झी-२४ तास चा 'दीपस्तंभ' कृषी सन्मान ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ प्रा. डॉ. वि.सु.बावसकर यांना प्रदान !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


झी-२४ तास

जसे विविध क्षेत्रामध्ये कलाकार, संगीत, साहित्य, नाट्य, क्रिडा, शैक्षणिक, उद्योजक, आरोग्य, सांस्कृतिक अशा क्षेत्रात देशाचे नागरी पुरस्कार दिले जातात. तसे शेतकरी जो जगाचा पोषणकर्ता आहे त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी यासाठी 'झी-२४ तास' या टी.व्ही.चॅनलने शेतकऱ्यांसाठी व या क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणात योगदान देणाऱ्या व्यक्तींना १९ जून २०१४ रोजी दुपारी ४ ते ८ यावेळी कृषी सन्मानाने गौरविण्याचे आयोजन केले होते.

कृषी सन्मान हा पुरस्कार विविध गटांमध्ये अल्प, मध्यम, मोठी शेती असणारे शेतकरी, प्रक्रिया उद्योजक, शेतीमाल निर्यातदार यांच्याकरिता विविध गट करून पुरस्कार ना. सुनिल तटकरे, सिंचन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देण्यात आले.

डॉ. बावसकर सरांनी कृषी क्षेत्रामध्ये ४ दशकाहून अधिक काळ शेतकऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, तंत्रज्ञांसाठी विविध विषयांवर अतिशय सखोल संशोधन करून शेतकऱ्यांचे आर्थिक स्रोत व उत्पादन वाढवून भरपूर नफा मिळवून देण्याचे कार्य केले. पक्रिया उद्योगाला उद्युक्त करून कमी वेळामध्ये एकरातून लाखो रुपये मिळवून दिले. सेंद्रिय शेती ही देशभर विकसित केली. जसे स्ट्रॉबेरी ही ऑक्टोबरपासूनच सुरू होऊन जूनपर्यंत पिकविता येऊन निर्यातीतून शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळवून दिले. कांद्यामध्ये क्रांती केली. कमी पाण्यावर विषमुक्त आणि संपुर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती उत्पादन निर्माण करण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले. ४ ते ५ दशकाहून अधिक काळ देशभर हजारो मॉंडेल विविध विषयात घडविले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने देशभर राज्यवार एक हजारहून अधिक सेमिनार, कृषी मेळावे, कार्यशाळा, परिसंवाद, शिवारफेऱ्या आयोजित करून मार्गदर्शन केले. 'सिद्धीविनायक शेवगा हा निवड पद्धतीतून देशभर यशस्वी केला व तिसऱ्या जगातील राष्ट्रांसाठी 'कल्पवृक्ष' म्हणून दिला. 'सिद्धीविनायक' शेवगा हे कमी पाण्यावर, हलक्या जमिनीत, उष्ण हवामानात कमी कीड रोग असणारे एकमेव पीक असल्याने याची आतापर्यंत ४० ते ५० हजार शेतकऱ्यांनी देशभर लागवड यशस्वी करून त्याचा दर्जा अप्रतिम असल्याने उच्चांकी दर मिळवून लाखो रुपये कमविले. तो निर्यातही झाला.

शेतकऱ्यांच्या शेतावरील आलेल्या अनुभवावरून विविध, विषयवार पुस्तके काढली, बहुमोल अशा 'कृषी विज्ञान' मासिकातून देशाच्या राज्याच्या व ग्रामीण विकासाच्या योजनांच्या दिलेल्या सुचना सरकार, विविध क्षेत्रातील विकास अधिकाऱ्यांना मार्गदर्शक ठरल्या. या सर्वकष प्रयत्नांना दाद म्हणून 'झी -२४ तास' या टी.व्ही.चॅनलने प्रा. डॉ. बावसकर सरांना कृषी क्षेत्रातील 'दीपस्तंभ' कृषी सन्मान हा मानाचा पुरस्कार मा. हर्षवर्धन पाटील, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमसाठी राहुरी कृषी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व शाश्वत कोरडवाहू शेती अभियानाचे अध्यक्ष डॉ. राजाराम देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, विकास अधिकारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व अधिकारी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रगतीशिल शेतकरी बंधू व भगिनी उपस्थित होते. दापोली कृषी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. शंकरराव मगर यांनी परिक्षक म्हणून काम केले.