणि या पालवीलाच पुढे मोहोर येतो. सर्वसाधारपणे फुलोरा दोन ते तीन वेळा येतो. यापैकी जास्त फळे दुसऱ्या वेळी म्हणजे डिसेंबर - जानेवारी महिन्यांत आलेल्या मोहोराला येतात, म्हणून या काळात उत्पादनात वाढ करण्यासाठी काजूच्या मोहोराची निगा राखणे अत्यंत आवश्यक असते. याकरिता थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझमची फवारणी घेणे फायदेशीर ठरते. अन्यता उत्पादन कमी येते. काही वेळा ९० ते ९५% मोहोर गळून जातो. म्हणून मोहोराची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. लवकर येणाऱ्या मोहोरापासून तयार होणारी फळे ६० दिवसांत पक्व होतात. तर उशिरा आलेल्या बहारापासून तयार होणारी फळे ४५ दिवसांत पक्व होतात.

* फेब्रुवारी महिन्यापासून काजूबिया तयार होण्यास सुरुवात होते आणि मार्च - एप्रिलमध्ये बिया काढणीस तयार होतात. काजू जसजसे तयार होतात, तशी हातानेच तोडणी करावी लागते आणि हे काम ४५ ते ७५ दिवसापर्यंत चालते. दोन - तीन दिवसांच्या अंतराने काजूच्या पक्व बिया काढाव्यात. पक्व काजूबिया बोंडापासून अलग करून २ - ३ दिवस उन्हात चांगल्या वाळवाव्यात. त्यामुळे बियांमधील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ % होते. काजूचे बी काजूफळातील बोंडाच्या वजनाच्या २५ ते ३०% वजनाएवढे असते. मोठ्या झाडापासून ७५ ते १०० किलो काजूफळे आणि २० ते ३० किलो काजूबिया मिळतात. काजूच्या बियांवर कारखान्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून काजूगर तयार केले जाते. नंतर त्यांची वर्गवारी करून १८ किलो काजूगर मावतील अशा आकाराच्या पत्र्याच्या चौकोनी डब्यांमध्ये पॅकिंग करून विक्री करतात.