हुमणीचे नियंत्रण विषारी किटकनाशकाशिवाय करू शकाल!

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


ज्या ठिकाणी खताचा खड्डा आहे, तेथे कडुनिंब किंवा बाभळीचे झाड असल्यास मे महिन्यात पहिल्या आठवड्यात संध्याकाळी पावसाचे अगोदर एका बांबूच्या शेकाट्यास जुना कापडाचा बोळा बांधून त्यावर वापरलेले तेल ओतावे व तो टेंभा त्या झाडातून फिरवावा म्हणजे संध्याकाळी ६ ते ७ चे दरम्यान नर मादी एकत्र येतात. त्यावेळेस जास्तीत-जास्त अंडी हुमणी घालते. या वेळी झाडातून टेंभा फिरविल्यास अनेक अळ्या खाली पडतात. अशा खाली पडलेल्या अळ्या २-३ मुलांना वेचायला लावून एका घमेल्यात २-३ लिटर पाणी व अर्धा लिटर रॉकेल टाकून या मिश्रणात ह्या नर, माद्या टाकाव्यात. म्हणजे त्या १० ते १५ मिनिटात मरून जातात व अशा तर्‍हेने खताच्या खड्ड्यात त्या जात नाहीत. हा प्रयोग सतत ८ दिवस करावा. नंतर खड्ड्यातील खत उपसून वर सावलीत घ्यावे व ते नंतर शेतात नीट पसरवून शेत कुळवून घ्यावे, म्हणजे हुमणीचा प्रादुर्भाव होत नाही.