बी.टी. कपाशी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस हे एक महत्त्वाचे पीक आहे. भारतातील ६ कोटी लोकांचा कापूस शेती व कापसावर आधारीत उद्योगांमध्ये रोजगार मिळतो. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनात कापूस पिकाचे महत्त्वाचे स्थान आहे. देशातील एकूण कृषी उत्पन्नाच्या २८.८% वाटा कपाशीचा आहे.

जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. जगामध्ये कपाशीची उत्पादकता ७२५ कि. ग्रॅ. प्रति हे. आहे भारत देशामध्ये सन २०१० - २०११ हंगामामध्ये कापूस पिकाचे ११० लाख हेक्टर क्षेत्र होते. या वर्षामध्ये ३२५ लाख गाठी रुईचे उत्पादन झाले. म्हणजेच गेल्या हंगामामध्ये कापूस पिकाची भारतातील उत्पादकता ५०३ कि. ग्रॅ. रुई प्रति हेक्टर आली. (उत्पादन व उत्पादकता अंदाजित ) महाराष्ट्रा राज्यामध्ये कापूस पिकाची सन २०१० -११ मध्ये ४० लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. या हंगामामध्ये राज्यामध्ये ७६.७३ लाख गाठी रुई उत्पादन होऊन उत्पादकता ३२९ कि. ग्रॅ. प्रति हेक्टर आढळून आली. सन २००८ -०९ मध्ये देशातून ३५ लाख गाठींची निर्यात करण्यात आली. त्याचे मूल्य ३.८४ हजार कोटी असून, सन २०१० -११ मध्ये ४९.५० लाख गाठींची निर्यात झाल्याचा अंदाज भारतीय कापूस मंडळाद्वारे व्यक्त करण्यात आला.

कपाशीवरील बोंडअळ्यांच्या प्रादुर्भावामुळे होणार्‍या वाढीव किटकनाशकांच्या वापरामुळे कापूस उत्पादनामध्ये आर्थिक समस्या उद्भवली होती. तथापि सन २००२ मध्ये बी. टी. कापूस लागवडीसाठी भारतामध्ये उपलब्ध झाल्यामुळे बोंडअळ्यांचे परिणामकारक व्यवस्थापन, झाडावर वाढीव बोंडधारणा, किटकनाशकांच्या खर्चामध्ये,कपात अधिक आर्थिक उत्पन्न पर्यावरणातील अन्य किटकांवर विपरीत परिणाम न होता मिळाते. देशातील बी.टी. कपाशीखालील क्षेत्र सन २००९ -१० मध्ये ८३.८१ लाख हे. (६९%) पर्यंत पोचले आहे, तरी महाराष्ट्रातील बी.टी. कापसाचे क्षेत्र ३३.९६ लाख हे. (राज्यातील एकूण क्षेत्राच्या ९७%) आहे. बी.टी. तंत्रज्ञानामुळे भारतातील कपाशीच्या उत्पादकतेमध्ये सन २००२ -०३ मधील ३०८ कि.ग्रॅ./हे. वरून ५०३ कि.ग्रॅ. प्रति हे. पर्यंत वाढ झाली आहे. त्याचबरोबर भारताच्या उत्पादकतेच्या प्रमाणात महाराष्ट्राची उत्पादकाता (३२९ कि.ग्रॅ./हे.) अत्यंत कमी आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू लागवड, पावसाची अनियमितता, रस शोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव, पाने लाल होणे ही राज्याची उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर अयोग्य जातींची निवड, योग्य लागवड तंत्राचा अभाव व अयोग्य पीक संरक्षण ही व्यवस्थापनाशी संबंधीत प्रमुख कारणे आहेत. या बाबींचा शास्त्रीय पद्धतीने अवलंब केल्यास कापूस उत्पादनात सातत्यपूर्वक वाढ व फायदेशीर उत्पन्न मिळेल.

जमिनीची निवड : कपाशीचा कालावधी अधिक असल्यामुळे व कपाशीची मुळे खोलपर्यंत जात असल्यामुळे कापूस पिकाची लागवड मध्यम ते भारी जमिनीत करावी. जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्यास त्याचा पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. त्याकरिता जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. हलक्या जमिनीमध्ये कापूस पिकाची उत्पादकता कमी येते. कापूस पीक लागवडीसाठी जमिनीची खोली किमान ६० ते १०० सें.मी. असावी. कपाशीचे पीक आशिक ओलावा व चिबाड परिस्थिती तग धरू शकत नाही. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ असावा.

हवामान : कापूस पिकाच्या योग्य वाढीसाठी वार्षिक सरासरी तापमान १६ डी. सें. पेक्षा जास्त, कोरडवाहू लागवडीसाठी सरासरी पाऊस ५०० मि.मी. पेक्षा अधिक, बोंडे लागणे व फुटण्याच्या अवस्थेत प्रखर सूर्यप्रकाश व पिकाच्या कालावधीत धुके विरहीत हवामान आवश्यक असते.

कपाशीची उगवण चांगली होण्यासठी किमान १६ डी. से. तापमानाची आवश्यकता असते. पिकाच्या वाढीसाठी २१ डी ते २७ डी सें. तापमान मानवते. बोंडे लागणे व पक्व होण्यासाठी दिवसाचे तापमान २६ डी. ते ३२ डी. सें. व रात्रीचे थंड तापमान असते.

जमिनीची मशागत : जमिनीमध्ये तयार झालेला कठीण थर फोडण्यासाठी नांगरणी केली जाते. भारी काळ्या जमिनीमध्ये हरळीच्या काशा असतात. अशा काशा नांगरणीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावर येतात व उन्हामुळे वाळतात. काही किडींच्या सुप्तवस्था जमिनीमध्ये पूर्ण होतात. किडींच्या कोषरूपाने जमिनीमध्ये असलेल्या सुप्तावस्था उष्णतेने नष्ट होतात किंवा पक्षी त्यांना भक्ष्य बनवतात. लोडणी केल्यामुळे ढेकळे फुटतात. यानंतर दोन आठवड्यांच्या अंतराने २ -३ वखरणी कराव्यात.

जमिनीच्या मशागती बाबत संवर्धित मशागत व किमान मशागत या दोन पद्धतींचा अवलंब अलीकडे करण्यात येतो. संवर्धित मशागत पद्धतीमध्ये पिकांचे अवशेष, पाला - पाचोळा इ. पदार्थ जमिनीवरच राहिल्यामुळे पावसाचे पाणी मातीमध्ये मुरण्याचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर मातीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन कमी होते.

किमान मशागत पद्धतीमध्ये मशागतीच्या पाळ्यांची संख्या कमी करून तणनाशकांच वापर केला जातो. यामुळे नष्ट होणारी तणे मातीमध्ये सेंद्रिय पदार्थांची भर घालतात. या पद्धतीमुळे मशागतीच्या खर्चात कपात होऊन मातीच्या गुणधर्मात सकारात्मक फरक होते असल्याचे आढळून आले आहे.

सेंद्रिय खतांचा वापर : शेवटच्या वखरपाळीपूर्वी कोरडवाहू लागवडीसाठी ५ टन (१० -१२ गाड्या) शेणखत व बागायती लागवडीसाठी १० टन (२० -२५ गाड्या) चांगले कुजलेले शेणखत / कंपोस्ट खत शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. गांडूळ खत उपलब्ध असल्यास प्रति हेक्टर २.५ टन गांडूळ खत, शेणखत / कंपोस्ट खतासोबत मिसळून घ्यावे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोट. सुधारतो, जलधारणशक्ती वाढते. जमिनीमध्ये हवा खेळती राहते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते आणि अन्नद्रव्या उपलब्ध व विद्राव्य करून देणार्‍या जीवाणूंची संख्य वाढण्यास मदत होते, सेंद्रिय खतांमुळे पीक किडी व रोगांना प्रतिकारक्षम बनते. सेंद्रिय खतांमुळे प्रामुख्याने लोह, बोरॉन, मॅग्नेशिअम, झिंक इत्यादी सूक्ष्म मुलद्रव्यांचे प्रमाण वाढते.

पिकांची फेरपालट : कोरडवाहू क्षेत्रामध्ये कापूस पिकानंतर पुढील वर्षी ज्वारी,सोयाबीन, मूग किंवा उडीद अशी फेरपालट करणे आवश्यक आहे. बागायती लागवडीमध्ये कपाशीची पेरणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येते. त्याचबरोबर बी.टी. कापूस वेचणी लवकर येत असल्यामुळे बी. टी. कपाशीनंतर पुढील हंगामात गहू, उन्हाळी भुईमूग अशी पीक पद्धती फायदेशीर आहे.

एकाच जमिनीत सतत एकाच पिक घेतल्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट येते. मातीतील त्याच खोलीतून अन्नद्रव्यांचे पिकाद्वारे शोषण झाल्यामुळे त्या खोलीवर उपलब्ध मूलद्रव्यांचे प्रमाण कमी होते. याशिवाय त्या पिकावर प्रादुर्भाव करणार्‍या किडी मातीमध्ये सुप्तावस्थेत राहतात. पुढील हंगामामध्ये पुन्हा तेच पिक घेतल्यास त्या किडींचा पुन्हा प्रमाणावर प्रादुर्भाव वाढतो.

जमिनीची सुपिकता टिकवून ठेवणे, शेतीची उत्पादकता वाढविणे व उत्पादनातील शाश्वतता राखण्यासाठी पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे आवश्यक आहे.

पीक पद्धतीचा प्रकार (निखळ पीक, मिश्र पीक, आंतर पीक) पावसाचे प्रमाण, हंगामाचा कालावधी, जमिनीचा प्रकार इत्यादीवर अवलंबून असतो.

वाणांची निवड : सद्यस्थितीत बाजारात अनेक बी.टी. कपाशीचे वाण उपलब्ध आहेत. यापैकी कोणता वाण निवडावा याबाबत संभ्रम हो आहेत. बी.टी. कपाशीचा वाण निवडतांना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा.

१) रस शोषण करणार्‍या किडींना सहनशील / प्रतिकारक्षम संकरित वाण असावा.

२) पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा.

३) रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा वाण निवडण्यात यावा.

४) बोंडाचा आकार मोठा व चांगला फुटणारा वाण असावा.

५) धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा, ज्यामुळे कपाशीला बाजारभाव चांगल मिळू शकेल.

६) शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशीरा लागणार्‍या बोंडाचा सुद्धा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते.

७) कोरडवाहू लागवडीमध्ये मुळांची लांबी जास्त असणारा वाण निवडावा.

८) बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण घेण्यात यावे.

९) पुनर्बहार क्षमता असणारा वाण निवडावा. आपला मागील हंगामातील अनुभव अथवा आपण स्वत : अन्य शेतकर्‍यांच्या शेतावरील अनुभव पाहून बी.टी. कपाशीच्या वाणाची निवड करण्यात यावी.

पेरणीची वेळ: ओलिताखालील कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करावी कोरडवाहू कापूस पिकाची पेरणी मान्सूनचा चार इंच पाऊस पडल्यानंतर करावी. पेरणी लवकर करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ३० जून नंतर पेरणी करू नये. यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. पेरणीस एक आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात एक क्विंटलपर्यंत घट होऊ शकते.

पेरणीचे अंतर : बी.टी. कपाशीमध्ये वाढणार्‍या बोंडांकडे, अन्नद्रव्यांचे वहन होते असल्यामुळे झाडाची जमिनीत समांतर वाढ कमी होत असून फळफांद्यांची लांबी कमी झाल्याचे आढळून येत आहे. यामुळे बी. टी. कपाशीची लागवड कमी अंतरावर करून हेक्टरी झाडांची संख्या वाढविणे शक्य झाले आहे.

बी.टी. कपाशीच्या लागवडीच्या अंतरसाठी घेण्यात आलेल्या प्रयोगांच्या दोन वर्षाच्या निष्कर्षावरून असे स्पष्ट होते की, कोरडवाहू लागवडीमध्ये बी.टी. कपाशीची लागवड १२० सें.मी. x ४५ सें.मी. (४' x १.५') अंतरावर करावी. कोरडवाहू लागवडीमध्ये दोन ओळीतील अंतर वाढविल्यास उत्पादनात घट येते असे सिध्द झाले आहे. कापूस लागवडीमध्ये हेक्टरी झाडांच्या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कोरडवाहू लागवडीमध्ये हेक्टरी १८,१५० (एकरी ७२६०) झाडे राहतील याची काळजी घ्यावी.

बागायती लागवडीमध्ये कपाशीचे अंतर १५० सें.मी. x ६० सें.मी. (५ x २ फुट ) ठेवल्यास सरस उत्पादन मिळाल्याचे आढळले आहे. कपाशीच्या ओळीमधील अंतर वाढवून दोन झाडांमधील अंतर कमी केल्यामुळे हेक्टरी झाडांची संख्या समान राखली जाते. त्याचबरोबर ओळीतील अंतर वाढल्यामुळे झाडांमध्ये सुर्यप्रकाश व हवा खेळती राहिल्यामुळे बोंडे लागणे व पक्क होण्यास फायदा होते.

बी.टी. कपाशीची पेरणी टोकण पद्धतीने करावी. एका ठिकाणी एक सरकी टोकावी. ज्या ठिकाणी उगवण कमी असेल त्या ठिकाणी दहा दिवसांनी गॅप भरून घ्यावी.

पेरणी करतान पॉलिथीनच्या पिशवीमध्ये किंवा पानांपासून तयार केलेल्या मोठ्या आकाराच्या द्रोणांमध्ये सरकी टोकून रोपे तयार केल्यास त्याचा गॅप भरण्यास उपयोग होईल व रोपांची वाढ सारखी असेल. गॅप भरण्याच्यावेळी उगवण होण्यासारखी ओल जमिनीमध्ये नसल्यास हेक्टरी रोपांची संख्या कमी राहते. अशा परिस्थितीमध्ये विरळप्रमाणे रोपे तयार केल्यास हेक्टरी रोपांची संख्या निश्चितपणे राखता येईल.

बी.टी. कपाशीमध्ये आश्रयात्मक (रेफ्यजी) ओळी लावणे :

बोंडअळ्यांनी बी.टी. कापसाच्या झाडांवर प्रादुर्भाव केल्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पुढील पिढ्यांमध्ये बी.टी. प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होण्याची शक्यात आहे. तर बोंडअळ्यांचा बी.टी. कापसाच्या बरोबरच विना बी. टी. कपाशीला प्रादुर्भाव झाला तर त्यांच्यामध्ये बी.टी. प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होणार नाही. म्हणून बी.टी. कपाशीच्या पॅकेटमध्ये देण्यात आलेले बी.टी. विरहीत कपाशीचे बियाणे बी.टी. कापसाच्या सर्व बाजुने पाच ओळींमध्ये लावणे आवश्यक आहे.(यास आश्रयात्मक ओळी असे म्हणतात. ) यामुळे बोंडअळ्यांमध्ये बी.टी. टॉंक्सीन विरुध्द प्रतिकारशक्ती तयार होण्यास अटकाव होईल. बरेच शेतकरी बी.टी. विरहीत काही ओळीमुळे चालु हंगामातील उत्पादन कमी होईल म्हणून बी.टी. विरहीत बियाण्याचा वापर करीत नाहीत असे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परंतु बी.टी. कपाशीच्या उत्पादकतेतील शाश्वततेसाठी बी.टी. कापशिसोबत बी.टी. विरहीत बियाणे लावणे आवश्यक आहे.

बी.टी. कपाशीच्या सभोवती बी.टी. विरहीत कपाशीच्या पाच आश्रयात्मक ओळी लावण्याच्या ऐवजी बी.टी. कपाशीमध्ये तुरीच्या ओळी आंतरपीक म्हणून घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून तुरीचादेखील बोंडअळ्यांमधील बी.टी. विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होण्यास प्रतिबंध होईल.

बियाण्याचे प्रमाण : बी.टी. कपाशीचे प्रति हेक्टरी २.५ कि. ग्रॅ. बियाणे लागते.

बीजप्रक्रिया : कपाशीमध्ये किडी, रोग व अन्नद्रव्य व्यावास्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. यासाठी पुढीलप्रमाणे बीजप्रकिया कराव्यात.

१) जर्मिनेटर २५ ते ३० मिली + १० ग्रॅम प्रोटेक्टंट + २५० मिली पाणी या द्रावणात १ किलो बी कालवून घ्यावे. म्हणजे उगवण लवकर व अधिक होईल.

२) बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास इमिडाक्लोप्रीड या किटकनाशकाची प्रक्रिया सामन्यात : केलेली असते, नसल्यास इमिडाक्लोप्रीड/ थायोमिथाक्झाम या किटकनाशकाची ७.५ ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रकिया करावी. यामुळे रस शोषणार्‍या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

आंतरपिके : बी. टी. कपाशीमध्ये मूग, उडीद, सोयाबीन व तूर या पिकांचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव केल्यास फायदेशीर उत्पन्न मिळते. कपाशीच्या ६ ओळीनंतर तुरीची १ ओळ किंवा कपाशीच्या ८ ओळीनंतर तुरीच्या २ ओळी घेणे ही आंतरपीक पद्धती महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. त्याचबरोबर मुग, उडीद व सोयाबीन यापैकी कोणतेही एक पीक बी.टी. कपाशीमध्ये १:१ या समप्रमाणात घेण्यात यावे.

कपाशीचे पीक निखळ घेण्याऐवजी त्यामध्ये आंतरपिके घेतल्यास त्या क्षेत्रापासून मिळणारे सकल व निव्वळ आर्थिक उत्पन्न निखळ कपाशीपेक्षा अधिक मिळते. शिवाय आंतरपिकांमुळे जमिनीची धूप कमी होते. आंतरपिकांच्या ओळी जमिनीच्या उतारास आडव्या घेण्यात येतात. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीवरून वाहताना त्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीमध्ये मुरण्याचे प्रमाण वाढते. कडधान्ये आंतरपीक म्हणून घेतल्यास त्यांच्या मुळांवर असणार्‍या गाठींमधील जीवाणु सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात. अशा पद्धतीने कडधान्ये अल्प प्रमाणात नत्राचा पुरवठा करतात, कडधान्यवर्गीय पिकांची पाने काढणीच्या वेळी गळतात. त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. आंतरपिके जमिनीवरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी करतात. आंतरपिकांचा उपयोग आच्छादनासारखा करता येतो.

कपाशीच्या लागवडीमध्ये ओळीतील अंतर शिफारशीपेक्षा जास्त ठेवल्यास दोन ओळींमध्ये आंतरपिकाची आणखी एक ओळ वाढवून आंतरपिकाच्या रोपांची संख्या वाढविलयास त्या क्षेत्रापासून अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते. सोयाबीन हे आंतरपीक घेताना लवकर पक्क होणारा वाण निवडावा.

अन्नद्रव्य व्यवस्थापन : बी.टी. कपाशीमध्ये सुरुवातीच्या बहाराचे रूपांतर बोंडामध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. फुले व बोंडे गळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे उत्पादनात वाढ होत आहे. अधिक उत्पादनाच्या प्रमाणात पिकाची अन्नद्रव्याची गरज देखील पुर्ण करणे आवश्यक आहे. शिवाय बी. टी. कपाशीमध्ये अन्नद्रव्ये शोषणाचे प्रमाण विना बी. टी. कपाशीपेक्षा अधिक असल्याचे आढळत आहे. विना बी. टी. कापूस पिकापेक्षा बी. टी. कापूस खतांच्या वाढीव मात्रेस फायदेशीर प्रतिसाद देत असल्याचे निष्कर्ष मिळत आहेत. कोरडवाहू व बागायती बी. टी.कापूस पिकास खतांच्या मात्रा देण्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.

कोरडवाहू : मराठवाड्यात कोरडवाहू लागवडीमध्ये बी. टी. कापूस पिकास १२० : ६० : ६० कि. ग्रॅ. नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर देण्यात यावे. कोरडवाहू लागवडीमध्ये ५० % नत्र पेरणीच्या वेळी व उर्वरीत ५०% नत्र एक महिन्यानंतर विभागून देण्यात यावे. संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळीस द्यावे.

बागायती : बागायती लागवडीमध्ये बी. टी. कापशीसाठी १५० : ७५ : ७५ नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर दिल्याने अधिक फायदेशीर उत्पन्न मिळाले आहे. यापैकी पेरणीच्या वेळी २०% नत्र, संपुर्न स्फुरद व पालाशची मात्रा द्यावी. उर्वरीत नत्रापैकी ४०% नत्र एक महिन्यानंतर व ४० % नत्राची मात्रा दोन महिन्यानंतर द्यावी.

कल्पतरू सेंद्रिय खत : बी लागवडीच्यावेळी प्रत्येक ठिकाणी ५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत मातीआड करून त्यावर बी टोकावे. नंतर पहिली खुरपणी झाल्यावर एकरी १०० किलो कल्पतरू खत द्यावे. बागायती कापसास फुलपात्या लागतेवेळी पुन्हा एकदा एकरी १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. हे खत दिल्यामुळे वरील रासायनिक खताच्या मात्रेत ५० % बचत होते असे प्रयोगावरून आढळून आले आहे.

सूक्ष्म मुलद्रव्ये : बी. टी. कपाशीस रासायनिक खतांच्या मात्रेबरोबरच काही सूक्ष्म मुलद्रव्याची आवश्यकता असते. याकरिता मातीमध्ये मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन यापैकी एखाद्या मुलद्रव्याची कमतरता असल्यास मॅग्नेशियम सल्फेट १५ ते २० कि. ग्रॅम / हेक्टर , झिंक सल्फेट १५ ते २० रॅम / हेक्टर, बोरॉन ५ कि. ग्रॅम/ हेक्टर आवश्यकतेनुसर जमिनीतून द्यावेत. सुक्ष्म मुलद्रव्ये शेणखतामध्ये मिसळून पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर एक महिन्यातच द्यावीत. रासायनिक खतासोबत सुक्ष्म मुलद्रव्ये देऊ नयेत.

सप्तामृत फवारणी :


१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ कॉटन थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ कॉटन थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी) : कॉटन थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी) : कॉटन थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ३०० मिली + २०० लि. पाणी.

५) पाचवी फवारणी : (९० ते १०५ दिवसांनी) : कॉटन थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली + २०० लि. पाणी.

तण नियंत्रण व आंतर मशागत : कपाशीचे पिकात तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात ७० - ८० % घट होते असे प्रयोगाअंती आढळून आले आहे. कपाशीमध्ये तण स्पर्धेचा कालावधी पेरणीनंतर ६० दिवसांपर्यंत असतो. यामुळे पेरणीपासून दोन महिन्यापर्यंत पीक तणमुक्त ठेवावे.

तण नियंत्रण व जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी कपाशीचे पिकाच आंतर मशागत करणे अगत्याचे आहे. याकरीता पहिली खुरपणी पीक ३ आढवड्याचे असतांना करावी व लगेच कोळपणी करावी. यानंतर ६ आठवड्यानंतर दुसरी निंदणी व कोळपणी करावी. पिकास दोन खुरपणी / तणनाशकाची फवारणी करतान जमीन ओलसर असावी. फवारणीस वापरण्यात येणार्‍या नॅपसॅक पंपाला फ्लॅत फॅन नोझल किंवा फ्लडजेट नोझल लावून जमिनीवर समप्रमाणात फवारावे. फवारणी वार्‍याच्या दिशेने करावी. कपाशीमध्ये मूग, उडीद, सोयाबीन यापैकी आंतरपिकाचा समावेश असल्यास पेंडीमिथॅलीन हे तणनाशक वापरावे. तणनाशके फवारण्यापुर्वी पीक परिस्थिती, ताणांचा प्रकार, कालावधी, तणनाशकाचा प्रकार व प्रमाण यांचा याग्य वापर होण्यासाठी व अपेक्षित रिझल्ट मिळण्यासाठी तज्ज्ञांन सल्ल्या घ्यावा.

अ. क्र.   तणनाशक   मात्रा/ हेक्टर   व्यवसायिक नाव व मात्रा / हेक्टर   पाण्याचे प्रमाण (लि.)   फवारणीची वेळ  
१   पेंडीमॅथॅलीन   ०.७५   स्टॉंम्प (२.५ लिटर)   १०००   लावणीनंतर परंतु बियाणे उगवणीपूर्वी  
२   डायुरॉन   ०.५०   क्लास किंवा कारमेक्स (६२५ ग्रॅम)   १०००   लावणीनंतर परंतु बियाणे उगवणीपूर्वी  
३   फप्युक्लोरॅलीन   ०.९०   बासालीन ( २ लिटर)   १०००   पेरणीपूर्वी ओलसर जमिनीवर फवारावे
व वखराच्या पाळीने जमिनीमध्ये मिसळून  
४   ऑक्झीफ्लोरोफेन   ०.१००   गोल (४२५ मिली)   १०००   पेरणीनंतर परंतु बियाणे उगवणीपूर्वी  


वरीलप्रमाणे कोणत्याही एक तणनाशकाचा वापर केल्यास द्विदल वर्गीय तणांचे ४ आठवड्यापर्यंत उत्तम रीतीने नियंत्रण होते. तणनाशक वापरल्यास पेरणीनंतर ६ आठवड्यानंतर एकदल वर्गीय तणांचे नियंत्रण करण्यासाठी निंदणी व ३ - ४ कोळपण्या कराव्यात.

कपाशीची खुरपणी / निंदणीच्यावेळी मजुरांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता नसणे व मजुरीचे वाढलेले दर यामुळे निंदणीचे काम अत्यंत जिकिरीचे व आर्थिक दृष्ट्या खर्चिक होत आहे. शिवाय या काळात पावसाची रिमझिम चालू असल्यास वापसा नसल्यामुळे निंदणीचे काम लांबणीवर पडते. त्यामुळे तणनाशकांचा वापर केल्यास तण नियंत्रण परिणामकारक व किफायतशीर होते. याकरिता पुढीलपैकी कोणत्याही एका तणनाशकाचा वापर करावा. एक निंदणी व कोळपणी करावी, वरीलपैकी कोणत्याही एका तणनाशकाचा वापर करावा.

मुलस्थानी जलसंधारण : शेवटच्या कोळपणीच्यावेळी कोळप्याच्या जानोळ्यास दोरी / पोते बांधून उतारास आडव्या सर्‍या पाडाव्यात. यामुळे झाडांना मातीची भर देता येते व शेवटच्या पावसाचे पाणी जमिनीमध्ये अधिक प्रमाणात मुरते. याचा फायदा कपाशीची बोंडे पक्व होण्यासाठी होतो. पीक ७० ते ८० दिवसांचे झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तसेच पुढील काळात या सर्‍यांचा उपयोग पाणी देण्यासाठी होतो. या सर्‍या जमिनीच्या उतारास आडव्या पाडाव्या. त्यामुळे मातीची धुप कमी होते व जास्तीत - जास्त पाणी जमिनीत मुरते.

पाणी व्यवस्थापन : सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध जाती वेगवेगळ्या कालावधीमध्ये पक्व होतात. त्याचबरोबर कापूस पिकाची लागवड देखील विभीन्न प्रकारच्या जमिनीवर होते आहे. कापूस पिकास जमीन, हंगाम, हवामान व वाणाचा कालावधी यानुसार सिंचनाची गरज कमी - जास्त होते. महाराष्ट्रामध्ये कपाशीस २०० % (७०० मि. मी. ) सिंचनाची गरज लागते. बी. टी . कपाशीचा कालावधी विना बी. टी . कापूस पिकापेक्षा कमी असल्यामुळे निश्चितच किमान एक सिंचनाची बचत होत आहे. कापूस पिकास वाढीच्या विभीन्न आवस्थेत लागणार्‍या पाण्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.

उगवणीपासून पाते लागण्यापर्यंत - २०%

पाते लागणे ते फुले लागणे - ४०%

फुले लागणे ते बोंडे लागणे - ३०%

बोंडे लागणे ते शेवटची वेचणी - १० %

म्हणजेच सुरूवातीच्या काळात कापसासाठी पाण्याची गरज फार कमी असते. पाते लागण्यापासून बोंडे लागण्यापर्यंत कपाशीसाठी पाण्याची गरज सर्वाधिक असते. त्यानंतर परत पाण्याची गरज कमी होते. सुरुवातीच्या काळात जर पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडाची व मुळांची वाढ खुंटते.

बागायती बी. टी. कापसाची पेरणी मे महिन्याच्या अखेरीस करण्यात येते. पेरणी सर्‍या पाडून वरंब्याच्या पोटावर सरकीची पेरणी करावी. पेरणीपूर्वी ओलवणी करावी व पेरणीनंतर ३ ते ४ दिवसानंतर आंबवणीचे पाणी द्यावे. त्यानंतर पाऊस पडेपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार ८ ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीक वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाची गरज प्रामुख्याने पावसाच्या पाण्यानेच भागते. जर पावसाचा खंड पडल्यास पिकास पाणी द्यावे, पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास पाते, फुले व बोंडे गळण्याची शक्यता असते. पाते लागणे, फुले लागणे, बोंडे लागणे व बोंडे फुटणे या पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था आहेत. या पीक वाढीच्या अवस्थेवेळी पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याची जवळपास ५०% बचत होते. त्याचबरोबर उत्पादनामध्ये ३५ ते ४०% वाढ होते. कपाशीच्या धाग्याच्या गुणधर्मामध्ये सुधारणा होते.

कोरडवाहू लागवडीमध्ये पावसाचा ताण असल्यास उपलब्धतेनुसार संरक्षित पाणी द्यावे. अशा वेळी एक सरी आड याप्रमाणे पाणी दिल्यास उपलब्ध पाण्यामध्ये अधिक क्षेत्रास संरक्षित सिंचन देणे शक्य होते. झाडावरील ३० - ४० % बोंडे फुटल्यानंतर पाणी देणे बंद करावे.

वाढनिरोघक रसायनांचा वापर : बागायती लागवडीमध्ये पिकाची कायिक वाढ अवास्तव झाल्यास ओळींतील व झाडांतील अंतर झाडांच्या फांद्यानी पुर्णत: व्यापले जाते. अशा परिस्थितीमध्ये अन्नद्रव्यांचा वापर कायिक वाढ होण्यासाठी होतो. अशा वेळी ही अवास्तव वाढ रोखण्यासाठी सायकोसील या रसायनाची ६० पी. पी. एम. (१.२ मिली प्रति १० लिटर पाणी) या तीव्रतेची फवारणी पीक अडीच महिन्यांचे असताना करावी. यामुळे कायिक वाढ थांबून अन्नद्रव्यांचा उपयोग फुले व बोंडे लागण्यासाठी होते. बोंडांचा आकार वाढतो परिणामी उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते.

वेचणी व साठवण : कपाशीची वेचणी साधारणत: ४० टक्के बोंडे फुटल्यानंतर करावी. पुढील वेचणी जवळपास १५ - २० दिवसांनी करावी. वेगवेगळ्या जातींचा व वेचणीचा कापूस स्वतंत्र वेचावा व साठवणूक वेगवेगळी करावी. वेचणी शक्यतो सकाळी करावी. जेणेकरून थंड वातावरण काडीकचरा कपाशीच्या बोंडसोबत चिकटून येणार नाही. वेचणी करतान फक्त पूर्ण फुटलेली बोंडे वेचावीत. पावसात भिजवेली बोंडे वेगळी वेचावी. शेवटच्या वेचणीच्यावेळी कवडी कापूस वेचावा. वेचणीनंतर कापूस ३- ४ दिवस वाळवावा. कापूस स्वच्छ ठिकाणी साठवावा व प्रतवारीनुसार विभागणी करावी.