पालकाची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


पालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून भारतातील सर्वच राज्यांत या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करतात. तसेच ह्या भाजीला सतत मागणी असते. विशेष म्हणजे या भाजीचे उगमस्थान भारत व चीन हे देश आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. पालकातील पोषणमूल्ये लक्षात घेता याची लागवड मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. उत्तर भारतात या भाजीची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातही मोठ्या शहारांच्या आसपास पालकाची लागवड जवळजवळ वर्षभर केली जाते.

* महत्त्व : पालकाच्या भाजीत 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच प्रथिने (प्रोटीन्स) आणि चुना (कॅल्शिअम), लोह, फॉस्फरस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी, पराठे इत्यादींमध्ये करतात. पालकाची भाजी काही प्रमाणात सारक आहे. पालकाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालील अन्नघटक असतात.

पाणी - ८६%, कार्बोहायड्रेट्स - ६.५% , प्रोटीन्स - ३.४%, फॅट्स - ०.८%, तंतुमय पदार्थ - ०.७%, खनिजे - २.२%, फॉस्फरस - ०.०३%, कॅल्शियम - ०.१३८%, लोह - ०.०२%, जीवनसत्त्व 'क' - ०.००७%, जीवनसत्त्व 'अ' - ९,७७० इंतरनॅशनल युनिट, उष्मांक - २६%

* हवामान आणि जमीन : पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्यामुळे महाराष्ट्रात कडक उन्हाळ्याचे १ - २ महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्पादन जास्त येऊन दर्जा चांगला राहतो, तर तापमान वाढल्यास पीक लवकर फुलोऱ्यावर येणे आणि दर्जा खालावतो.

पालकाचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. हलक्या जमिनीत पीक चांगले येते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत, तेथे पालक घेता येतो. महाराष्ट्रात सुमारे १,४०० हेक्टर क्षेत्रावर पालकाची लागवड केली जाते.

* जाती : पालकाचे अनेक स्थानिक वाण असून त्यांचा वापर निरनिराळ्या भागात करतात. पालकाचे काही सुधारित वाण पुढीलप्रमाणे आहेत.

१) ऑलग्रीन : पालकाचा हा वाण भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आला आहे. या वाणीची पाने सारख्या आकाराची, कोवळी आणि हिरवी असतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी १२.५ टन इतके येते. हिवाळी हंगामातील लागवडीत १५ ते १८ दिवसांच्या अंतराने ३ - ७ वेळा पानांची कापणी करता येते. तसेच बियाण्याचे उत्पादन हेक्टरी सुमारे ८ - १० क्विंटल मिळते.

२) पुसा ज्योती : पालकाचा हा नवीन वाण दिल्ली येथे विकसित करण्यात आला आहे. या वाणाची पाने मोठी. जाड, लुसलुशीत, कोवळी, ज्योतीच्या आकाराची असून त्यामध्ये पोटॅ शियम, कॅल्शियम, सोडियम, लोह आणि 'क' जीवनसत्त्वाचे ऑलग्रीन या वाणापेक्षा जास्त असते. हा वाण चांगल्या प्रकारे येतो. या वाणाच्या पानांचे उत्पादन हेक्टरी १५ टनांपर्यंत मिळते. बियाण्याचे उत्पादन हेक्टरी १० - १२ क्विंटल मिळते.

३) पुसा हरित : हा वाण भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आला आहे. हा वाण जोमदार उभट वाढतो. या वाणाची पाने हिरवी, लुसलुशीत जाड आणि भापूर प्रमाणात येतात. या वाणाच्या पानांच्या ३ - ४ कापण्या मिळतात आणि हा वाण लवकर फुलावर येत नाही. ह्या जातीची लागवड सप्टेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत करता येते. या वाणाचे उत्पादन हेक्टरी १० टनापर्यंत मिळते.

४) जॉबनेर ग्रीन : हा वाण राजस्थानमध्ये स्थानिक वाणांतून निवड पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. पाने मोठी, जाड, कोवळी लुसलुशीत असतात. पानाला उग्र वास असून उत्पादन जास्त मिळते.

* लागवडीचा हंगाम व बियाण्याचे प्रमाण :

महाराष्ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळ जवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून- जुलै आणि हंगामातील लागवड सप्टेंबर - ओक्टोबरमध्ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी १० - १५ दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने बियाण्याची पेरणी करावी. एक हेक्टर क्षेत्रासाठी २५ - ३० किलो बियाणे लागते. पालकाचे आंतरपीक घेतल्यास बियाण्याचे प्रमाण कमी लागते.

* बीजप्रक्रिया : १० लि. पाण्यात २५० मिली जर्मिनेटर या प्रमाणात घेऊन त्यामध्ये १० किलो बियाणे या प्रमाणात घेवून ते रात्रभर भिजवून पेरावे. त्यामुळे उगवण कमी दिवसात ८० ते १००% होऊन मर रोगाला प्रतिबंध होतो.

* लागवड पद्धती : पालक हे कमी दिवसांत तयार होणारे पीक असल्यामुळे जमिनीच्या मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फोकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्यास वाफसा आल्यावरच पेरणी करावी. बी ओळीत पेरताना दोन ओळींत २५ - ३० सेंटिमीटर अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्यास पिकाची वाढ कमजोर होऊन पानांचा आकार लहान राहतो आणी पिकांचा दर्जा खालावतो.

* खते आणि पाणी व्यवस्थापन : पालक हे कमी कालावीचे पीक असले तरी हिरव्या टवटवीत पानांवर पिकांचे उत्पादन व प्रत अवलंबून असल्यामुळे पालकाच्या पिकाला कल्पतरू एकरी ४० ते ५० किलो बी टाकते वेळी देऊन मातीआड करावे.

पानांतील हिरवेपणा अधिक चांगला येऊन उत्पादन वाढविण्यासाठी बी उगवून आल्यानंतर १० ते १५ दिवसांनी सप्तामृताच्या फवारण्या कराव्यात. बियांच्या पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे. वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्यानंतर पिकाला नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात पालकाच्या पिकाला १० - १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. काढणीच्या २- ३ दिवस आधी पिकाला पाणी द्यावे. त्यामुळे पाने टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो. आवश्यकतेनुसार तणांचे नियंत्रण खुरपणी करून करावे.

* महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण : पालकावर मावा व पाने कुरतडणारी अळी आणि भुंगेरे ह्यांचा उपद्रव होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी पीक लहान असतानाच १० लि. पाण्यात सप्तामृतासोबत २० मिली स्प्लेंडर मिसळून ८ - १० दिवसांच्या अंतराने फवारावे.

पालकावर मर रोग, पानांवरील ठिपके, तांबेरा आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. मर रोगामुळे उगवण झाल्यावर रोपांची मर होण्यास सुरुवात होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा आणि पेरणीपुर्वी बियाण्यावर जर्मिनेटरची प्रक्रिया करावी. हवेतील आर्द्रता वाढल्यास पानांवर गोल करड्या रंगाचे, बांगडीच्या आकाराचे ठिपके पडतात. या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर (प्रत्येकी ५० मिली) आणि हार्मोनी ३० मिली किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशकाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड १० लि. पाण्यात २० ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

केवडा आणि तांबेरा रोगांचा फारसा उपद्रव होत नाही आणि शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्यास या रोगांना आळा बसतो. तसेच गंधकयुक्त आणि हार्मोनी या बुरशीनाशकांची फवारणी केल्यास या रोगाचे नियंत्रण होते. तरी वरील किडी व रोगांवर प्रतिबंधक उपाय आणी पिकाच्या लवकर वाढीसाठी खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर ७ ते ८ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + स्प्लेंडर २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर २१ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर १५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + हार्मोनी २५० मिली. + स्प्लेंडर २५० मिली. + १५० लि.पाणी.

पहिल्या कापणीनंतर तिसऱ्या दिवशी एक फवारणी आणि १० - १२ दिवसांनी दुसरी अशा किमान २ फवारण्या (खोडव्याला) घ्याव्यात. म्हणजे कमी कालावधीत रसरशीत, पल्लेदार पालक मिळेल.

* काढणी, उत्पादन आणी विक्री : पेरणीनंतर सुमारे १ महिन्याने पालक कापणीला तयार होतो. पालकाची पुर्ण वाढलेली हिरवी, कोवळी पाने २० ते २५ सेंटिमीटर उंचीची झाल्यावर पानांच्या देठाचा जमिनीपासून ५ ते ७.५ सेंटिमीटर भाग ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्यावा आणि पानांच्या जुड्या बांधाव्यात. त्यानंतर दर १५ दिवसांच्या अंतराने जातीनुसार ३ - ४ किंवा त्यापेक्षा जास्त खुडे करावेत, कापणी करतानाच खराब पाने वेगळी काढून जुड्या बांधाव्यात. काढणीनंतर पालक लगेच बाजारात पाठवावा, जुड्या उघड्या जागेत रचून वरून झाकून घेवून किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये अगर पोत्यांमध्ये व्यवस्थित रचून वरून झाकून घेवून किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये अगर पोत्यांमध्ये व्यवस्थित रचून भरून विक्रीसाठी पाठवाव्यात. पालकाचे उत्पादन पिकाच्या लागवडीची वेळ, जात, खुडे आणि पिकाची योग्य काळजी ह्यांवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे हेक्टरी १० - १५ टन एवढे उत्पादन मिळते. शिवाय बियाण्याचे उत्पादन १.५ टनांपर्यंत मिळू शकते.