'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड व तंत्रज्ञान व्यवस्थित वापरले तर इतर पिकांपेक्षा चांगला फायदा होतो

श्री. बाळासाहेब महादेव शेलार,
मु.पो. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे,
मो. ८६९८९०९७७९



आम्ही पुर्वी ऊस पीक घेत होतो. मात्र पुढे उसाला पाणी, खते जादा लागूनही उत्पादन (टनेज) पाहिजे तसे मिळत नव्हते. तसेच ह्या पिकाला लागणार कालावधी जादा, म्हणजे १। ते १।। वर्षातून १ पीक, एकरी ५० - ५५ टनाचा उतारा आणि १६०० - १७०० रु./ टन भाव. या सर्वांमुळे ऊस पीक काही परवडेनासे झाले. त्यामुळे आम्ही नगदी पिकाच्या शोधात होतो. मार्केटमध्ये कोणत्या पिकाला भाव आहेत याचा शोध घेतला. त्यानंतर आम्ही कलिंगड, खरबुज या पिकांची निवड केली. त्यापासून उत्पादन बरे मिळाले. मात्र यासाठी मजुरी व औषध फवारण्या यांचा खर्च वाढू लागला. त्यामध्येही पुढे मजुर मिळेनासा झाल्याने कलिंगड, खरबुजाची शेती कठीण जाऊ लागली. मग याला पर्यायी पिकाचा शोध चालूच होता. तेव्हा बाजारपेठेत शेवगा पिकाला भाव स्थिर असल्याचे लक्षात आले. मग चांगल्या वाणाच्या शोधात होतो. मग पुर्वी ५ - ६ वर्षाअगोदर लिंबू पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे सरांच्या मार्गदर्शनानुसार वापरली होती. तेव्हा त्याचे रिझल्ट चांगले मिळाले होते. मात्र पुढे लिंबाची रात्रीचीच चोरी होऊ लागल्याने उत्पादन येऊनही परवडेनासे झाले. तेव्हा डॉ.बावसकर सरांनी मला 'सिद्धीविनायक' शेवग्याबद्दल माहिती दिली होती. त्यावरून मी २०१५ मध्ये सरांचाच 'सिद्धीविनायक' शेवगा लावायचे ठरविले.

जून २०१५ मध्ये 'सिद्धीविनायक' शेवगा बियाची २० पाकिटे आणि जर्मिनेटर १ लि. घेऊन गेलो. बियाणे जर्मिनेटर १०० मिली + २ लि. पाणी या द्रावणात रात्रभर भिजवून सावलीत सुकविले. तत्पुर्वी उन्हळ्यात जमिनीची मशागत केली. प्रथम नांगरट करून कल्टिव्हेटर मारून १० फुट अंतरावर ट्रॅक्टरने सऱ्या पाडल्या आणि नेटाफेमचे ठिबक अंथरून घेतले. बी लागवडीपुर्वी २ द्विस अगोदर १२ तास ठिबक चालवले. त्यामुळे जमिनीत गारवा निर्माण झाला. मग दुसऱ्या दिवशी चिखल असल्याने तिसऱ्या दिवशी वाफसा आल्यावर बायांना जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केलेले बी आणि ५ फुट लांबीची काठी दिली. मग ५ फुटाच्या काठीने मापे घेऊन ५ - ५ फुटावर वाफश्यावर खुरप्याने गल पाडून त्यामध्ये १ - १ चमचा कल्पतरू खत आणि निबोंळी पेंड टाकून त्यावर थोडी माती ढकलून बियांची टोकण (थेट जमिनीत लागवड) केली. ठिबक दररोज १ तास (ताशी ३ लि.) बी उगवेपर्यंत चालवले. सुरुवातीची वाफसा अवस्था व जर्मिनेटरची बीज प्रक्रिया यामुळे ५ व्या दिवशी कोंब दिसला. आठवड्यात उगवण पुर्ण झाली.

उगवाणीनंतर रोपाची १।। फुट वाढ होईपर्यंत ठिबकने दिवसाआड पाणी १।। ते २ तास असे सकाळी १०.०० वा. च्या आत देत असे. महिन्याभरातच १।। फुट उंचीची झाडे झाली. या अवस्थते डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनरच्या १५ लि. पंपास प्रत्येकी ३० मिली प्रमाणे १५ दिवसाला अशा २ फवारण्या केल्या होत्या. त्यानंतर २।। फुटाची झाडे होईपर्यंत फक्त पाणी गरजेनुसार २ - ३ दिवसाआड देत होतो.

मग २।। फुट उंचीचा शेवगा झाल्यावर फुटवे निघण्यासाठी प्रथम शेंडा खुडला. त्यानंतर ४ - ४, ५ - ५ फुटवे निघाले. या फांद्या १।। फुट लांबीच्या झाल्यावर त्याचाही शेंडा खुडला. त्यानंतर झाडांचे पोषण होण्यासाठी १ घमेले शेणखत, २५० ते ३०० ग्रॅम कल्पतरू खत, २५० ग्रॅम निंबोळी पेंड असा खताचा डोस प्रत्येक झाडास देऊन छोट्या ट्रॅक्टरने ओळीच्या दोन्ही बाजुने सरी पाडून झाडांना मातीची भर लावून बेड तयार केले व त्यावरून ठिबकची लाईन सोडली. बेड तयार झाल्यावर पाण्याचे प्रमाण वाढविले. दिवसाआड ३ तास ठिबक चालू ठेवू लागलो. (तासाला ३ लि. प्रमाणे ९ लि. प्रत्येक झाडास पाणी देऊ लागलो.) त्यावेळी ठिबकमधून १२:६१:० २ किलो/ एकरी १५ दिवसाला असे ३ वेळा सोडले. मग फुटवे जोमदार झाल्यावर १३:४०:१३ हे १५ दिवसाला ३ - ४ किलो सोडत होतो. या १५ दिवसाच्या मध्ये ८ व्या दिवशी जर्मिनेटर एकरी १ लि. सोडत होतो. असे २ महिने सोडले. जर्मिनेटरमुळे मुळांची वाढ होऊन दिलेल्या खताला प्रतिसाद मिळून झाडे जोमाने वाढत होती.

५ व्या महिन्यात फुल लागले त गळले. नंतर १५ दिवसांनी लागलेली फुले टिकली. त्या अवस्थेत जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम, प्रोटेक्टंटच्या फवारण्या घेत होतो. त्यामुळे फुलातून वाध्या निधू लागल्या. हवामानात बदल जरी झाला तरी गळ होत नव्हती. प्रोटेक्टंटने मधमाशांचे प्रमाण वाढले होते. शंग लागल्यानंतर १।। महिन्यांनी तोडा सुरू झाला. सुरूवातीला झाडाचा आकार लहान, ताकद कमी असते त्यामुळे शेंग ८ - ८ दिवसांनी तोडण्यास येते. पुढे जसे झाडाची ताकद वाढेल तसे शेंगाचे प्रमाण वाढून पोषण वेगाने होऊन लागले. तेव्हा ३ ऱ्या दिवशी तोडा करू लागलो.

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी २०१६ या काळात ७० - ८० रु. किलो भाव मिळाला. शेंग हिरवीगार १।। ते २ फुट लांबीची एकसारखी वजनदार मिळत होती. याकरिता सप्तामृतातील राईपनर, न्युट्राटोनचा अधिक फायदा झाला. आठवड्यातून ३ वेळा शेंगा काढत होतो. तोड्याला २०० किलो शेंग निघत होती. नंतर जसे ऊन वाढू लागले. तसा माल अधिकच वाढू लागला. तेव्हा ३०० ते ४०० किलो शेंगा मिळू लागल्या. जसे ऊन वाढू लागते तसे बाजारात मालाची आवक वाढते. त्यामुळे भाव कमी - कमी होत जातात. सुरुवातीचे ३ महिने (फेबुवारी २०१६ पर्यंत) ७० - ८० रु. ने जाणारी शेंग ५०, ४०, ३० रू. किलो मार्चमध्ये होऊन एप्रिलमध्ये १० रु. वर भाव आले. एकरी ७ - ८ टन असा २ एकरातून १५ टन माल पहिल्या बहाराचा मिळाला. याचे सरासरी ३० रु. किलो भावानुसार ४ - ४।। लाख रु. झाले. यासाठी एकूण ७० -८० हजार रु. खर्च आला.

मे महिन्यातील छाटणी

मग पुढे भाव कमी झल्यावर मे २०१६ मध्ये झाडांची छाटणी केली. जमिनीपासून १। ते १।। फुट खोड ठेवून छाटणी केली आणि जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. हे २०० लि. पाण्यातून फवारले. यामध्ये १०० मिली नुवान वारपले. नुवानने आळीचा प्रादुर्भाव टळला आणि जर्मिनेटर, प्रिझममुळे फुटवा चांगला वेगाने निघाला. खोडाला १०:२६:२६ ४०० ग्रॅम , कल्पतरू ३०० - ४०० ग्रॅम, निंबोळी पेंड ५०० ग्रॅम असा प्रत्येक झाडास रिंग पद्धतीने खताचा डोस दिला. सप्तामृत फवारणी बरोबर किटकनाशकही पौर्णिमेच्या व अमावास्येच्या आदल्या दिवशी अशी नियमित १५ दिवसाला घेत होतो.

पाणी नेहमीप्रमाणे दिवसाआड ३।। - ४ तास देत होतो. सुरूवातीला ३ फुटावर शेंडे खुडले. पुढे जसे फुटवे निघून ३ फुटाचे होतील तशी शेंडे खुडणी चालूच होती.

मग हा बहार पुन्हा नोव्हेंबर २०१६ ला सुरू झाला. हा दुसरा बहार असल्याने झाडाची खोडे मजबूत होती. त्यामुळे पहिल्या बहारापेक्षा जादा माल लागला. फुटवे निघून फुलकळी निघताना १२:६१:० हे १५ दिवसाला ४ किलो असे २ वेळा सोडले. त्यानंतर शेंगा लागल्यावर १३:४०:१३ हे ४ किलो १५ दिवसाला असे २ - ३ महिने दिले. मध्ये १५ दिवसाला सप्तामृत फवारणी चालूच असते. या व्यतिरिक्त काही वापरत नाही. पावसाळी हवामानाचा वाईट परिणाम होऊ नये यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर फवारतो, त्यामुळे शेंग वाकडी होत नाही. शेंग हिरवीगार, वजनदार निघण्यासाठी राईपनरसोबत न्युट्राटोन वापरतो. तसेच परागीभवनासाठी प्रोटेक्टंट घेतो. यासर्वांमुळे फलधारणा चांगल्या प्रकारे होऊन शेंगा हिरव्यागार, वजनदार मिळतात.

नोव्हेंबरमध्ये सुरुवातीला ४० - ५० किलो शेंगा ४ थ्या दिवशी निघाली. पुढे तिसऱ्या दिवशी १०० किलो अशी वाढत जाऊन डिसेंबरमध्ये २०० किलो शेंगा निघू लागल्या. जानेवारीत ३०० किलो निघू लागल्या. फेब्रुवारी - मार्चमध्ये याच पद्धतीने ३०० ते ५०० किलोपर्यंत शेंगा तोड्याला (३ ऱ्या दिवशी) निघत होत्या. चालूवर्षी भाव कमी होता. तरी इतरांना ७ - ८ रु. भाव असताना आम्हाला १० - ११ रु./किलो भाव मिळत होता. आतापर्यंत (एप्रिल २०१७ अखेर) या बहाराचा एकूण १० टन माल विकला आहे. जाऊन तोडे चालू आहेत.

शेंगाची काढणी सकाळी ७ वाजता सुरू करतो. घरची ३ माणसे ९.३० - १०.० वाजेपर्यंत ३०० किलो शेंगा काढतात. शेंगा काढल्यानंतर सावलीला तळवटावर ठेवून शेंगावर पाणी मारतो आणि हडपसर मार्केटला पाठविण्यासाठी २ किलोचे व पुणे गुलटेकडी मार्केटला पाठविण्यासाठी २ किलोचे व पुणे गुलटेकडी मार्केटला पाठविण्यासाठी ५ किलोचे बंडल बांधतो. हे बंडल बांधून झाल्यावर पोत्यात भरतो व पोटे शिवतो. हे काम दुपारी २ वाजेपर्यंत पुर्ण होते. मग २ वाजता शेंगा भरलेल्या पोत्यावर पाणी मारतो. त्यानंतर २ - २ तासांनी म्हणजे ४ वाजता आणि पुन्हा ६ वाजता असे एकूण ३ वेळा पाणी मारून लगेच गाडीत भरून रात्री ७ - ८ वाजता गाडी मार्केटला रवाना होते. या पद्धतीमुळे शेंग बाजारात हिरवीगार व टवटवीत राहते. आपली शेंग १।। - २ फुट लांबीची एकसारख्या जाडीची, गरबाज, वजनदार हिरवीगार, टवटवीत असल्याने बाजारात पहिल्यांदा आपली शेंग विकली जाते.

बाजारामध्ये जर ७ - ८ रु. भाव असला तर आम्हाला ९-१०-११ रु./किलो असा भाव मिळतो. एका किलोमध्ये १५ - १६ शेंगा बसतात.

सरासरी १० टन माल (शेंगा) १० रु. किलोप्रमाणे विकून एप्रिल २०१७ अखेर भाव कमी असूनही १ लाख रु. झाले आहेत. अजाऊं मे मध्ये माल वाढला असून २ - ३ दिवसाआड ५०० - ६०० किलो शेंगा मिळत आहेत. तसेच शेंग उत्कृष्ट दर्जाची असल्याने भाव १० - १२ रु. किलो असताना आम्हाला २० रु. किलो भाव मिळत आहे.

त्यामुळे मी महिन्यात ५० - ६० हजार रु. चा शेवगा होईल. त्यानंतर पुन्हा छाटणी करून तिसऱ्या बहाराचे वरीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी ने नियोजन करणार आहे.

यावरील माझी मुलाखत डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीच्या (www.drbawasakar.com) वेबसाईटवरील 'पहाट' या सदरात यु टुबवर (Episode - ४०) प्रसारीत झाली आहे. ती आपणास उद्बोधक ठरेल.